Tuesday, December 10, 2013

पुरोगामी होणे फार सोपे आहे.....

"देवा-धर्माला, परंपरांना नाकारणे आणि ब्राह्मणांना शिव्या देणे एवढीच आपली पुरोगामीपणाची संकुचित व्याख्या करुन घेतली आहे. ती व्याख्या चुकीची आहे. ब्राह्मनांना शिव्या देणे व त्यांना समाजापेक्षा वेगळे समजणे यामुळे समतेचे तत्वकारण पुढे जात नाही....जावू शकणार नाही. देवाधर्माला नाकारणे ही व्यक्तिगत पातळीवरची बाब झाली. ती सामुदायिक बनू शकत नाही. तसा बनवायचा प्रयत्न समाजाला पुढे नेण्यात यशस्वी ठरत नाही. फार तर व्यवहारातून त्यांचे महत्व कमी करत राहता येवू शकते.

"पुरोगामीपनाची व्याख्या व्यापक आहे. आज आपण आर्थिक/वैचारिक/ज्ञानात्मक दृष्ट्या जिथे आहोत त्यापुढे उद्या असणे हे पुरोगामीपणाचे लक्षण आहे. त्यासाठी सतत चिंतन/मनन करत तसे जीवनाचरण करणेही तेवढेच महत्वाचे आहे.

"पुरोगामीपणा हा राजकारण, अर्थकारण तसेच समाजकारणाशीही निगडित आहे. महाराष्ट्राचा पुरोगामीचा इतिहास उज्वल असला तरी यशवंतराव चव्हाणांनंतरचा काळ पाहिला तर आपण या सर्वच क्षेत्रांत प्रतिगामी झालो आहोत असे दिसून येईल. आपले राजकारण जातींपार जाण्याऐवजी जातीनिष्ठ झाले आहे हे वास्तव असेल तर आपण कसे पुरोगामी? १९९२ नंतर धर्मांनी कधी नव्हे एवढी उचल खात हिंसकतेला बळ दिले हे आपल्या पुरोगामीतेचे लक्षण आहे काय? आजही कोणताही पक्ष जातीय विचार करुनच आपले उमेदवार देतो. यामुळे पुरोगाम्यांचे जातीविरहित समाजाचे स्वप्न साकार होणार नाही. खरे तर आजच्या जातीयतेला आरक्षणापेक्षा राजकारण्यांनाच जबाबदार धरायला हवे...पण पुरोगामी विचारवंतच कोणत्या ना कोणत्या राजकारण्याच्या कंपुत आपापल्या जाती घेऊन असतात...अशा अवस्थेत पुरोगामी म्हनवणे हा निव्वळ दांभिकपणा आहे.

 दुसरे, पुरोगामीता ही अर्थ क्षेत्रातही असते याचे भान आम्ही गमावले आहे. जशी सामाजिक लोकशाही असते तशी प्रादेशिक विकासातही लोकशाही हवी. म्हणजे समान विकासाच्या संध्या आणि त्यानुरुप सुविधा सर्वच प्रदेशांत हव्यात. पण आमचा विकास मुळात असंतुलित आहे. पश्चिम महाराष्ट्राचा नको तेवढा विकास आणि मराठवादा-विदर्भ भकास हे चित्र पुरोगामीतेला साजेशे नाही.  विकेंद्रीकरण करत सर्वच प्रदेशांचे संतुलित विकसन आम्हाला जमले नाही. पाण्यावर प्रत्येकाचा समान हक्क असुनही ७०% पाणी पश्चिम महाराष्ट्रच खातो. पश्चिम महाराष्ट्रात शहरे बेशिस्तीने वाढली कारण उद्योगधंदेही तिकडेच केंद्रीत. यामुळे ज्या सामाजिक/सांस्कृतिक/आर्थिक समस्या वाढल्या त्याचे निराकरण करायला आम्ही कमी पडतो. बकालपणा हीच जर आम्हाला प्रगती वाटत असेल तर आम्ही पुरोगामी कसे?

