Friday, September 25, 2015

असुरक्षिततेकडून कट्टरतेकडे...!

भय हा मानवी जीवनाला आदिम काळापासून बळकट मिठी मारून बसलेला घटक आहे. आदिम भय हे नैसर्गिक प्रकोप, सृष्टीतील अनाकलनीय घडमोढी, वन्य प्राणी ते अंध:काराच्या गुढगर्भात लपलेल्या काल्पनिक अदृष्य अशा शक्तींचे जसे होते तसेच स्त्रीच्या जननशीलतेचे कोडे माहित नसल्याने स्त्रीबद्दलही होते. मृत्यू कधीही केंव्हाही जीवन हिरावून घेते त्यामुळे मृत्यूभय तर सर्वव्यापी बनले. जीवनातील अकल्पनियता, अनिश्चितता याने आदिम काळापासून ग्रासलेला मानूस आजही त्यातून सुटला नाही.

धर्माची निर्मिती झाली तीच मुळात या भयावर मात करण्याचे उपाय शोधायला. माणसाने सुष्ट शक्तींना देव मानत त्यांची अर्चना केली. त्यांना बळी दिले तर दुष्ट शक्तींचा नायनाट होईल या भावनेने त्याने आदिम कर्मकांड निर्माण केले. प्रार्थनांच्या वेगवेगळ्या पद्धती बनवल्या. आपलीच दैवते श्रेष्ठ कशी हे सिद्ध करण्यासाठे त्याने अन्य मानवी टोळ्यांनाही वेठीला धरले. कधी आपली दैवते लादली तर शत्रू प्रबळ असेल तर त्याची स्विकारली. भयाची एक दुसरी मानसशास्त्रीय प्रतिक्रिया असते व ती म्हणजे स्वत:ला भयमुक्त दाखवण्याची केविलवानी धडपड. जर दैवी शक्ती श्रेष्ठ आहेत व ज्याचे अपत्य मानव (म्हणजे आपले लोक) आहेत असे मानतो तर आपणही इतरांचे जीवन आपल्या कह्यात त्यांना जिंकून आणू शकतो ही भावना जगभरच्या लोकांत प्रबळ दिसते ती यामुळेच. धर्माचा, देवतांचा जन्म ही मानवी भयाची अपरिहार्य उपज होय. भयावर मात करण्यासाठी, आयुष्य़रेखा अचानक खंडित होऊ नये यासाठी देवतांची त्याला गरज होतीच. आणि देवतांना संतुष्ट करायचे तर कर्मकांडेही आवश्यक. यामुळे यातुनच धर्माची निर्मिती झाली असे आपल्याला दिसते. आदिम काळी टोळीगणित धर्म होते. टोळीगणिक म्रूत्युनंतरच्या जीवनाबद्दलच्या वेगवेगळ्या कल्पना होत्या. महाराष्ट्रातील आदिम दफनांत मयताचे घोट्यापासून पाय तोडून मगच दफन केले जाई असे उत्खननांतुन दिसते. मृताचे भूत नंतर चालत परत येऊ नये अशी कल्पना त्यामागे असावी. म्हणजे मृतांबद्दलचेही जीवंतांना भय होतेच!

नैतिकता ही समाजांतर्गत सुरक्षित जीवन जगण्यासाठी आवश्यक झालेली दुसरी अपरिहार्य बाब. स्त्री-पुरुष संबंध कसे असावेत, एकमेकांत चोरी करावी कि नाही, शत्रु असेल तर त्याची चोरी केलेली चालेल कि नाही, स्वटोळीअंतर्गत एखाद्याने खून करणे, त्याची संपत्ती लुटने न्याय्य कि अन्याय्य, न्याय्य असेल तर कोणत्या स्थितीत आणि अन्याय्य असेल तर कोणत्य स्थितीत, जिंकलेल्या गुलामांचे काय करायचे, जिंकलेल्या धनाचे वाटप कसे करायचे....या बाबतीतही नियमन गरजेचेच होते. कारण त्यावरून होणा-या संघर्षात टोळीअंतर्गतही अव्यवस्था माजत होती. नीतितत्वे व त्यातुनच जन्मलेले आदिम कायदे टोळीअंतर्गत संघर्षाने सुरक्षितता धोक्यात येवू नये म्हणून आवश्यक बनून गेली. यातुनच हळुहळू राजव्यवस्था/गणराज्यव्यवस्थांचा उदय झाला हे खरे असले तरी मानवी आदिम भयाने माणसाची पाठ कधीच सोडली नाही, कारण नित्याने अनुभवायला येणा-या असुरक्षिततेला त्याला कधीच तोडगा सापडला नाही.

