Wednesday, January 15, 2014

...तेंव्हा मरणाची चिंता करण्यात काय अर्थ आहे?

मानवी सत्य हे भविष्याकडे क्रमाक्रमाने जात असते....कालच्या सत्याचे अनेक तुकडे आज असत्य म्हणुन नव्या सत्याच्या प्रकाशात फेकून द्यावे लागतात. आजच्या परिप्रेक्षात जुन्या काळातील सत्ये आजही सत्य मानणे हे धर्मवाद्यांसाठी ठीक आहे...तत्वज्ञानात त्याला स्थान नाही. मुळात भविष्य ज्याला आपण म्हणतो तो काळ किती आहे...सांत आहे कि अनंत आहे हेच मुळात आपल्याला माहित नाही. आज तो सांतही असु शकेल किंवा अनंतही असु शकेल किंवा त्याच्या वेगळ्या अजुनही अनेक मिती असतील एवढेच आपण म्हणु शकतो...अंतिम सत्य म्हणावे अशी स्थिती असु शकत नाही....कारण ते नेमके काय हेच माहित नाही. मनुष्य हा विश्वाचे जैवरासायनिक उत्पादन आहे. त्याला त्याच्या मर्यादा आहेत. कमी कि जास्त याबाबत फारतर आपण निर्णय घेऊ शकतो. अर्थात तोही व्यक्तीपरत्वे बदलेल हे ओघाने आलेच! 

मृत्यु...जे जीवंत राहतात त्यांच्यासाठी (इतरांचा मृत्यू) अंतिम सत्य असेल कदाचित...नव्हे असतेच...पण जो मरतो त्याच्या दृष्टीने काय? जो इतरांसाठी खरेच मेला त्याचे अस्तित्व खरेच मेले असते असे आपण कोणत्या आधारावर म्हणू शकतो? ते आस्तित्व मानवी नसले तरी काहीतरी भौतिक असतेच...भौतिक गोष्टींचा समुच्चय म्हणजे जीवंत प्राणी...त्याचे पुन्हा विखंडन होणे म्हणजे मृत्यु असे आपण मानतो...अथवा म्हणू शकतो...पण ते सत्य असते काय?

....पुन्हा भौतिक गोष्टीही लवकर वा अत्यंत सावकाश बदलतच राहतात....तेंव्हा तेही अंतिम सत्य नाही...

माणुस अनुभव इंद्रियांमुळे घेतो. कोण घेतो? इंद्रिये विशिष्ट संरचनेची व जानण्याची माध्यमे असतात. पण जाणनेही भौतिक असते. कारण जाननारे इंद्रियही भौतिक संरचनेने बनलेले असते. ती संरचना उध्वस्त होणे म्हणजे आपण मृत्यु मानतो. पण संरचनेतील सामील एकुण घटकांचे काय? ते तर मरत नाहीत. फारतर विखंडित होतात आणि स्वतंत्र वाटचाल करु लागतात. ती वाटचालही बदलांशी निगडित असते. कोणाचा काळ प्रदिर्घ तर कोणाचा अल्प...पण मग आपण "काळ" या राशीशी येतो. प्रश्न हा आहे कि अनुभव घेणारा एक बायालोजिकल उत्पादन आहे तर अनुभव घेनारे इंद्रियही बायालोजिकल उत्पादन...म्हणुणच भौतिक नाही काय?

आणि जर सारेच भौतिक असेल तर अविनाशित्वाच्या नियमाप्रमाने ज्याला कायमचा मृत्यू म्हणता येईल तसा मृत्यू कसा अस्तित्वात असेल? काळ सांत असेल तर मग सर्वच गोष्टीना अंत आहे असे म्हनता येईल...आणि तो जर अनंत असेल तर अस्तित्वही अनंत आहे असे म्हनावे लागेल....नाही काय?

तेंव्हा मरणाची चिंता करण्यात काय अर्थ आहे?

1 comment:

  1. संजय सर ,
    आपण यावर बोलाल का ?
    आपण महत्वाचा विषय मांडला आहे
    माणसाला तत्वज्ञानाची गरज आहे का ?हा पण महत्वाचा मुद्दा मानला तर ?
    मुळात माणूस हा एक जैव रासायनिक उत्पादन आहे असे मानले तर मग त्याचा उद्भव आणि अंत या
    गोष्टी फक्त ज्याला सुरवात आहे त्याला शेवटही आहे इतपतच सत्य मानल्या पाहिजेत
    आपण सांगता की कालचे सत्य हे कालानुक्रमे फेकून द्यावे लागते आणि नव्या सत्याचा स्वीकार केला जातो- परत पुढचे सत्य सिद्ध होई पर्यंत -म्हणजेच सत्य विविधांगाने आपल्यासमोर येते असे आपण मानता का ? एकच सत्य पण त्याची विविध रूपे असे आपण मानता का ?
    जुने सत्य नवे सत्य अशा आवृत्या असू शकतात का ?सत्य कालबाह्य होते का ?
    आपण मृत्यू विषयी लिहिले आहे पण जन्म हा सुद्धा कुठपासून सुरु झाला असे म्हणायचे - कारण जन्मापूर्वी तो जीव आधी वेगळ्या रुपात आई वडील यांच्या रूपाने असतोच फक्त प्रकट नसतो - असे मानायचे का ? गर्भपात अधिकृत कसा आणि मृत्यू झालेले शव सायको चित्रपटातील शवा प्रमाणे जतन करून ठेवणे हे कसले लक्षण ठरेल ?माणूस मेला असे नाही तर तो वेगळ्या रुपात आहे असे मानले तर ते कुठपर्यंत ताणता येईल ?
    आता परत माणूस एकदा का जैव रासायनिक प्रकटीकरण आहे असे मानले तर त्याला तत्व ज्ञानाची जगण्यासाठी गरज आहे का ?" नैनं छिन्दंती शस्त्राणि - वगैरे त्याला पटवत बसायची
    गरज आहे का ?दुसऱ्या कुणीतरी त्यांच्या प्रज्ञे प्रमाणे स्वीकारलेले "कयामत की रात" हेच अंतिम सत्य मान्य करणे वा नाकारणे हे पण पारखून पाहिले पाहिजे -
    आपण तत्व ज्ञान हि गोष्ट माणसाच्या अस्तित्वासाठी अनावश्यक आहे असे मानू शकतो का ?
    आपण तत्व ज्ञान हि गोष्ट हे माणसाच्या प्रगतीसाठी अनावश्यक आहे असे मानू शकतो का ?
    माणूस हा उत्क्रांत झालेला जीव आहे ना ? का फक्त त्याचे शरीर उत्क्रांत अवस्थेतून जात राहिले ?
    मेंदू उत्क्रांत होत गेला म्हणजे तो मानवाचाच भाग आहे ना ?
    माणूस अनुभव पंचेन्द्रीयानी घेत असतो - मग ( अंतिम ) सत्याचा अनुभव माणूस कशाने घेतो ?
    एखाद्या आंधळ्याला - मुक्याला अथवा बहिऱ्या ला ( अंतिम) सत्याचा शोध अशक्य आहे का ?
    अंतिम सत्याला काळे गोरेपणाच्या मर्यादा नाहीत ,गरीबी श्रीमंतीची बंधने नाहीत आणि वयाची वा लिंगभेदाची अट नाही असे ते अंतिम सत्य असते ना ?
    अंतिम सत्यच नसते असे कुणी म्हणू लागले तर त्याचे खंडन कसे करणार ?
    तत्वद्यानाचे काम काय ? आणि विज्ञानाचे उद्दिष्ट काय ?

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...