आम्ही लोक...या देशाचे लोक कोणत्या नैतिकतेला आज मानतो हेही तपासून पहायला पाहिजे. "प्रजेला आपल्या लायकीप्रमानेच शासक मिळतात" या उक्तीप्रमाने राजकीय क्षेत्रातील अध:पतनाला आम्हीच जबाबदार आहोत. पण आम्हाला आमची कोणतीही जबाबदारी नको आहे. आम्हाला आमच्या नेत्यांना शिव्या घालण्याचा काय अधिकार आहे? आम्ही भ्रष्टाचार निर्मुलनासाठी जनलोकपाल मागतो...पण भ्रष्टाचार हा एकतर्फी नसतो, त्याला देणारे म्हणुन आमचाही हातभारच असतो हे मात्र आम्ही विसरतो.

आमच्या पिढ्या अशाच वाया गेल्या. आम्ही नुसते शिकलो...भले डाक्टर-वकील झाले असू...पण आमचे मानसिकता मात्र अशिक्षितासारखीच आहे. आम्हाला आमच्या मुलांना मोकळे आकाश देण्याची भिती वाटते. मुलगा संगीतकार-नाटककार बनावा...चित्रकार बनावा, सारे आयुष्य त्यासाठी द्यावे असे वाटत नाही. आम्ही त्यांचे पंख छाटतो. त्याला कमाईचे मशिन बनवू पहातो. जीवन न समजावुन न घेता जगायला सांगतो. असे आम्ही आई-बाप असू तर मुक्त मनाची सबळ पिढी कशी निर्माण होईल? आम्हाला आमचीही पुढची पिढी नोकरदारच व्हावी वाटत असेल तर आम्ही कधी महासत्ता होणार? मुलांना निकोप वाढीचे स्वातंत्र्य नाकारणारे आम्ही कसले पालक आहोत?

आज आपण जागतिकीकरणाच्या लाटेत आलो आहोत. घरोघर...अगदी झोपड्यांत सुद्धा आधुनिक साधने प्रवेशली आहेत. विज्ञानाची फळे आम्ही सर्वच चाखत आहोत...पण आज बुवा-बापुंचे पेव कधी नव्हे एवढे फुटले आहे. प्रत्येकजण कोणा-ना-कोणाचा भक्त आहे. भक्ती वाईट नाही...पण ती सरळ परमेश्वराची करण्याऐवजी आम्हाला दलाल लागत आहेत. ते बरबटलेले असले...लिंगपिसाट असले तरी आमची त्यांच्यावरची भक्ती कमी होत नसेल तर आम्ही पुरोगामी राज्याचे नागरिक कसे? उलट आम्ही दिवसेंदिवस प्रतिगामी बनत मध्ययुगात जात आहोत. आणि ही बलजबरी कोभ्णी केलेली नाही...ही स्वत:चा अंत घडवणारी स्वेच्छा आहे याचे भान आम्हाला जर नाही तर या आधुनिक जगाचा आम्हाला काय उपयोग आहे?

दाभोळकरांचा खून पुण्यात होतो. ते स्वत:साठी नव्हे... तुमच्या-आमच्या सर्वांसाठी लढत होते...आमच्याच भावी पिढ्या निकोप आणि स्वच्छ मनाच्या बनाव्या यासाठी झगडत होते. त्यांचा खून झाला. पण त्यांच्या खुन्यांना पकडायची मागणी करण्यासाठी फक्त त्यांचेच कार्यकर्ते जमावेत-मोर्चे काढावेत..? जर ते लढत होते ते जर आपल्यासाठी तर आम्ही कितीजण रस्त्यावर आलो? दाभोळकरांची हत्या हा सर्व विचारकांना इशारा होता. विचारकांनी गप्प बसावे नाहीतर "तुमचा दाभोळकर करु" अशा धमक्या सदानंद मोरे-हरी नरके यांना आजही जात असतील आणि आम्ही सारेच डोळ्यावर कातडे पांघरणार असू तर आम्ही पुरोगामी कसे? ते आमच्यासाठी, आमच्या भावी पिढ्यांसाठीच लढत होते आणि आहेत ना? मग आम्ही कसे वागतो यावर कधी विचार करणार?

