Thursday, April 25, 2013

चीन्यांना धडा कसा शिकवावा?





चीनने लदाखमधील भारतीय हद्दीत घुसखोरी करत चौकीही उभारली. इतकेच नव्हे तर त्यांच्या हेलिकोप्टर्सनी भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन करत पत्रके व खाद्यपदार्थांचा वर्षाव केला. आपले सेनाधिकारी चीनी सेनाधिका-यांसोबत वाटाघाटी करत आहेत...परंतु या वाटाघाटींची तिसरी फेरीही निर्णायक ठरलेली नाही. संसदेत गदारोळ झाला असला तरीही भारतातर्फे नेहमीप्रमाणेच ठोस भुमिका घेतली जात नाहीय. येथे प्रश्न कोंग्रेस अथवा गैरकोंग्रेस सरकारांचा नसून भारतीय मानसिकतेचा आहे. दोन हजार वर्षांपुर्वी कुशाण वंशीय कनिष्काने चीनवर हल्ला करून चीनवर विजय मिळवला होता व चीनी राजपुत्राला ओलीस म्हणुन तो राजपुत्र मरेपर्यंत काश्मिरात ठेवला होता. कुशाण वंश हा भारतीय नव्हता म्हणुणच कदाचित तो असले साहस करू शकला असावा.

चीनचे भारतीय सीमा उल्लंघायचे प्रयत्न आजचे नाहीत. १९६२ च्या युद्धात चीनने जवळपास ५० हजार चौरस किलोमीटरचा अक्साई चीनमधील प्रदेश व्यापला. भारताचा या युद्धात दारुण पराभव झाला. या पराभवानंतर संसदेने चीनने जिंकलेला इंच ना इंच प्रदेश परत मिळवु असा एकस्वरात ठराव पास केला होता. त्याचे विस्मरण झाले. फक्त चर्चांचा न संपणा-या फे-या सुरु राहिल्या.

अक्साई चीनच नव्हे तर चीनने अरुणाचल प्रदेश व अन्य पुर्वोत्तर राज्यांत घुसखो-या करण्याचे प्रयत्न सुरुच ठेवले आहेत. तेथील फुटीरतावाद्यांना चीनचे सक्रीय सहकार्य आहे हे जगजाहीर आहे. वीसेक वर्षांपुर्वी चीनने अरुणाचल प्रदेशातील आपल्या भागात हेलीप्यड बांधले तरीही भारत सरकारला त्याचा पत्ताच नव्हता. एका खासदाराने संसदेत हा गौप्यस्फोट केला तेंव्हा सरकारला जाग आली होती हे मला स्मरते.

१९६३ म्द्ध्ये पाकिस्तानने भारताचाच व्यापलेला काही भाग चीनला परस्पर देवून टकला. चीनने या भागातुन पाकिस्तानला जोडनारा रस्ताही बनवला. म्हणजे भविष्यात भारत-पाक युद्ध झाले तर चीनची कुमक तात्काळ या रस्त्याने पाकला मिळु शकते. भारताने याबाबत काय केले?

म्यकमोहन सीमारेषा चीनने आधीपासुनच नाकारली आहे. वास्तव हे आहे कि आजचा भारत हा ब्रिटिश इंडिया आहे. वांशिक-भाषिक असे कसलेही साम्य नसलेले प्रदेश आज भारतात आहेत ते इंग्रजांमुळे हे विसरता येत नाही. अखंड भारत अशी वल्गना आपण करत असतो तेंव्हा आपण ब्रिटिश भारताची अखंडित मागणी करत असतो. प्रत्यक्षात आम्ही स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशाचे नागरिक म्हणुन सीमावर्ती राज्यांशी सांस्कृतीक नाळ जोडण्यासाठे कसलेही विशेष प्रयत्न केले नाहीत. लेह-लद्दखला आजकात पर्यटणासाठी भारतीय जावू लागले असले तरी आजही या भागात येणारे ७०% पर्यटक हे विदेशी असतात हे वास्तव लक्षात घ्यावे लागणार आहे. असो.

भारतीय सीमा हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. १९६२ नंतर नेहरू ते कृष्ण मेनन यांना पराभवाचे गुन्हेगार ठरवत चिखलफेक करणारे आजही कमी नाहीत. परंतू आपण हे विसरलो आहोत कि कोणाचेही सरकार असते तरी तो पराभव अटळ असाच होता. स्वातंत्र्य मिळुन उणेपुरी १५ वर्षही न झालेला बाल्यावस्थेतील देश चीनशी लढून जिंकणे अशक्यप्राय होते. त्यात कम्युनिस्टांनी घेतलेली राष्ट्रद्रोही भुमिका फारशा टीकेचे लक्ष कधी बनली नाही.

