Tuesday, November 15, 2011

आधुनिक युगातील आदिमानव



माहितीची साधने आज थक्क करतील अशा वेगाने वाढत आहेत आणि वाढत राहतील. नवनवी तंत्रद्न्याने जसजशी येत जातील तसतशी या वेगात भयचकीत करणारी भरच पडेल. कोणत्याही प्रकारची माहिती आज एका क्लिकवर उपलब्ध आहे. त्यासाठी ग्रंथ विकत घेणे अथवा ग्रंथालयांत जाण्याचीही एवढी आवश्यकता उरलेली नाही. सर्वांनाच मुक्तपणे वापरण्याचे हे साधन हाती आले असल्याने कोणीही माहिती उपलब्ध करुन देवु शकतो वा घेवु शकतो. एका अर्थाने हा माहितीचा विस्फोट झालेला आहे.

पण द्न्यानात्मक वाढ किती झाली आहे?

माहिती म्हणजे द्न्यान असा समज माहिती तंत्रद्न्यानामुळे झाला आहे खरा. पण माहिती म्हनजे द्न्यान नव्हे हेही तेवढेच खरे. द्न्यान म्हणजे उपलब्ध माहितीच्या आधारे सर्वांगीण विश्लेषन करत त्या माहितीला शिस्तबद्ध द्न्यानाच्या रुपाने पुढे नेणे. आपण गेल्या वीस वर्षांचाच विचार केला तर महत्वाची बाब लक्षात येईल ती म्हणजे या काळात एवढी साधने उपलब्ध झाली असली तरी एकही मौलिक शोध लागलेला नाही. विश्वाबद्दलच्या माहितीत एवढी प्रचंड भर पडुनही आईनस्टाईनच्या सापेक्षवादाच्या पुढे जाता आलेले नाही. बिग ब्यंग थियरी अपुर्ण आहे याची जाण असुनही तिला पर्याय होवु शकेल व विश्वनिर्मितीबाबतचे अनुत्तरीत प्रश्न सोडवु शकेल असा सिद्धांत मांडला गेलेला नाही. उलट शास्त्रद्न्य स्वस्त प्रसिद्धीच्या हव्यासापोटी हास्यास्पद दावे करु लागले आहेत. विश्वशास्त्राबद्दल मुलात अल्पद्न्यानी असणारी माध्यमे ते दावे हिरिरीने प्रसिद्ध करत असतात.

सध्याच्या नैसर्गिक इंधनाला (सौर/कार्बनी/अणु) नवा पर्याय गेल्या शंभर वर्षांत शोधता आला नाही. ही नैसर्गिक इंधने (सौर वगळता) येत्या शंभरेक वर्षात संपनार आहेत याची जाण मानवजातीला नाही असे नाही, पण तिची मुक्त उधळन थांबायचे सोडा, वाढतच चालली आहे.

तीच बाब अर्थव्यवस्थेची. १९ व्या शतकात अनेक पर्यायी अर्थव्यवस्थांवर चर्चा झाली. साम्यवादाची देनगी त्याच शतकातील. साम्यवाद, समाजवाद, भांड्वलशाहीवाद, कल्याणकारी अर्थव्यवस्था ते मुक्त अर्थव्यवस्था असे अनेक वाद चर्चेत आले, राबवलेही गेले, त्यातील दोषही कालौघात समोर आले...पण त्यानंतर आजतागायत ख-या अर्थाने अर्थव्यवस्था शास्त्रात, अनेक नोबेल पारितोषिके बहाल केली गेली असली तरी, नवीन अर्थ-तत्वद्न्यान पुढे आनता आलेले नाही. आहे त्याच स्थित्यांत बदल तेवढे सुचवले गेले.