मानवी तत्वज्ञानाचा जन्मच मुळी या अनिश्चिततेची कारणे शोधत त्यावर तात्विक उपाय शोधण्यासाठी झाला. कोणत्यही धर्माचे आदिम तत्वज्ञान हे मृत्यूभोवतीच फिरते, अनिश्चिततेभोवतीच फिरते हा योगायोग नाही. हे जग माया आहे, मिथ्या आहे असे तत्वज्ञान जसे उगवले तसेच भरपुर मजेत जगुन घ्या...स्वर्ग नाही कि नरक नाही असेही सांगत जीवनाला आधार देणारे तत्वज्ञ होतेच. ग्रीक तत्वज्ञ हे नहमीच जडवादी राहिले व भयावर मात करण्यासाठी त्यांनी निसर्गालाच वापरुन घ्यायचे ठरवले. त्याउलट भारतीय तत्वज्ञान हे बव्हंशी परलोकवादी, अध्यात्मवादे व भक्तीवादी राहिले. कोनते तत्वज्ञान श्रेष्ठ हा येथे मुद्दा नसून मानवी जीवनाला भयावर मात करण्यासाठी कसे सामोरे जायचे यासाठी लावल्या गेलेल्या या सोयी होत्या. कर्ताकरविता परमेश्वरच असल्याने जेही काही घडते ते पुर्वनियोजितच असते हा नियतीवाद ग्रीकांत होताच. म्हणजे जे घडणार ते अटळ आहे, ते ठरलेले आहे व त्यात कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही हे एकदा ठरल्यावर परलोकाची चिंता पाश्चात्य जगाने फारशी केलेली दिसत नाही. भारतियांनी पूजा, भक्ती, जप-तप यातून विधीलिखित बदलता येते, मोक्षाचा मार्ग गाठता येतो या श्रद्धेवर भयावर मात करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कर्मकांडांची रेलचेल वाढणे स्वाभाविकच होते.

परंतू येथे हे लक्षात घ्यायला पाहिजे कि धर्माने अथवा तत्वज्ञानाने वा नीतिशास्त्राने मानवी भयावर आजही उतारा दिलेला नाही. अनिश्चितता आणि असुरक्षितता यातून कोणीही मूक्त झाला नाही. देव-धर्मावर हल्ला करणारे पुरोगामी जर या असुरक्षिततेच्या भावनेला सुयोग्य पर्याय देवू शकले असते तर देवा-धर्माची गरजही लोकांना पडली नसती. तसा पर्याय न देताच केवळ नकारात्मक टीका करत ते जातात तरीही ९९.९९९९९% लोक कोणत्या ना कोणत्या प्रमाणात धार्मिक/श्रद्धाळू राहतात असे का याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. मुळात माणसाला देवा-धर्माची मानसिक गरज का भासते या प्रश्नाच्या मुळाशी भिडल्याखेरीज देव-धर्माविरुद्धचा पुरोगामीपणा हे अवघे थोतांड आहे हे समजुन चालावे.

असुरक्षितता

माणसाला प्रत्यही अगणित घडामोडींतून जावे लागते व बहुतांशी वेळा त्याचा ज्या घडामोडींशी संबंधही नसतो अशा घडामोडींतून निर्माण होणा-या स्थितीचे लाभ-तोटे सहन करावे लागतात. म्हणजे पुढच्या क्षणी नेमके काय होनार आहे याचे निश्चित गणित त्याच्याकडे नसते. तो गरीब होणार कि श्रीमंत, तो जीवंत राहणार कि मरणार यापासून आज बायको/पती तरी कसे वागणार...हे प्रश्न कधी उघड तर कधी सुप्त पातळीवर त्याच्या मनात चालुच असतात.