चीनचा साम्राज्यवाद अनेक घटनांमधून उफाळुन येत असतो हे आपण कोरीयाप्रकरणातही पाहू शकतो. भारताला सर्वकश युद्ध परवडणारे नाही आणि तशी मानसिक इच्छाशक्तीही नाही याची जाणीव चीनला चांगलीच आहे. ही इच्छाशक्ती फक्त सत्ताधा-यांची नव्हे तर आम्हा सर्वच भारतीय जनतेचीही नाही. चंगळवादाला सरावलेले आम्ही लोक फारतर गळे काढू शकतो...आणि त्यापार आम्ही कधी काय केले आहे?

मी चीनमद्धे २००२ साली गेलो होतो. गुंआंगडांगच्या विमानतळावरून सर्व चौकशा आणी कागदपत्रांची पुन्हा पुन्हा तपासणी करत सोडला गेलेलो मी शेवटचा प्रवासी होतो. भारतीयांबाबत चीनी लोकांना विशेष प्रेम नाही. डा. कोटनीस तेथे आजही आठवले जात असले तरी म्हणुन त्यांच्या भारताबाबतच्या जनभुमिकेत विशेष फरक पडलेला नाही. अपवाद आहेत...पण ते सौहार्दाच्या पातळीवर आलेले नाहीत.

कधी येणारही नाहीत.

चीनने नक्षलवाद्यांच्या माध्यमातून भारताशी अघोषित युद्ध सुरु करुन इतकी दशके उलटली तरीही आम्ही भारतीय पुरोगामी आणि विद्रोहाच्या नांवाखाली लक्षलवादाला समर्थन देतो यासारखा आमचा अक्षम्य अपराध नाही. नक्षलवाद्यांचा बिमोड लष्करी वापर केल्याखेरीज होणार नाही असे मी मागे एका लेखात लिहिले होते तर कम्युनिस्टांच्या बगलबच्चांना राग आला होता. नक्षलवाद आता आमच्या दारापर्यंत आलाय तरीही आम्ही जागे होत नाही. नक्षलवाद्यांना सहानुभुती म्हणजे चीनला पाठिंबा आहे हे आम्ही कधी लक्षात घेणार? कधी देशात आपक्ल्याच लोकांच्या माध्यमातुन घुसलेला शत्रू दूर हटवणार? कि येथे रस्त्या-रस्त्यांवर युद्ध होत नाही तोवर आम्ही नेहमीप्रमाणेच झापडे बांधून बसणार आहोत?

भारत सरकार त्याच्या पातळीवर जे करायचे ते करत राहील.... पण देशाचे नागरीक म्हणुन आम्ही या क्षणापासून चीनी वस्तु-उत्पादनांवर तात्काळ बहिष्कार घातला पाहिजे...मग त्या इलेक्ट्रोनिक वस्तू असोत कि अन्य काही. किमान आमचे राष्ट्रप्रेम..(जर असलेच तर...) प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले पाहिजे. नक्षलवादी विचारसरणीला समुळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी सक्रीय व्हायला हवेत.

नुसत्या वांझ निषेधांनी काहीएक भागणार नाही.


संजय सोनवणी



हाही लेख (पुर्वी वाचला असला तरी पुन्हा वाचावा!)

http://sanjaysonawani.blogspot.in/2012/04/blog-post_4581.html

23 comments:

  1. कम्युनिस्टान्पेक्षा तथाकथित विद्रोही लोकच नक्षलवाद्यांचे जास्त गुणगान गात असलेले दिसतात विद्रोही हेच देशाचे आणि समाजाचे खरे शत्रू आहेत. त्यांचा वेळीच बंदोबस्त करायला पाहिजे.

    ReplyDelete
  2. Sir, very nice article, I trully Agree with you. Once upon time out former Raksha Mantri has said " Our main enemy is not Pakistan it's China.

    What abt CPI and CPM where are they now? they will never speak any word against China. We must take strong action now. First we must make our forces well equipped and freed from political interferences.

    ReplyDelete
  3. संजय सर -

    समजा चीनने महाराष्ट्र राज्या पर्यन्त मजल मारली आणि आपल्याला कायमचे या ब्राह्मण

    वर्चस्वा मधून मुक्त केले तर किती उत्तम होईल - आठवले ,आंबेडकर जे करू शकले नाहीत म.फ़ुले आणि छ.शाहु महाराज जे करू शकले नाहीत ते हा लाल ड्र्यगन करून दाखवेल


    आपण हा संदेश सर्व लोकांना सांगाल का ?

    भारत हा लुटायला ठेवलेला देश आहे हे इथले राज्य कर्ते च सिद्ध करत आहेत

    पर्देशियानी केलेली गुंतवणूक दुसऱ्या परकीयांनी नेली तर काय नुकसान आहे आपले -?