साहित्य/नाट्य/चित्रपट क्षेत्राबद्दलही असेच म्हनता येईल. क्रांतीकारी नवे पायंडे पाडनारे वा कल्पनाशक्तीची मुक्त भरारी घेत मानवी जीवनाला आवाक्यात घेत सर्वांना भिडेल असे साहित्य तर अपवादानेच निर्माण झाले आहे. प्रयोगशीलता वा अभिनव साहित्यप्रकार निर्मितीची आविष्कारक्षमताच गमावुन बसलेत कि काय असे वाटण्याची ही स्थिती आहे. या दशकात तर स्लमडोग मिलेनियर सारख्या भुक्कड चित्रपटाला ओस्कर मिळावे अशी दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. लोक कथा-कादंब-या व अशा चित्रपटांकडुन दुर पळत आहेत आणि ही जागतीक अवस्था आहे...ती शोचनीय तर आहेच पण मानवी कल्पनाशक्तीचे, नवनिर्माणाचे सामर्थ्य संपत तर चाललेले नाही ना, याबाबत चिंता वाटेल अशी ही परिस्थिती आहे.

गतशतकाच्या जवळपास मध्यापासुन कोणतेही नवे राजकीय तत्वद्न्यान उदयाला आलेले नाही. किंबहुना पुर्वीच्याच राजकीय तत्वद्न्यानांची सरमिसळ करत मध्ययुगीन सरंजामशाहीचा मात्र नवोदय झालेला दिसतो. दुस-या महायुद्धापर्यंत स्वत:ला "नवे जग" मानणारी अमेरिकाही या सरंजामशाहीत प्रवेशत जागतीक पोलीस म्हणुन वावरत दहशतवादी/चंगळवादी बनु लागली तरी त्याचाही निषेध कोणा विचारवंताने प्रबळ तत्वद्न्यानाची मांडणी करत केलेला दिसत नाही....वा तत्वद्न्यानाची फेरमांडनी केलेली दिसत नाही.

ज्या संगणकांनी माहिती तंत्रद्न्यानात क्रांती केली ते संगणक अजुनही बायनरी पद्धतीने...(म्हणजे मोर्स कोडचाच आधुनिक अवतार...बाकी काही नाही.) चालतात. याचाच अर्थ असा कि क्वांटम तंत्रद्न्यान संगणकांसाठी वापरता येउ शकण्याची शक्यता पडताळली गेलेली नाही वा क्वांटम तंत्रद्न्यान अद्यापही जेथे निर्माण झाले होते तेथेच थबकलेले आहे. या तंत्रद्न्यानातील असंख्य उर्जा पातळ्या वापरण्याची संधी आपल्याला अजुन साधायची आहे.

असे जवळपास सर्वच क्षेत्रांत होत असुन मुलभुत द्न्यान-विद्न्यानातील प्रगती अडखळलेली आहे असे आपल्याला दिसते.

आज आपण एका अर्थाने आधुनिक युगातील आदिमानव बनलो आहोत...बनत चाललो आहोत. सर्जनशीलतेचा क्रमश: -हास होत चालला असुन मानवी समाजप्रवाहाला मागे नेत चाललो आहोत.

कारण माहिती वाढली आहे पण द्न्यानात लक्षणीय भर घालेल असे कार्य थांबले आहे कारण सर्जकताच कोठेतरी थांबली आहे.

आणि हा मानवी समाजाला फार मोठा धोका आहे.

असे होण्यामागील काही महत्वाची कारणे, जी मला वाटतात ती अशी...