बरे, हे व्यक्तीपुरते मर्यादित नसते. समाज एकमय अभंग असा कधीच नसतो. असावा हे नैतिक स्वप्न झाले. पण प्रत्यक्षात तो जात, धर्म, वंश, विचारधारा, पंथ, देवता, नास्तिकता, पुरोगामित्व, राजकीय पक्ष, व्यावसायिक तथा कामगार संघटना वगैरेंमद्ध्ये सुद्धा विचित्रपणे विभागलेला असतो. समजा एखादी व्यक्ती अमूक धर्माची व दुसरी दुस-या धर्माची. धर्म म्हनून ते स्वाभाविकपणे दोन वेगळ्या पातळ्यांवर वाटले गेलेले असतात. पण व्यावसायिक संघटना म्हणून दुस-या धर्माची व्यक्ती व एका विशिष्ट धर्माची व्यकी समव्यावसयिक असेल तर तिथे दोघे मात्र व्यावसायिक हितासाठी एकत्र येतात. आधी धर्मिक कारणांसाठी ते विरोधी पातळीवर असतात तर दुसरीकडे व्यावसायिक हितासाठी मात्र एकत्र असतात. हा विरोधाभास आहे आणि मनुष्य प्रत्यही या विरोधाभासात जगतो. कारण त्याला धार्मिकही हित हवे आणि व्यावसायिकही.

आणि नेमके या हितसंबंधातच जेंव्हा संघर्ष होतो तेंव्हा मनुष्य धर्म/जात/पंथ संघटन निवडतो....व्यावसायिक क्वचित. असे नेमके का होते यावर विचार करायला हवा. खरे तर व्यवसाय ऐहिक सूख देणारी प्रत्यक्ष बाब झाली. धर्म/जात/पंथ/विचारधारा नाही. धर्माच्या नांवाखाली अब्जधीश व्यावसायिक असो कि मजूर, खांद्याला खांदा लावून संघर्षात उतरु शकतात एक वेळ, पण व्यवसायांच्या नांवाखाली नाही. कारण हितसंबंधांचे वेगळेच कडबोळे जन्माला आलेले असते.

धर्म/देवतांची निर्मिती भयापासून मुक्तता करण्यासाठी झाली हे जरे खरे असले तरी धर्मही मानसाचे भय वाढवण्यात हातभारच लावत राहिले आहेत हेही आपण सहज पाहू शकतो. धर्माचे काम म्हणजे मानसाला खरे स्वातंत्र्य बहाल करत त्याला जीवनाचे सौंदर्य उलगडून दाखवत वस्तुत: भय अस्तित्वात नसू न त्या मिथ्या कल्पना आहेत हे समजावून सांगण्यासाठी व्हायला हवा होता. पण धर्माने उलत अधिकाधिक बंधनेच निर्माण केली असे आपण इतिहासात डोकावता पाहू शकतो. युरोपातील प्रबोधनाची चळवळ धर्माच्या अतिरेकी बंधनांच्या विरुद्ध उमटलेली बुद्धीवादी प्रतिक्रिया होती. धर्माने माणसाने कोणते कपडे घालावेत, काय खावे-काय प्यावे यापासून ते कय पहावे यावरही बंधने आणत त्याला भयमुक्त नव्हे तर भययुक्त करण्याचा चंग बांधला. पण ज्यांना धर्म हाच आपला तारणहार, मुक्तिदाता वाटतो त्यांनी ही बंधने विनातक्रार स्विकारली. जे बुद्धीवादी होते त्यांनी यातील भंपकपणा ओळखला. त्यांची चूक ही झाली कि त्यांना, ज्यामुळे धर्म निर्माण झाले ते भय, याला सक्षम पर्याय त्यांना देता आला नाही. जोवर मानवी जीवनावर पुढच्या क्षणाला काय होईल या असुरक्षिततेचे, अनिश्चिततेचे सावट आहे तोवर त्याला मानसिक आधाराची गरज आहे ही जाणीव त्यांनी ठेवली नाही. त्यामुले धर्म विरुद्ध बुद्धीवाद हाही संघर्ष जगभर उभा राहिला आहे. दोन्हीही बाजू बव्हंशी टोकाच्या असून यात सर्वसामान्य मानसांची ससेहोलपट होते याचे मात्र भान उभय पक्षी नही हेही एक वास्तव आहे.