    चीनला मुक्तद्वार द्या -

    चीनला बुद्ध विहार आणि स्तूप बांधायला परवानगी द्या - प्रत्येक तालुक्यात एक - तिथेच बाजूला चीनी बनावटीचे दुकान आणि चायनीज फूड मौल काढावा आणि त्याचे उत्पन्न गणेश उत्सव आणि डॉ आंबेडकर जयंतीला वापरायची अट घाला !तसेच चौ एन लाय आणि नेहरू यांची मंदिरे बांधून शेजारच्या जागेत चीनी सिनेमा थिएतर करावे


    हा भारत जसा ब्रिटीश भारत आहे असे आपण म्हणता तसेच हा हिंदू सवर्ण हिंदुस्तान आहे - याला आपल्या स्वप्नातला भारत करायला चीन येत आहे - आपल्या मदतीला - त्याचा आपण फायदा घेऊया

    मेरा भारत चीन महान

    दोघांच्या मधल्या सीमा पुसून टाकल्या पाहिजेत !

    ReplyDelete
    Replies
    1. स्वरदाजी, कोणते तुनतुने कोठे वाजवायचे आणि कोठे नाही याचे भान ठेवले तर आभारी राहील.

      Delete
    2. aapalyala swaradachya likhaanaateel upahaas disalaa naahi ka ?

      Delete
    3. चीनला बुद्ध विहार आणि स्तूप बांधायला परवानगी द्या . Buddha is the 9th incarnation of Vishnu.

      Delete
    4. Wrong! Vishnu is the 1st incarnation of Buddha.

      Delete
  4. सर

    जगात कुणीच कुणाचे शत्रू नसते - कायमचे !

    चीन हा विस्तारवादी देश आहे -

    त्यांना काहीही करून हिंदी महासागरात घुसायचे आहे - त्यासाठी ते अमेरिकेवर कुरघोडी करून पाकिस्तानची खुशमस्करी करत कराची मार्गे तिथे घुसणार -

    दुसरा मार्ग ब्रह्मदेश,आसां या बाजूने आहे -

    भारत मात्र झोपलेला आहे याबद्दल त्यांचीच नव्हे तर सर्व जगाची खात्री झालेली आहे आणि असे चीनला भारतात बोलावणारे स्वरदा सारखे अवलक्षणी निघाले की भारताची वात लागणार !

    सिकंदर भारतात आला त्याला अम्भीने मदत केली असे काहीतरी आठवते -

    ह्या त्यातलाच प्रकार आहे . आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यावर आपली लगेच जुन्या साराम्जाम्स्हीच्या दिशेने जोरात वाटचाल सुरु झाली आहे - लोकशाही नावाला आहे - सोंग लोकशाहीचे आणि आत्मा जहागिरदारीचा - जमिनदारीचा ! - सगळीकडे सगळ्याची मोडतोड झाली आहे - जुनी मुल्ये फेकून दिली आहेत आणि नवी पेरणी वांझोटी !

    परत शिवबा जन्म घेतील का ?असे स्वप्न बघणारे पण अनेक आहेत - देश विचित्र वळणावर उभा आहे !इथे विचार आणि आचार यांची एकवाक्यता नाही - दुतोंडीपणा जाजोजागी दिसतो आहे -

    संजय सर तुम्हीच सांगा ! काय केले पाहिजे - बहुजानात एकतेची शक्ती आहे का ? सवर्ण खरेखुरे जिवंत आहेत का ? सर्व धर्म समभाव जागा आहे का ?

    का आपणच कुठेतरी हे सर्व रुजवायला कमी पडलो ?- का दिशाच चुकलो ?

    निधर्मी राजसत्ता हे न पेलणारे शिव धनुष्य आपण उचलायला गेलो आणि आपले जगात हसे झाले आहे का ?

    सर बोल काहीतरी बोला - आता नाही बोललात तर मग उशीर झालेला असेल !

    सर बोलला - आम्ही ऐकतोय !

    ReplyDelete
  5. Sonavani sir, please answer the queries raised by Swarada & Alakh Niranjan. This negative mindset is far more dangerous as well as interesting than the danger of chinese invasions!

    ReplyDelete
    Replies
    1. Buddha is the 9th incarnation of Vishnu.

      Delete
  6. संजय सरकार !

    काय चालले आहे या देशात ?

    आपण काय योजले होते आणि काय चालले आहे ?

    भारत सार्वभौम झाला का - मागच्या चीनच्या युद्धात सर्व लोकसभा सदस्यांनी ठराव मंजूर केला - चीनच्या ताब्यातून आम्ही सर्व भूमी सोडवू तो पर्यंत विश्रांती नाही -


    अहो लोकसभेचा ठराव तो - पण फक्त फायलीत धूळ खात पडून राहिला -

    अण्णा हजारेनी सुद्धा माहितीच्या अधिकारात त्या ठरावाचे पुढे काय झाले ते विचारले नाही - का बरे असे !