१. माहितीच्या भडिमारामुळे (मी याला खरे तर माहितीचा गजबजाट/गोंगाट म्हणतो.) मनुष्याची संवेदनक्षमताच कमी झालेली आहे. तो एकार्थाने बधीर झालेला आहे. त्यामुळे सर्जकतेसाठी आवश्यक असणारे गजबजाटविरहीत मुक्त अवकाश तो गमावुन बसलेला आहे.
२. मानवी नातेसंबंध हा मानवी सर्जकतेला बळ देणारा...प्रेरणा देणारा महत्वाचा घटक असतो. गतशतकापासुन मानवी नातेसंबंधांतील भावनीकता वेगाने घटत गेली आहे. याचे प्रमुख कारण म्हनजे जीवनप्रेरणाच बदलल्या आहेत. पण यातुन व्यक्तिवाद वाढत गेला असला तरी व्यक्ती त्यामुळेच सर्जकताही गमावुन बसली आहे....वा तिचे सामर्थ्य कमी झालेले आहे. मनुष्य हा मुळातच भावनीक प्राणी आहे, पण त्याच्या भावनिकता व्यक्तिकेंद्रीत झालेल्या आहेत.
३. ज्या क्षेत्रात नैसर्गिक गती नाही त्या क्षेत्रात केवळ अर्थलाभासाठी वा प्रतिष्ठेसाठी जाण्याची तर महाभयंकर लाट जागतीक शिक्षणपद्धतीमुळे आलेली आहे. प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र नैसर्गिक घटक असतो व त्याला काहीतरी विशिष्ट शक्ती निसर्गदत्त मिळालेल्या असतात याचे भान हरपलेले आहे. त्यामुळे नैसर्गिक प्रव्रुत्ती/क्षमता याविरुद्ध आकलन व शिक्षणाचे मार्ग बंद करत व्यक्तित्वाला खुजे करण्यासाठीचे मार्ग मात्र अमर्याद उपलब्ध आहेत. याला मी नैसर्गिक निवडीविरुद्धचा अखिल मानवी जातीचाच कट मानतो. यामुळे मुलभुत सर्जकतेच्या प्रेरणा नष्ट होतात याचे भान आपल्या जागतीक समाजाला नाही.
४. हा जो स्पर्धांचा मानसिक बोजा वाढत चालला आहे त्यात अर्थव्यवस्थांपेक्षा या माहिती तंत्रद्न्यान ते माध्यमांचा अधिक हातभार आहे. हा स्पर्धांचा बोजा ज्यांना पेलत नाही ते आत्महत्त्या करतात. आत्महत्त्येंची प्रमाणे ज्या भयावह, शेतकरी ते विद्यार्थी...नोकरदार...उद्योजक...यांत भयंकर गतीने वाढत चालली आहेत ती आकडेवारी भयभीत करणारी आहे. "पंगु लंघयते गिरीं" म्हनणे सोपे आहे पण सक्षमालाही अक्षम ठरवणारी अकारणची स्पर्धा प्रत्येक समाजघटकांतच नव्हे तर अगदी पती-पत्नीतही लागलेली आहे.

या सर्वांत मानवी सर्जनशीलतेचा पहिला बळी जातो, याचे भान आतातरी मानवी समाजाला यावे. यामुळे मानवी जगताचे पुढील भविष्य व्रुद्धींगत होण्याऐवजी ते घटत जात "बिग क्रंच" सिद्धांतानुसार मागे जात राहील...आणि आधुनिक काळ, पण टोळीमानव, असे आपलेच स्वरुप बनत जाईल...आणि त्याची चिन्हे आताच दिसु लागली आहेत. जाती/धर्म/वंश यांच्या टोळ्या जशा आहेत तशाच राजकीय/कामगार-श्रमिक वर्ग ते विद्यार्थीही आपापल्या हितसंबंधांसाठी टोळ्या बनवुन बसलेले आहेत आणि हा टोळीवाद कोठेतरी आदिम भावनांचे फुत्कार सोदत अनेकदा सामाजिक स्वास्थ्याचा बळी घेत जात आहे असेही आपल्याला दिसते. म्हणजे आपण पुढे गेलेलो नसुन मागेच चाललो आहोत आणि ते संपुर्ण मानवी जातीच्या हिताचे नाही.

हीच जागे होण्याची वेळ आहे...

अन्यथा अखिल मानवी समाजाच्या पुरातन सर्जनशील मनाचे विसर्जन होईल याची खात्री बाळगा.

4 comments:

  1. माहितीचे रूपांतर ज्ञानात होण्यासाठी माहिती कसाला लावण्याची गरज असते. माहिती कसाला लावण्याची ही वृत्ती असणाऱ्या लोकांची संख्या पूर्वीदेखील आताइतकीच होती. आताच्या संशोधनाचा उपयोग करून घेण्याची गरज समाजाला वाटत नसल्याने त्याचा उपयोग केला जात नसावा. अलेक्झांड्रियाच्या ग्रंथालयात वाफेवर चालणारे इंजिन होते, पण त्यावेळच्या समाजाला त्याचा वापर करण्याची गरज वाटली नाही.