विज्ञानामुळे धर्माची गरज कमी होईल हा भ्रमही दूर झाला आहे. मंगळयानाच्या प्रक्षेपणाआधी इस्रोच्या शास्त्रज्ञांनीच तिरुपतीला जावून प्रार्थना केली होती ही घटना या संदर्भात बोलकी आहे. पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल कि नाही हे अनिश्चितता शास्त्रज्ञांतही असल्यामुळे त्यांनीही अखेर दैवी शक्तीलाच शरण जायचे ठरवले असेल तर येथे एक विरोधाभास व द्वंद्व दिसते. खुद्द भौतिकशास्त्रात अनिश्चिततेचे तत्व हे मुलकणांच्या वर्तनासंदर्भात वापरले जाते. मानवी मानसिकतेवर तर याचा प्रचंड पगडा आहे. पण या मानसिकतेचा फायदा धर्मवादी खुबीने करुन घेत माणसांनाच नागवतात, अधिक असुरक्षित करुन सोडतात हेही तेवढेच खरे आहे.

याचे कारण मुळात आपल्या आदिम भावनांत आहे. असुरक्षिततेचे कारण आपण मुळात ऐहिक घटनांत न शोधता पारलौकिक घटनांत शोधतो याची आपल्या जागृत मनाला अनेकदा जाणीवही नसते. ऐहिक घटनाच एवढ्या अनेकदा अनाकलनीय असतात कि त्यांचे निरपेक्ष विश्लेशन करण्यात माणूस अयशस्वी होतो अथवा तसा प्रयत्न तो करत नाही.  याचीच एक प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया म्हणून तो घटनांवरच आपले अधिकाधिक नियंत्रण कसे राहिल या प्रयत्नांना लागतो. मग ते आर्थिक क्षेत्र असेल, राजकीय असेल, राष्ट्रीय असेल, धार्मिक असेल, जातीय असेल किंवा पंथिक. यादी मोठी होऊ शकते. परंतू किमान काही लोक आपल्या भयातूनच वेगळा मानसिक नृशंसपणा जन्माला घालतात व वेगळ्याच गुलाम्या लादण्याचा प्रयत्न करत अन्य घटकांत वेगळीच असुरिक्षतता उत्पन्न करण्याच्या मागे लागतात. आणि यातून कोणताही घटक कसा सुटत नाही हे आपण सध्यकालातील काही घटनांचा आढावा घेत पाहुयात.

संघटन का होते?

आदिम काळात माणूस टोळ्या करून रहायचा ही त्याची अपरिहार्यता होती. पण टोळी म्हणजे संघटनच असते. हे संघटन बाहेरुन होणा-या हल्ल्यांना संघटितपणाखेरीज तोंड देता येणार नाही यातुनच होते. अगदी राजे, सरदार यांचेही संघ कसे असायचे हे आपण इतिहासावरुन पाहू शकतो. महाराष्ट्रातील "राजमंडळ’ हा प्रयोग अशाच समविचारी नसले तरी सम-उद्दिष्टांना साध्य करणा-यांचा संघच होता. कार्ल मार्क्सनंतर श्रमिक-कामगारांचेही संघ बनायला लागले. भारतात जातीय/धार्मिक/पंथीय संघ पुर्वांपार होतेच. प्रत्येक संघाचे शत्रुसुद्धा ठरलेले असत. किंबहुना शत्रु असल्याखेरीज संघ बनत नाही हेच संघाच्या उत्पत्तीचे प्रमुख कारण आहे. संघ हे अभेद्य राहतात असेही नाही. प्रसंगोपात्त त्यांच्यातही फूट पडते. आपापसातही संघर्ष उभे राहतात याचीही जगभरातील अनेक उदाहरणे आहेत.