    त्यानंतर आपले भत्ते वाढवून घेणारे अनेक ठराव आवाजी मतदानाने याच सदस्यांनी मंजूर करून घेतले -मंजूर झाले ! चीन आणि पाकिस्तानची मनमानी चालूच आहे - आपण कसे सार्वभौम ?चीनकडे नेहरू निषेध खलिते पाठवत असत - त्यावेळच्या व्यंग चित्रांची आठवण झाली -

    जनरल मुशारफ आपल्याकडून जिंकलेल्या भागात कारगिलमध्ये येउन गेले होते - याला काय म्हणावे ?

    सैन्याला अंतर्गत प्रश्न सोडवण्यासाठी वापरून घेण्याचे प्रमाण वाढत आहे -

    दंगली ,पूर नियंत्रण ,वदले यासाठी आपण वेगळी यंत्रणा उभी केली का ? ती कितपत प्रभावशाली आहे ?लष्करावर हा जास्तीचा ताण आपण किती दिवस देणार आहोत ?


    काश्मीरी चळवळीला काश्मीर हा स्वतंत्र देश हवा आहे -सार्वभौम !

    आपण त्यांच्या सीमांचे जर रक्षण करू शकत नसलो तर ? ते तरी तुमची सत्तेची ही साठमारी किती दिवस सहन करणार -

    तरीसुद्धा अतिरेकी म्हणून घोषित करून आपण मुद्दा गुंडाळून ठेवत आहोत



    आता प्रत्येक काश्मिरी कुटुंबात हा घरभेदी पणा रुजला आहे -त्यांना पाकिस्तानात किंवा भारतात सामील व्हायचे नाही -

    आता युद्ध झाले तर पासष्ठ किंवा एकाहत्तर सारखी परिस्थिती असेल का ?

    काश्मिरी आपल्या बाजूने सहमती दाखवतील का ?


    संजय सरकार !

    आम्ही मराठी अस्मिता अशीच रुजवली - वाढवली - त्याचा कल्पवृक्ष केला -

    मराठी मनाची आणि हिंदू धर्माची आम्ही पाठराखण केली - हजारो लाखो हात आमच्या मागे उभे राहिले -आमचा आमच्यावर विश्वास बसेना - इतकी जिगर ? इतके या मातीवरचे -धरमावरचे प्रेम ? आम्ही आणि मासाहेब - आमचे डोळे पाणावले !

    हे स्वप्न आपण रुजवले आहे ते खरेच साकार होईल का ?असे आम्हाला पण वाटत होते - पण अनेक जाती , अनेक हातानी ते साध्य करून दाखवले - आम्ही धन्य -झालो -

    आता इंग्रजांनी आपला भारत आपल्याला परत केला -आपण त्याची दोन शकले केली - आणि मोठ्ठ्या मनाने उरलेल्या मुसलमानाना इथे सामावून घेतले - काय झाले पुढे ?ते सर्व आपल्या समोर आहे !कुठे कुणाचे काय चुकले ?- या धाकट्या भावाने कायम आपल्या गळ्याला नखाच लावले -घरभेदी पणा केला - हिमालया पलीकडून त्यांनी दुसर्या राक्षसाला बोलावले आहे - पानिपताची आठवण होते आहे - ह्या अबदालीला कसे आवरणार ?


    ReplyDelete
  7. चांगला लेख आहे पण मुळात जे निर्णय घेणारे आहेत त्यांच्यामध्ये हिम्मत आणि दूरदृष्टी आहे का हा प्रश्न आहे? सध्या चीन जे करतो आहे ते फक्त दबाव आणून त्याला पाहिजेल तसे काढून घेण्यासाठी आणि आपण स्वताहून त्यांच्या जाळ्यात अडकतो आहोत. गम्मतच आहे सगळे आपले शेजार आपल्याला नेहमी असेच चेपतात आणि आपण काहीच करू शकत नाही. नुसती तणतण टीव्हीवर.

    नक्षलवादी लोकांना आपल्याच लोकांनी मोठे केले. वेळच्या वेळी योग्य निर्णय घेवून लोकांचे प्रश्न सोडवावे असे लोकप्रतिनिधींना वाटत नाही. मुळात त्यांच्याकडे तेवढी क्षमता आहे का? सगळे फक्त आपल्या तुंबड्या भरण्यातच मग्न आहेत. काही सन्माननीय अपवाद नक्कीच आहेत पण त्यांच्या संख्या अगदीच कमी आहे. नोकरशाहीला काम चुकले तर घरी बसवायची सोय नाही. काहीही केले तरी नोकरी जात नाही मग कशाचीच भीती नाही. सगळे फक्त आपापले बघण्यातच गुंग आहेत. मग कसे काय होणार.