    ReplyDelete
  2. श्री सोनवणी साहेब,
    आपला लेख चांगला आहे. त्यातल्या काही मुद्द्यांशी मी सहमत आहे. तथापि काही मुद्दे मांडू इच्छितो -

    १. मूलभूत भौतिकशास्त्रात फारशी मौलिक भर पडलेली नाही, हे निश्चित खरे आहे काय? मी अर्थात भौतिकशास्त्राचा विद्यार्थी नाही, पण स्टीफन हौकिंग ह्याचे 'the grand design' हे पुस्तक वाचून आईनस्टाईनच्या किती पुढे शास्त्र गेले आहे त्याची कल्पना येते. जी विख्यात 'M theory' आहे ती अद्याप संपूर्णपणे सिद्ध झालेली नाही, पण ते एक महत्वाचे पाउल निश्चितपणे आहेच. पण तुमच्या म्हणण्याचा विचार करायचा तर एक गोष्ट अशी असावी, कि अशा प्रकारच्या मूलभूत संशोधनासाठी आर्थिक मदत करण्यापेक्षा तंत्रज्ञान हेच अधिक फायदा मिळवून देणारे असल्यामुळे हा परिणाम झाला असावा.

    २. तंत्रज्ञानातील प्रगती माझ्या मते तरी विस्मयकारक आहे. तुम्ही गेल्या १०० वर्षांचा पट डोळ्यासमोर ठेवला आहे. अंतराळातील प्रगती ह्याच काळात झाली हे विसरता येणार नाही. चंद्रावरील स्वारी झाल्यावर क्रमाने ह्या गोष्टी अधिक पुढे जायला हव्या होत्या, पण त्यासाठी लागणारा पैसा, जो फक्त अमेरिकेकडेच आहे, त्यांच्याही करदात्यांना नासाला अधिक पैसा द्यावासा वाटत नाही, कारण ह्या संशोधनातून काहीतरी अधिक चांगली निष्पत्ती होण्याच्या शक्यता दिसत नाहीत. आपल्या सूर्यमालिकेमध्ये अन्यत्र कुठेही जीवन नाही, हे एकदा सिद्ध झाल्यावर, ह्या पलीकडे जाणे, हे आजच्या प्रगतीच्या आवाक्यातले नाही. माणसाने प्रवास करणे तर जीवशास्त्रीय दृष्ट्याही अशक्य कोटीतील आहे.

    ३. संगणकाच्या मूळ भाषेत कदाचित बदल झाला नसेल, पण इंटरनेट ही माझ्या मते प्रचंड मोठी क्रांती आहे. ह्यामुळेच माहितीचा महापूर निर्माण झाला आहे, आणि पुढील प्रश्न (जे तुम्ही मांडले आहेत) निर्माण झाले आहेत, हे खरे असले तरी विकास हा असाच नागमोडी वळणांनी होत असतो. आज प्रश्न निर्माण झाले आहेत, उद्या उत्तरेही मिळतील. आणि ह्या

    ४. इंधनाला पर्याय दिसत नाही, हे खरे आहे, आणि हा खरा कळीचा प्रश्न आहे. ह्यावर आज उत्तर दिसत नाही. आज सारेच ह्या गोष्टी मुळे भयभीत झालेले आहेत. फक्त माणसाच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे आणि आशावादी राहणे हेच फक्त आज शक्य आहे.

    ५. सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या माणूस मागे गेला आहे असे मला अजिबात वाटत नाही. किंबहुना, आजएवढा माणूस आधी कधीही सुखी नव्हता. मी युरोपात राहत असल्यामुळे हे बोलतो आहे असे नव्हे, तर आपल्या देशाबद्दलही हेच खरे आहे. भूतकाळात राहण्याची आपण आज कल्पनाही करू शकत नाही. आपल्या देशात अद्यापही ४०% लोक अत्यंत दारिद्र्यात राहतात हे जरी खरे असले तरी ४०% लोक (जी संख्या अक्ख्या युरोपच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे) हे पाश्चात्य मोजमापानुसारही चांगली क्रयशक्ती असणाऱ्या वर्गात मोडतात ही एक वस्तुस्थिती आहे. ह्यापूर्वी कधी अशी परिस्थिती होती काय? सामाजिक दृष्ट्याही बघता, विशाल भूमिका असणारे लोक क्रमाने वाढत जाणे हे आजच दिसत आहे, ह्या पूर्वी फारसे दिसलेले नव्हते. अहो, मी इथे राहतो, आणि जेव्हा मला आपल्याकडील तथाकथित मागास जातीतील मुले-मुली इथे काम करताना, संशोधन करताना दिसतात, तेव्हा किती आनंद होतो हे मी सांगू शकत नाही. (परवाच इथे एक नारायणगावचा मुलगा भेटला. अधिक गप्पांमधून तो एका तथाकथित मागास जातीतील आहे हे माझ्या लक्षात आले. त्याचे वडील अल्पभूधारक शेतकरी ह्या वर्गातले आहेत. आज हा मुलगा नेदरलंद्स मध्ये bio-genetics मध्ये PH.D. करतो आहे. मला त्याचा फार अभिमान वाटला. आणि अशी बरीच उदाहरणे मी सांगू शकतो.) आज जातींची बंधने सैल होत आहेत. स्पृश्यास्पृश्यता राहिली नाही. स्त्रियांची परिस्थिती कधी नव्हे एवढी सुधारली आहे. (तरी ती समाधानकारक आहे असे मला म्हणायचे नाही. पण भूतकाळ एवढा वाईट आहे, कि थोडी प्रगतीही जाणवावी.)

