Friday, April 25, 2014

इंग्रजांशी युद्ध सुरू!

१८०३ पर्यंत होळकरी राज्य सोडले तर इंग्रजांनी जवळपास देश आपल्या नियंत्रणाखाली आणला होता. यशवंतरावांच्या अपेक्षेप्रमानेच आता त्यांच्यावर तहासाठी दबाव आनण्यास सुरुवात केली. यशवंतरावांशी युद्ध करण्याची अजुन त्यांची मानसिकता बनलेली नव्हती. होळकरांचे लष्करी सामर्थ्य पुर्वीपेक्षा वाढलेले आहे याची त्यांना चांगलीच माहिती होती. 

होळकर बधत नाहीत हे पाहिल्यावर इंग्रजांनी मग यशवंतरावांना मैत्रीचा तह करण्याचे सुचवून बघितले. या तहानुसार (जर केला असता तर) इंग्रज होळकरांचे सार्वभौमत्व मान्य करत त्यांच्या प्रांतांत हस्तक्षेप करणार नव्हते, आक्रमण करणार नव्हते व त्या बदल्यात यशवंतरावांनी इंग्रजांशी वा त्यांच्या मांडलिकांशी युद्ध करायचे नव्हते. पण हा सर्व देखावा आहे, कधीतरी संधी मिळताच हे इंग्रज उलटणार याची जाणीव असल्याने यशवंतरावांनी इंग्रजांना तहासाठी उलट्या मागण्या पाठवल्या. त्या अशा होत्या:

१. इंग्रजांनी बुंदेलखंड व दोआबातील होळकरांच्या सर्व महालांचा ताबा यशवंतरावांना द्यायचा.

२. राजपुत व अन्य सर्व रजवाड्यांकडुन चौथाई वसुल करण्याचा अधिकार यशवंतरावांना द्यायचा.

मैत्रीच्या तहासाठी या मागण्या पाहुन इंग्रज हबकलेच. इंग्रजांचे वर्चस्व या मागण्या मान्य केल्या तर आपसुक घटत होते. जनरल लेकने या मागण्या धुडकावुन लावल्या. यशवंतरावांनाही तेच अपेक्षीत होते. ४ मार्च १८०४ रोजी यशवंतरावांनी लेकला लिहिलेल्या पत्रात म्हटले, :

"माझा देश आणि माझी संपत्ती माझ्या घोड्याच्या खोगिरावर आहे. ज्याही दिशेला माझ्या पराक्रमी सैनिकांचे घोडे वळतील त्या दिशेचा सर्व देश आम्ही जिंकुन घेवु. जर तुम्ही शहाणे आणि विचारी असाल तर माझे प्रतिनिधी सांगतील त्या महत्वाच्या विषयांचा आधी फडशा पाडाल..."

जनरलल लेकला असे सुनावणारा भारतात कोणी भेटला नव्हता.

जनरल लेकने २२ मार्च १८०४ रोजी वेलस्लीला पत्र लिहुन यशवंतरावांविरुद्ध युद्ध सुरु करण्याची काकुळतीने परवानगी मागितली. या पत्रात लेक काय म्हणतो हे वाचण्यासारखे आहे...हे पत्र कट्टर शत्रुने लिहिले आहे त्यामुळे त्याने त्यात स्वाभाविकपणेच यशवंतरावांना शिव्यांची लाखोली वाहिली आहे. शत्रुच्या शिव्या या पारितोषिकाप्रमाणेच घ्यायला पाहिजेत...या पत्रात लेक म्हणतो:

"जर होळकरला आत्ताच नष्ट केले नाही तर पावसाळ्यानंतर तो कमालीचा उपद्रवी ठरेल. या राक्षसाने मला जेवढे अस्वस्थ केले आहे तसे कधीही कोणी केले नसेल. हा माणुस इंग्रजांचा सर्वात घातक शत्रु आहे यात शंका बाळगु नये. अशा दरोडेखोराचे कौतुक करतांना मला संकोच वाटतो आहे. तो स्वत: माझ्यावर चालुन येणार नाही, असेच दडपण वाढवत राहील...आणि जर मी त्याच्यावर चालुन गेलो तर तो हुलकावन्या देत सरळ आपल्याच प्रदेशांत घुसुन वाटेत आडवे येईल ते उध्वस्त करत पुढे जाईल...".