    चीनला टक्कर म्हणून आपण हळूहळू अमेरिकेच्या नादाला लागलो आहोत. ते लॉक फक्त स्वतःचा फायदा पाहणार आणि आपण मारे जगाचे काय होणार आणि नको त्या यूटोपियन कविकल्पना कावटाळून बसणार. सगळे फक्त पुढच्या निवडणुकीत मी निवडून येणार की नाही ह्याचीच चिंता करत बसले आहेत पण पुढील ३०-५० वर्षांचे काय ह्याची कोणाला फारशी फिकीर नाही.

    ReplyDelete
  8. माझ्या मते दक्षिण-पूर्व आशियामधील तथाकथित भारतीय हस्तक्षेपाचा निषेध म्हणून चीनने हे पाऊल उचलले आहे. त्यावर माथेफिरू प्रतिक्रिया देण्याने नुकसान होण्याचीच शक्यता अधिक.

    ReplyDelete
  9. संजय सर
    तुम्ही जे म्हणत आहात त्याप्रमाणे नुसते वांझ निषेध करून काही उपयोग नाही.पण मुळात निषेध हा निषेधच असतो तो वांझ निषेध केव्हा होतो तर त्याला कृतीची जोड नसते तेव्हा.
    तुम्ही ज्याप्रमाणे म्हणता कि नेहरू-मेनन जोडगोळीवर १९६२ च्या युद्धाच्या पराभवाचे खापर फोडले जाते ते पूर्णपणे चुकीचे आहे.मी म्हणतो १९६२ युद्धाचे अपयश हे पूर्णपणे राजकीय ( नेहरू-मेनन जोडगोळीचे) अपयश(न कि लष्करी) होते त्याला जेवढे सत्ताधारी जबाबदार होते तेवढेच विरोधकही जबाबदार होते. काय करत होते विरोधक त्यावेळेस. का नाही त्यांनी आकाश पातळ एक केले सुरवातीपासून (मी युद्ध चालू असताना म्हणत नाही त्यावेळेस सर्वांनी एकाच असायला हवे) ?
    भारतीय लष्कराने त्याच्या ज्या काही तुटपुंज्या ताकातीनिशी (चीनच्या तुलनेत) पूर्णपणे त्याचा मुकाबला करायचा प्रयत्न केला त्याला तोड नाही. पण दुर्देव पराभव नशिबी आला नव्हे तो येणारच होता.पण ते नेहरुच आहेत ज्यामुळे काश्मीर आणि चीन सीमारेषेचा प्रश्न आजतागायत सुटलेला नाही.
    तुमची "बाल्यावस्थेतील राष्ट्र" हि संकल्पनाच पटत नाही. मुळात भारत हा ब्रिटीश इंडियाची देन आहे हे तुम्हीच म्हणता. मग त्याच प्रमाणे ब्रिटीश इंडिया हा तयार होवून जवळपास त्यावेळेस १०० वर्ष तरी झाली होती १९६२ च्या युद्धाच्यावेळेस . पण त्या वेळच्या परिस्थितीचा विचार करता लक्षात येते कि नेहरू हे अलिप्ततावादाचे कट्टर समर्थक होते त्यामुळे त्यांनी लष्कराच्या मागण्यांकडे/ सूचनांकडे डोळेझाक केली. त्याची परिनीती १९६२ च्या पराभवात झाली. त्यामुळे हा पराभव हि सर्वस्वी नेहरू-मेनन जोडगोळीच्या धोरणाचा पराभव होता. मला वाटते तुम्हाला नेहरू-गांधी विषयी तुम्हाला जरा जास्तच जिव्हाळा आहे. नेहरूंची काही बलस्थाने होते तशीच त्यांच्या काही कमजोरी हि होत्या. पण काय आहे न आपल्याकडे व्यक्तिस्तोम एवढे आहे कि आपण अशा गोष्टीची चिकित्सा नाकारतो आणि त्यामुळे मग परत परत तोच प्रकार घडतो.मुळात अलिप्ततावाद सुरु करण्यासाठी तुमच्या अंगी प्रचंड सामर्थ्य लागते. हेच बहुतेक त्यांना समजले नाही. विनासामर्थ्य कोणीच तुमच्या कोणत्याही गोष्टीला विचारात नसतो.
    आता सध्या काही तरी धाडसी निर्णय घेण्याची खरेच खूपच आवश्यकता आहे. जेणे करून आंतरराष्ट्रीय पातळीवर योग्य संदेश जाईल. पण असे कदापि होणे नाही. मला सरदारजी, शास्त्रीजी, इंदिराजी आणि अटलजी आवडतात. आता मला माहित आहे कि अटलजींचे नाव घेतले कि तुम्ही काहीतरी बोलणार. पण मी त्यांना मानतो ते त्यानी पोखरण २ केल्यामुळे. अमेरिकादी देशांचा विरोध पत्करून, होणाऱ्या परिणामाची कल्पना असतानाही त्यांनी तो धाडसी निर्णय घेतला हे महत्वाचे. तेही आघाडी सरकार असताना. अशीच कामगिरी इंदिराजींनी एकदा नव्हे दोनदा केली.एकदा सुवर्ण मंदिरावरील कारवाई आणि बांगलादेश मुक्ती संग्राम. आणि अशा नेतृत्वाची आता नितांत आवश्यकता आहे.
    चीनी वस्तूवर बहिष्कार घालून तसाही काही फरक पडणार नाही. कारण त्याच गोष्टी दुसरीकडून आयात केल्या जातील. आता आवश्यकता आहे कि त्यांच्याकडून हल्ला झाला तर आपणही प्रत्युतर देण्याची. जी गोष्ट मागच्या २ महिन्यात पाकिस्तानी लष्कराकडून झाली. त्यावेळेसच त्यांच्यावर प्रतीहल्ला करून त्यांचा काही भाग हा आपण आपल्या ताब्यात घ्यायला हवा होता. आताही जेव्हा हे होईल तेव्हा पासून काही दिवस तरी पाकिस्तान किंवा इतर कुणी आपल्यकडे मान वाकडी करून पाहणार नाही हे माझे मत आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. I respect your point of view. I do not know why you think I may not be liking Atal ji...I respect him very much!