    (pudhe chalu -

    ReplyDelete
  3. ६. राहता राहिला प्रश्न कला आणि साहित्याचा. मला हे मान्यच नाही, कि साहित्याचा दर्जा खालावला आहे. तुम्ही मागचे साहित्य काढून पहा. त्यातील लेखकांची मनोवृत्ती संकुचित, शिंपल्याएवढा छोटा worldview हे सारे फारच उघड आहे. आपले गाव, आपली जात, ह्याबाहेर कुणाला काही माहित असलेले दिसत नाही. अगदी फार थोडे अपवाद सोडता त्यातील फारसे काहीही टिकणारे नाही. चित्रपटांचे तसेच. आता slumdog millionnaire ह्या चित्रपटाला ऑस्कर पारितोषिक मिळायला नको होते, हे मला मान्य आहे, पण हा निव्वळ anglo-american संस्कृतीचा कावा आहे, दुसरे काही नाही. आपल्याकडील चित्रपट पहा. (म्हणजे चांगले चित्रपट. भिकारही बरेच असणारच. ते आधीही होतेच.) आजच्या एवढी समज तेव्हा असल्याचे मला तरी दिसत नाही. लगान सारखा चित्रपट, तारे जमीन पर, A Wednesday, मुंबई मेरी जान, ट्राफिक सिग्नल ह्यातील नुसतं विषयांचं वैविध्य तरी पहा. तसेच स्त्री-पुरुष नात्यामधली maturity पूर्वीपेक्षा खूपच जास्त असल्याचे दिसेल. पूर्वी सत्यजित राय, गुरुदत्त आणि काही तुरळक चांगल्या बनलेल्या आर्ट फिल्म्स सोडून जगाला दाखवण्यासारखं होतंच काय आपल्याकडे?

    मला वाटते, कि मार्क्सचा ऐतिहासिक भौतिकवादाचा जो सिद्धांत आहे, तो फारच मार्मिक आहे. समाजाचा पाया जसा असतो, त्याला अनुरूप त्यावरील इमारत असते. (उदाहरणार्थ, राजे-राजवाड्यांचा काळ जेव्हा होता तेव्हाच कोठीवर गाणाऱ्या गायिका असत, कारण त्या ह्या वर्गाच्या आश्रयावर जगत असत. ह्यातून काही श्रेष्ट गायिका निर्माण झाल्या. मदनमोहनचे संगीत मुख्यतः ह्या संस्कृतीवर आधारित आहे. आज ती संस्था लयाला गेली, तेव्हा मदनमोहनसारखी गाणी आज बनू शकणार नाहीत हे स्पष्ट आहे. आज जागतिकीकरणाच्या प्रभावामुळे ए. आर. रहमान सारखा श्रेष्ट संगीतकार निर्माण होतो, जो भारताबाहेरही नाव करतो.)

    असो. शेवटी एवढेच कि मला वाटते, कि मानव जातीचा विकास कधीच linear नसतो. त्यात चढ-उतार असतातच. पण जर साकल्याने सर्व गोष्टींचा आलेख मांडला तर तो निश्चित वर जाणारा आहे.

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...