बरे, कोणते ना कोणते तत्वज्ञान हे कोणत्याही संघाचा आधारभूत पाया असतो. त्यात अलौकिक, उदात्त अशी वाटणारी ध्येये जशी असतात तशी ऐहिक विचारसरणीही असते. धर्मवाद्यांचे जसे तत्वज्ञान असते तसे ते निधर्मिवाद्यांचेही असते. साम्यवाद्यांचे असते तसेच समाजवाद्यांचे व भांडवलशाहीवाद्यांचेही असते. प्रत्येक गटाला वाटते कि विश्वाचे कल्याण करण्याची क्षमता त्यांच्याच तात्विक व ऐहिक मार्गाबाबतच्या विचारसरणीत आहे.

आणि एकदा विचारसरणीने जन्म घेतला कि अनुयायी वाढवण्याची जबाबदारीही अर्थातच आली. आणि हे सोपे नसते. म्हणजे धर्म/पंथाची झुंड "भले तरी होईल...आणि नाही झाले तरी प्रयत्न करुन पहायला काय हरकत?" या विचाराने वाढते. या झुंडीतील लोक आज दत्ताला दिसले तर उद्या तेच लोक तुळजाभवानीलाही किंवा साईबाबालाही दिसनार नाही असे नाही. पण नव्या विचारसरणीच्या लोकांना मात्र प्रयत्नपुर्वक प्रयत्न करून अनुयायी मिळवावे लागतात. मिळवले तर ते टिकवावेच लागतात. कम्युनिस्टांनी त्यासाठे केवढे उपद्व्याप केलेत हा आता जागतिक इतिहास आहे. असो.

पण मुळात संघटन होण्यामागे मानवी जीवनातेल असुरक्षितता आहे व त्यावर मात करण्यासाठी माणूस धर्म किंवा विचारधारा यांच्याशी अक्षरश: "नियतीशरणता" दर्शवतो हे वास्तव नाही काय? देव/धर्म मानणारे व देव/धर्म न मानणारे यांच्या संघटनांत मौलिक भेद नाही कारण दोन्हींचा जन्म मुळात मानवाला मुक्ती/मोक्ष देत संकटमूक्त करण्यासाठी होत असतो. किंबहुना वरकरणी तरी ते तसे दाखवण्यात यशस्वी होतात. खरे हेतू काहीही असोत. स्वत: भारतातील बाबा-साध्व्या अत्याचार करत जात कोठडीबंद होतात. म्हणजेच स्वत:चे जीवन जे सुरक्षित करु शकले नाहीत ते दुस-यांचे काय करणार? पण अनुयायी हे समजावून घेण्याच्या मानसिकतेत नसतात. किंबहुना अनुयायांची विचारशक्तीच या मंडळीने एवढी खंडित केलेली असते कि त्यांच्या विवेकाचा मृत्यू झालेला असतो. अशा स्थितीत ज्या बाबींनी  धर्म अथवा अन्य संघ निर्माण केले त्या बाबीचे निराकरण कसे होणार?

पण सर्वात महत्वाची बाब येथे समजावून घ्यावे लागते. एक संघटन होते तिचा स्वसंघटनेतील लोकांच्या हिताचा जरी असला तरी परसंघटनेतील हिताचा नसतो तर ते उध्वस्त व्हावे, नष्ट व्हावे हाच असतो. या द्वैतातून जो संघर्ष निर्माण होतो तो आपण सोव्हियेट रशिया व अमेरिका या दोन वेगळ्या, परस्परविरोधी राष्ट्रांतील दिर्घ काळ चाललेल्या शीतयुद्धातून पाहिला आहे. परस्परांनी एकमेकांना संपवण्यासाठी काय कारवाया केल्यात तेही पाहिले आहे. अण्वस्त्रस्पर्धा ही एकमेकांत भय/असुरक्षितता माजवण्यासाठीच होती हे उघड आहे. भयभितांनी भयभितांवर राज्य करण्याचा हा एक अश्लाघ्य, पण अपरिहार्य मार्ग होता असेच म्हणावे लागेल!