      Delete
  10. 1962 च्या युद्धात पराभव अटळ होता तर मग युद्ध उद्भवण्यास कोण जबाबदार होते? नेहरुला युद्ध टाळता आले असते. युद्ध व पराभवाला नेहरुच जबाबदार ठरतिल ना? का राजेश खन्ना आणि धर्मेद्र जबाबदार होते?

    ReplyDelete
  11. संजय महाराज !

    आपण गोवा मुक्ती संग्राम करून गोवा (गुटका नाही ) प्रांत - आपल्या घशात घातला

    तोसुद्धा म्हणे अहिंसेने - काही म्हणतात अहिंसेने नाही - काही म्हणतात बुद्धी भेदाने - काही म्हणतात जनतेच्या उत्स्फूर्त उठावाने - त्यात पण एकवाक्यता नाही - ते एक असो - आपला देश मोठ्ठा आहे ना - मतमतांतरे असणारच -

    त्याचा राग येवून आपले वाढते ( पोकळ ) प्राबल्य आणि नेहरूंची वाढती इमेज याला तडा देण्यासाठी ,

    कबुतर उडवणाऱ्या नेहरूंची चड्डी ओढण्याचे काम चीनने केले - तिथल्या मुलामुलानी आपल्याकडे आधी मेंढ्या हाकलल्या आणि तो भाग आपलाच आहे म्हणून ती मुले बाळात्त धरून बसली -

    मग त्यानी आपल्या सैन्याला गुदगुल्या केल्या आणि हसून हसून पुरेवाट लावली -

    तो आपला मोठा भाऊ होता आणि आहे -

    पाकिस्तान आपला धाकटा भाऊ आहे आणि राहील .

    आपल्याला सर्व धर्म सारखेच - सर्व देश आपले मित्रच इटलीतील चोर आप्ल्याकडे येतात -आपण त्यांना सोडतो - मग ते हट्ट करून घरीच बसतात - मग आपण त्यांना अभय दिल्यावर ते त्यांच्या राज्डूताकडे राहण्याच्या बोलीवर इथे येतात -

    सगळा आनंद आहे -आपणाला स्वातंत्र्य फुकट मिळाले का ?यावर एक चर्चा झाली पाहिजे -

    आपल्याला उत्तुंग नेतृत्व मिळाले रे मिळाले की आपण त्यांचे पहिले देऊळ बांधून टाकतो - माझीच बघा कशी या लोकांनी गेम करून टाकली - आता मला समुद्रात घोडयावर बसवतील - आजूबाजूला मस्त भेळपुरी,आईस्क्रीमच्या गाड्या लावतील - तिथे छोटे चुटे चायनीज किल्लीवर लढणारे शिवाजी - बिहारी लोक विकायला मांडतील -

    जगदंब ! जगदंब !

    ReplyDelete
  12. संजय , तू लहान असशील त्या वेलची गोष्ट आहे

    आठवतात का ते दिवस नेहरू टिटो आणि नासर यांनी अलिप्ततावाद नावाची चळवळ चालू केली होती - नेहरू एकीकडे केनेडीना आणि दुसरी कडे ख्रुस्चेव्हना सांभाळत जगाच्या भविष्याला वळण देण्याचे स्वप्न बघत होते - ते सामर्थ्यवान देशाच्या नेतृत्वाचे स्वप्न नव्हते हे चीनच्या युद्धाने जगासमोर उघड झाले आणि आपले हसे झाले - नेहरू खचले - त्यांचा आचरट पणा उघड पडला पंचाशील्ची साद हवेत विरली .