यशवंतरावांची केवढी धास्ती इंग्रजांना होती हे या पत्रावरुन लक्षात येते. वेलस्ली स्वत: पराक्रमी सेनानी खरा...त्यानेच शिंदे-भोसलेंना असई-आडगावच्या युद्धांत धुळ चारली होती. पण त्याने तरीही जनरल लेकला यशवंतरावांवर हल्ला करण्याची परवानगी दिली नाही.

लेक यामुळे हात चोळत बसण्यापलीकडे काय करु शकत होता? अर्थात तो अगदीच स्वस्थ बसला होता असे नाही. त्याचे हेरखाते कार्यक्षम होतेच. त्याने यशवंतरावांच्या सैन्यातील कवायती कंपुंचे जेही इंग्रजी प्रमुख होते त्यांच्याशी संधान बांधायला सुरुवात केली होतीच. त्यांना फोडण्यासाठी तो वाट्टेल तेवढे पैसे ओतायला तयार होताच. यशवंतरावांची शक्ती कमी करणे हाच त्याचा हेतु होता.
त्यात त्याच्या हाती यशवंतरावांनी राजे-रजवाड्यांना इंग्रजांविरुद्ध त्याच्यासोबत येण्यासाठी आवाहने करणारी पत्रे लागली.

चार एप्रिल १८०४ ला लेकने ही पत्रे ताबदतोब वेलस्लीला पाठवली आणि निर्वाणीचा इशारा दिला कि जर एक जरी रजवाडा यशवंतरावांना सामील झाला तर इंग्रजांचे भारतातील बस्तान उखडुन फेकले जाईल. पत्रांतील मजकुरही खरेच खुप दाहक होता, त्यात इंग्रजंमुळे सारी संस्थाने कशी खालसा होते आहेत आणि आता त्याला उखडले नाही तर हिंदुस्तानातील "हिंदु" धर्मच काय इस्लामही उरणार नाही...तेंव्हा सारे एकत्र या...माझा घोडा आघाडीला आहे आणि आपण सारे या शत्रुला समुद्रापार हाकलण्यास सक्षम आहोत...असा मजकूर असे. ही पत्रे वाचुन आता वेलस्लीचाही नाईलाज झाला. होळकरांशी युद्ध म्हनजे पराकोटीची हानी हे सुत्र त्याला माहित होते. पण बाकी गप्प असलेले रजवाडे होलकरांच्या आवाहनाला प्रतिसाद देवुन स्वातंत्र्याच्या लालसेने त्याला सामील झाले तर निर्माण होनारा धोका फारच मोठा होता. तो धोका पत्करण्याची वेलस्लीची तयारी नव्हती.

त्यामुळे त्याने जनरल लेकला यशवंतरावांवर शिस्तबद्ध चढाई करण्याची परवानगी दिली.
१६ एप्रिल १८०४ रोजी वेलस्लीने यशवंतराव होळकरांविरुद्ध युद्ध घोषित केले पण सुरुवात यशवंतरावांनी केली.

युद्ध सुरु

होळकर तयारीत होतेच. ते किंबहुना या क्षणाचीच वाट पहात होते. बुंदेलखंडात कुचजवळ कर्नल फोसेटचा आठ हजार सैन्याचा तळ होता. अमिरखान त्याच परिसरात होता. युद्ध त्यांनी घोषित केले असले तरी पहिला आघात यशवंतरावच केला. त्यांनी फोसेटच्या तळावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. आपल्या सोबत अमिरखान व पाच हजार पेंढारी घेवुन त्यांनी फोसेटच्या तळावर अचानक धाड घातली आणि त्याच्या जवळपास दोन बटालियनची भिषण कत्तल केली. फोसेट घाबरुन जो पळत सुटला तो बेटवालाच जावुन पोहोचला. त्याच्या अनेक तोफा आणि युद्धसामग्री या युद्धात यशवंतरावांच्या हाती लागली. ही लढाई २२ मे १८०४ रोजी झाली.

ही तर फक्त सलामी होती. इंग्रजांचे बलाढ्य लष्कर असेच पळत सुटनार होते...
इंग्रजांचे सुरुवातीलाच नाक कापले गेले होते.

No comments:

Post a Comment

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...