असुरक्षितता आणि दहशतवाद

दहशतवादही असुरक्षिततेच्या भावनांतून जन्म घेतो हेही आपल्याला समजावून घ्यावे लागेल. दुस-या विरोधी गटाला असुरक्षित वाटावे यासाठी दहशतवादी कारवाया केल्या जातात असे दहशतवादाचे मानसशास्त्र सांगते. परंतू दहशतवादीही टोकाच्या असुरक्षित भावनेतुनच निर्मण कसे होतात यावर फारसा विचार केला जात नाही. "धर्म संकटात आहे" अशी हाळी दिली कि धर्मवादी भयभित होत एकत्र येतात. मुळात संघटन अथवा झुंड ही नेहमीच भयग्रस्तांची असते. भय निर्माण करणारी समाजनिर्मित कारणे अनंत असतात. महाराष्ट्राचे एक उदाहरण घेऊ. संभाजी ब्रिगेडच्या उदयापुर्वी ब्राह्मण समाज जातीच्या आधारावर कधीही संघटित होण्याच्या प्रयत्नांत नव्हता. पण ब्रिगेडने समस्त ब्राह्मणांनाच सातत्याने विद्वेषपुर्ण टार्गेट केल्यामुळे ब्राह्मणांची संघटना बनली. एवढेच नव्हे तर ब्राह्मण जातीला अत्यंत विसंगत असे परशुरामाचे प्रतीक निवडले गेले. आम्हीही हत्यार उचलू शकतो हा संदेश त्यातून द्यायचा होता. मध्यपुर्वेतेल मुस्लिम आज ज्या संघर्षातून जात लाखोंचे बळी चाललेत त्यामागेही युरोपिय/अमेरिकन जगाने त्यांच्यात निर्माण केलेली पराकोटीची असुरक्षिततेची भावना आहे. असुरक्षिततेतुन माणसे एकत्र येतात. ते एकतर दबून जगायचा प्रयत्न करतात किंवा त्याउलटची हिंसक प्रतिक्रिया देतात. आम्ही असुरक्षित आहोत तर तुम्हीही सुरक्षित राहू शकणार नाही हा इशाराच त्यांना द्यायचा असतो.

भारतात मुस्लिम द्वेषने मुस्लिम संघटित झाले, हिंसक कारवायाही त्यांनी केल्या. ब्राह्मण द्वेषामुळे जशी ब्रिगेड अवतरली तसेच ब्राह्मणही संघटित झाले. दलित द्वेषामुळे दलितही संघटित झाले. संघटन सकारात्मक क्वचित होते. विध्वंसकता व इतर समाजघटकांवर/राष्ट्रांवर जरब बसवणे, दबाव गट निर्माण करणे, म्हनजेच इतरांत भय निर्माण करणे हेच छुपे हेतू त्यामागे असतात. उद्योजकांच्या संघटनाही काही वेगळे वागत नाहीत.

थोडक्यात सर्वांनीच सर्वांना असुरक्षिततेलाच जन्म द्यायचा घाट घातला असेल तर नैसर्गिक असुरक्षिततेवर/भयावर मात करण्याची पर्यायी साधने माणूस कसा शोधणार? देव/धर्म या कृत्रीम मार्गांनी ते साध्य झालेले नाही हे आपण इतिहासाचा आढावा घेतला तर सहज सिद्ध होते. पण वैज्ञानिक मार्गांनीही ते ध्येय साध्य होत नाही हेही तेवढेच खरे आहे. सर्वसामान्य माणूस अजून एवढा प्रगल्भही झालेला नाही कि मुळात अनिश्चितता हाच निसर्गाचा नियम आहे आणि ती कोणीही, अगदी विज्ञानही संपवू शकत नाही. भयावर मात करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जीवन आहे तसे स्विकारत प्रयत्नांतून जेही साध्य करायचे ते प्रयत्न करावेत. माणसाच्या जीवनात माणसांनी ढवळाढवळ करत त्याला अधिक असुरक्षित बनवू नये. यासाठी माणसांना निरिश्वरवादी/निधर्मवादी बनवायचे घाट घालण्यापेक्षा माणसांना माणसांचे मानवी जीवन सामाजिक व कायद्यांच्या चौकटीत जगण्याचे स्वातंत्र्य द्यावे. पुरोगामी म्हणवणारे स्वत:चे संघ बनवतात.