पुरोगामी होणे फार सोपे आहे. पुढे डोळे उघडे ठेऊन चालत रहा. सर्व काही नीट समजावून घ्या. भावनांच्या लाटांवर वाहत जाऊ नका. ज्ञाननिष्ठ बना. पण आम्हाला बहुदा ज्ञानाची भिती वाटते. म्हणून आम्ही झापडबंद झालो आहोत. सर्वच अनैतिकतेला आम्ही मूक पाठिंबाच देत नाही तर स्वत:ही अनैतिक बनलो आहोत. महाराष्ट्र पुरोगामी नाही. तो पुरोगामी आहे हीच आपली सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. सर्वप्रथम या अंधश्रद्धेला दूर सारुन स्वच्छपणे स्वत:कडे पहायला हवे."

-यशवंतराव चव्हाण यांच्या २९ व्या स्मृती समारोहात उद्घाटनपर भाषण देतांना मी मांडलेले काही मुद्दे. मंचावर श्री. दगडू लोमटे, श्री. बाबा बांड आणि श्री. गिरधारीलाल भराडिया.

4 comments:

  1. प्रिय संजयजी,
    कभी कृष्णमूर्ति ने कहा था कि सत्य का कोई संघठन अथवा समूह नहीं हो सकता. उसका कोई आंदोलन भी नहीं हो सकता. उसकी केवल अनुभूति हो सकती है. सत्य की खोज में निकला प्रत्येक संघठन अपने मुकाम तक पहुँचते पहुँचते एक और भी बड़े झूठ की दुकान बन जाता है.
    जिन्होंने धर्म को अफीम की गोली कहा उन्होंने दुनिया की सबसे विशालकाय गुलामी को जन्म दे दिया. लोगों से उनकी प्राचीन आस्थाएं छीन कर उन्होंने अपनी भक्ति करवाईं. पुराने भगवान की तस्वीरें हटा कर अपनी पार्टी के नेताओं की मूर्तियां लगवाई. पुरानी आरतियों के स्थान पर नए भक्ति गीत लिखे गए. समाज को इससे कुछ नहीं मिला बल्कि समाज और भी ज्यादा बेईमान और अपाहिज हो गया.
    आपकी आधुनिकता की परिभाषा यदि सही मान ली जाए तो पिछले दो सौ सालों में मनुष्य की आत्मा किंचित भी आगे नहीं गई है बल्कि नए नए झूठों की आराधना में व्यस्त हो गई है.
    हमको सत्य की खोज के लिए एक जिंदगी मिलती है. और हम है कि उसको संघठनों के द्वारा स्थापित झूठों को बचाने में तबाह कर देते है.
    इसलिए बुद्ध कहते है “अत्त दीपो भव:” अर्थात किसी से मार्गदर्शन मत मांग, स्वयं को ही जला ले और अपनी ही रौशनी में सत्य की खोज पर चल पडो. इसी बात को अलामा इक़बाल अपने अंदाज में कहा था: “खुदी को कर बुलंद इतना....
    दिनेश शर्मा, पुलगांव

    ReplyDelete
    Replies
    1. बिलकूल सही हैं दिनेशजी...

      Delete
    2. "पुरोगामी म्हणजे काय?" हे श्रुती तांबे यांनी लिहिलेले छोटेखानी पुस्तक खूपच उदबोधक आहे. वाचकांनी ते जरूर वाचावे हि विनंती.

      Delete
  2. सारांश, सर्वच नियोजनाचे उद्दिष्ट व्यक्तीची निर्णयशक्ती अधिकाधिक प्रगल्भ करणे आणि तिचा स्वतःच्या व समाजाच्या जीवनात अधिकाधिक उपयोग करायला अवसर देऊन स्वातंत्र्यात वाढ करणे हे असले पाहिजे.

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...