    चाचा नेहरुंचा जोकर नेहरू झाला -

    चीनने भारताकडे कसे पाहिले ?

    हैद्राबाद , गोवा , दादरा नगर हवेली पोन्देचरी असे सर्व खालसा करत एकसंध भारताचे स्वप्न भारतीय मनात साकारलेले होते ते सत्यात येत होते - ते चीनला सहन होत नव्हते - मार्शल टिटो हे रशियाच्या आशीर्वादाने भारत आणि इजीप्त या मोक्याच्या देशाना एकत्र आणत होते ,

    चीनला हालचाल करणे भागच होते - निदान रशियाला शह देण्यासाठी तरी !



    नेहरूंच्या कचखाऊ धोरणामुळे काश्मीर प्रश्न चिघळला !- पाकिस्तानचा नैतिक किंवा राजनैतिक विजयच झाला - आज आपण काश्मीर बाबत हुकमी एक्क्याप्रमाणे म्हणू शकतो का की

    काश्मिरी जनता भारताच्या बाजूने आहे ?- हीच गोष्ट पन्नास वर्षानी आसाम आणि अरुणाचल यांना लागू होणार नाही कशावरून ?

    आपले नेते हे खरेच नेते म्हणण्याच्या योग्यतेचे आहेत का ?

    आपल्या नेत्यांचा इतिहासच भ्रष्ट तत्वांवर मांडलेला असेल तर ते आपले भविष्य कसे सुरक्षित घडवू शकतात ?

    सर्वानीच विचार करू या - आपण निवडलेली राजकीय पद्धती आदर्श असेल पण सुरक्षित आहे का ?

    आपण त्या पद्धतीला लायक आहोत का ?

    चीन ते थोडेसे हुकुमशाही धार्जिणे आहेत हे लपवत तरी नाही

    चीन राष्ट्रीय स्वार्थ साधताना लाजत नाही

    आपण नैतिकतेचे बुजगावणे उभारून आपला षंढपणा मिरवत असतो !

    आपण श्रीकृष्णाचा ,चाणक्याचा , शिवाजीचा वारसा विसरतो ,

    आपल्याकडे दूरदर्शी पणाचा पूर्ण अभाव दिसतो -

    आपल्याला राष्ट्रीय हित नावाची काही गोष्ट असते हेच कुणी शिकवलेले नाही -

    आपल्या संस्कारात धर्म धर्माचार येतो पण राष्ट्रीयत्व फक्त जाहिरातीतून मिरवत येते -

    पूर्वापार आपल्याकडे धर्म आणि राष्ट्रप्रेमाची जी सांगड होती ती या निधर्मी विचारांच्या संस्करणात बदनाम झाली -त्याला मूलतत्ववाद असे नाव देऊन बदनाम करण्यात आले - हा दोष कुणाचा ?





    ReplyDelete
  13. chin la dhada shikvaila aaj delhi madhe netrutva badlachi garaj ahe swagiya sardar patelan sarkya loha purshachi aaj deshala garaj ahe.narendra modiji pm zale ter china la mu tod jawab naki detil.ya congress goverment kadna apeksha karna manje murkha pana ahe.sattantar hi kalachi garaj ahet jer ya bharat matecha parkiya akramana pasun rakshan karaiha asel te ya shanda congress sarkar la deshatun mitvun takava lagel........

    ReplyDelete
  14. संजय सर ,

    आपल्याला आठवत असेल की सरदार पटेल हे अजिबात लोह पुरुष नाहीत या बद्दल अनेक वेळा चर्चा झालेली आहे जसे कोन्ग्रेस मध्ये इमेज बांधणी म् गांधीच्या आशीर्वादाने पद्धतशीर होत असे ,

    जसे की स्वतः म्. गांधी , राजगोपाल, गोविंद वल्लभ पंत ,सरोजनी नायडू ,सरदार पटेल , तसेच भ ज.पा . मध्ये सुद्धा अशीच प्रतिमा पूजा आणि प्रतिमा बांधणी होते - अटलजी , नरेंद्र मोदी ,वि हिं प चे नेते प्रत्येकाला एक छबी देण्यात येते - हे एक शास्त्र आहे - लो टिळक आणि मी शेंगा खाल्या नाहीत ही कथा- म गांधी आणि सत्याचा शोध , सरदार पटेल आणि काखेतला फोड - हे असेच आहे .