श्रद्धेचे मुळकारण समजावून न घेता त्यामुळे प्रा. शेषराव मोरे जर "पुरोगाम्यांचा दहशतवाद" अशी सज्ञा वापरत असतील तर तो त्यांचा दोष नाही. पुरोगाम्यांचा आहे. माणसाला प्रगल्भ करणे, विचारी बनवणे हे पुरोगाम्यांचे खरे कार्य आहे. त्यांच्या श्रद्धांवर हल्ले करण्याचा तेंव्हाच अधिकार आहे जेंव्हा तुम्ही त्यांच्या भयाच्या आदिम भावनेवर मात करण्याचा पर्याय देवू शकाल.  मनुष्य जेंव्हा प्रगल्भ होतो तेंव्हा त्यालाच देव-धर्माच्या बंधनांची गरज भासत नाही. नाहीतर जसा परंपरागत कर्मकांडांचा एक धर्म आहेच तसाच पुरोगाम्यांचाही धर्म बनेल आणि माणसाची मुलभूत समस्या सुटण्याऐवजी ती अधिक गुंतागुंतीची बनेल.

मनुष्य यावज्जीव असुरक्षित व भयग्रस्तच राहिल!

-संजय सोनवणी

(साहित्य चपराक, दिपावली विशेषांक - २०१५ मद्ध्ये प्रसिद्ध झालेला लेख.)

11 comments:

  1. सोनवणी सरांचे अभिनंदन ! इतका प्रदीर्घ लेख लिहून आपण बऱ्याच मुद्द्यांना स्पर्श केला आहे
    खरेतर प्रत्येक परिच्छेदावर एकेक लेख होईल , आपल्यावर टीकाही बरीच होईल असे दिसते , कारण आपण म्हणता की
    "मुळात माणसाला देवा-धर्माची मानसिक गरज का भासते या प्रश्नाच्या मुळाशी भिडल्याखेरीज देव-धर्माविरुद्धचा पुरोगामीपणा हे अवघे थोतांड आहे हे समजुन चालावे."
    आपण इतके धाडस केले आहे त्याबद्दल आपले अभिनंदन ! आजकाल स्वतःला पुरोगामी म्हणवून घेण्याची स्पर्धाच दिसते सर्वत्र , पण विचारांचा पुरोगामीपणा आणि तो आचारात आणणे , त्यातही बाजूच्या श्रद्धाळू वर्गाला न दुखावता - हे फारच कठीण काम पुरोगामी वर्गाला करायचे असते , पण त्याची तमा न बाळगता त्यांचे नकारात्मक वक्तव्य चालू असते . नुसते समोरच्याला धोपटत सुटल्याने तुमचा मुद्दा खरा ठरतो किंवा लोकांच्या गळी उतरतो असे मुळीच नाही. नीट अभ्यास केला तर असे दिसते की पुरोगामी चळवळ जितकी फोफावायला हवी तितकी फोफावलेली दिसत नाही - याची कारणे काय ? दरवेळी सनातनी सारख्या संघटनाना दोष देऊन आपले अपयश झाकण्यात अर्थ नाही.असो .
    संजय सरांनी भीती हा मुद्दा अतिशय तार्किक रीतीने सिद्ध केला आहे .
    " आईच्या गर्भात मूल असते त्यावेळेस ते उबदार वेष्टनात अत्यंत सुरक्षित असते , आणि जेंव्हा ते जन्म झाल्यावर गर्भातून बाहेर येउन पहिला स्वतंत्र श्वास घेते त्यावेळेस जी भीती त्याच्या मेंदूवर कोरली जाते ती असते प्रत्यक्ष अनुभवातून !खरीखुरी मूर्तिमंत भीती." असे मी कुठेतरी वाचले होते.
    देव ही कल्पना कशी निर्माण झाली हेपण आपण सुंदर प्रकारे सांगत आला आहात . समाजात "बळी तो कान पिळी" या न्यायाने पहिले नेतृत्व निर्माण झाले असावे असे वाटते आणि त्यानेच पुरोहित वर्गाला जन्म दिला असावा.
    आपला महत्वाचा मुद्दा मात्र पुरोगामी वर्गाला निश्चित अंतर्मुख करील हे नक्की . दुर्दैवाने आज पुरोगामी विचाराना नेतृत्व उरलेले नाही ,आणि डॉ दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्या अकाली जाण्याने चळवळीत एक पोकळी निर्माण झाली आहे , लवकरात लवकर ही पोकळी समर्थपणे भरून निघेल अशी आशा करुया !