    या चीन भारत धोरणा बाबत चर्चा करताना पक्षीय प्रतिमा पूजन करणे म्हणजे अत्यंत हिणकस मनोवृत्ती दाखवते अशा चा तीव्र निषेध केला पाहिजे



    या लोकाना एकच प्रश्न विचारावासा वाटतो - अनिकेताजी ,उत्तर प्रदेशात आणि केंद्रात आपणास सत्ता असताना आपण राम मंदीर का नाही पूर्ण केले ? एकीकडे सर्व काही तयार आहे असा प्रचार चाललेला असतो - खांब तयार आहेत -नक्षीकाम तयार आहे - मग समजा वि हि प चे एक लाख कार्यकर्ते मेले तरी बेहत्तर -काय हरकत आहे - मंदीर होके रहेगा म्हणणारी नेते मंडळी कुठे शेपूट घालून बसली आहेत ? तो प्रवीण तोगडीया तर पानाचा डबा घेऊन हिंडत असणारा शेटजीच वाटतो !



    लोकांचा फार मोठा विश्वासघात झाला आहे ,

    आता लोक तुमच्या कोणत्याच बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत - ही नेते मंडळी तूप रोटी खावून तुकतुकीत चेहऱ्याने आणि परीट घडीचे कपडे घालून मिरवतात त्यावेळेस त्यांच्यात आणि कोंग्रेसच्या पुढारी लोकात काहीच फरक वाटत नाही

    नेसती लांब लचक -नावे - कर्तृत्व शून्य ठोकळे - मुरली मनोहर जोशी ,उमा भारती , गोविंदाचार्य ,साहेब् सिंग आणि कितीतरी -

    ReplyDelete
    Replies
    1. सरदार हे लोहपुरूषच होते हे त्यांनी भारतातील संस्थाने विलीनिकरनाच्यावेळी दाखवून दिले. त्यांना थोडे अधिक आयुष्य मिळाले असते तर…जसे कि बाबासाहेबांच्या बाबतीतहि आपण म्हणू शकतो.
      आपण म्हणता ते खरे आहे कि पद्धतशीरपणे एखाद्याची प्रतिमा दाखवायची आणि त्याचे महत्व पद्धतशीरपणे वाढवायचे. ज्याला आपण गोबेल्स निती म्हणु शकतो. हि भारतीयांची परंपराच आहे.
      पण असे आहे कि आपण कितीही नाकारले किंवा कितीही आदळआपट केली तरी, सध्या नरेंद्र मोदिशिवाय असे एकही नेतृत्व नाही के जे खंबीर आहे. जे जगाला दाखवू शकेल कि भारतीयांच्याहि पाठीला कणा आहे. भलेही त्यांच्या पाठीमागे २००२ चा कलंक असला तरीहि. तसेही कॉंग्रेसच्या मागेही १९८४ चा कलंक आहेच कि. इतके कशाला आपल्याही शरदबाबूनमागेही १९९३ चा कलंक आहेच कि.
      सध्या चीन ज्या आक्रमकपणे साम्राज्यविस्तारचा प्रयत्न करत आहे ते पाहता आपल्यालाही तसेच आक्रमक नेतृत्व मिळाले पाहिजे. सद्यस्थितीमध्ये आपले सगळे शेजारी हे खूपच आक्रमक होत आहेत चीनच्या जीवावरती. त्यामुळे त्यातल्या त्यात जो दुर्बल शेजारी आहे जसे कि श्रीलंका किंवा पाकिस्तान यांच्या ज्या काही कुरापती असतील त्यांना वेळीच आक्रमकपणे उत्तर देवून आपण चीन सहित सर्वांना एकप्रकारचा संदेश देवू शकतो. आणि हे फक्त नरेंद्र मोदीच करू शकतात जे कि कुठल्याही रिमोट कंट्रोलशिवाय काम करतात. जे त्यांनी गुजरात मध्ये दाखवून दिले आहे. माझे म्हणणे एवढेच आहे कि आता आपण स्व संरक्षणासाठी तरी आक्रमक व्हायला हवे. मग ते कॉंग्रसने होऊ देत किंवा भाजप ने होऊ देत. पण आता आपण आक्रमक व्हायला हवे.
      आणि तसेही लोकशाहीत फक्त आणि फक्त लोकांच्या हातातच सत्ता असते हे आपण विसरता कामा नये. उद्या परिस्तिथी बदलली कि आपण त्यावेळेस जे आवश्यक असणारे नेतृत्व आहे ते सत्तेत आणू शकतो. जर आपणच बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या लोकशाहीवर विश्वास करणार नसू तर आपल्या इतके करंटे आपणच असू .

      Delete
  15. च्यामारी! एवढे करण्याची तरी काय गरज आहे? सरळ एकता कपूरच्या सांस-बहुच्या मालिका चीनमध्ये प्रक्षेपित करायला सुरुवात करा. ह्या जालीम उपायाने ते सुतासारखे सरळ येतील.
    आणि तेव्हढ्यानेही भागले नाही तर ह्या ब्लॉगवरच्या प्रतिक्रिया चिनी भाषेत रुपांतरीत करून जिथे त्यांनी घुसखोरी केली आहे तिथे पत्रके वाटा. ते वाचूनच त्यांना फेफरे येईल आणि ते आल्या पावली परत जातील.

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...