    ReplyDelete
  2. इतका उत्कृष्ट लेख आहे आणि एकदा वाचायला लागले की अर्धवट ठेवता येत नाही , त्याचे रसग्रहण म्हणजेसुद्धा अवघड काम आहे . जितक्या सहजतेने देव ही कल्पना सर्व जगात रुजली तितकी दुसरी कोणतीही गोष्ट सर्वमान्य झाली नसेल अगदी सहजतेने देव आणि त्यानंतर दैव या कल्पनेने आपले जीवन व्यापून टाकले आहे आजही पुरोगामी आणि निरीश्वरवादी चळवळ कितीही मनापासून आवडली तरी आपणास पूजा अर्चा आणि नमस्कार , तसेच देवाकडे साकडे घालायचा मोह सुटत नाही - असे का ? कारण आपण या कल्पनेच्या विरुद्ध जायची मानसिक तयारीच केलेली नाही .
    मग तशी खरोखरीच निकड आहे का ? असा विचारांचा उलटा प्रवास मात्र लगेच वेगाने सुरु होतो . त्याची सुरवात स्वयंपाक घरातून होते आणि त्याला मान्यता मागच्या पिढीतील स्त्रियांची असते, अशा रीतीने नवीन विचार रुजायची यशस्वी सुरवात स्त्रियांच्या सहभागाशिवाय अशक्य ठरते.
    आपणाकडे खरे वैचारिक पुनरुत्थान (रेनेसन्स ) झालेच नाही . आपल्या वैचारिक चळवळी या राजकीय सूत्रांनी चालवलेल्याच राहिल्या , आणि सरतेशेवटी आपल्याला प्रत्येक गोष्ट राजकीय चष्म्यातून बघायची महाघातक सवय लागली, त्यामुळे आपल्याकडे स्वतंत्र वैचारिक क्रांती अशी झालीच नाही , आणि जुने विचार फाडून फेकून देण्याची अपेक्षित स्वप्ने अपूर्णच राहिली , त्याउलट सदासर्वदा समन्वयाच्या गोष्टींचीच चर्चा झाल्याने पुरोगामी चळवळीने प्रखरता कधी अनुभवलीच नाही . हीच पुरोगामी चालवली न रुजण्याची करूण कहाणी आहे .
    दुसरी गोष्ट म्हणजे कितीही वाईट वाटले तरी खऱ्या अर्थाने पुरोगामी म्हणजे काय याची चर्चा घराच्या उंबरठ्या पर्यंत पोचलीच नाही . आपले सण , आपली धार्मिक मते , आपली जागा व जगू द्या हि वृत्ती यामुळे वैयक्तिक वैचारिक घुसळण झाली नाही आणि पुरोगामी चळवळ थंडच राहिली त्याला पुनरूत्थानाचे वलय नसल्याने त्याकडे कोणी गांभीर्याने पाहिलेच नाही .
    साने गुरुजी असोत किंवा महात्मा गांधी ,त्यांच्या सुधारणा समाजातील चालीरीतींवर घाव घालणाऱ्या नसल्यामुळे ही समन्वयाची शोककथा सर्वांगाने भारतीयांचे नुकसान करत गेली ,
    त्यामुळेच राजकीय सांस्कृतिक किंवा सामाजिक चळवळी कधी उभारी धरू शकल्या नाहीत !
    आजही आपण दहशतवादाशी लढण्याची मानसिक तयारीही केलेली नाही ! आपण ती फक्त सरकारचीच जबाबदारी समजतो.

    ReplyDelete
  3. पुरोगामी म्हणवून घेणारा वर्ग हा नेहमीच मानसिक गोंधळात सापडल्या सारखा वागत आला आहे असे इतिहासावरून दिसते. त्यांचा कशाला विरोध असतो तेच स्पष्ट नसते आणि त्यांचे वागणे प्रतिक्रियात्मक दिसते.
    आपले सण आणि चालीरीती यात त्याना ठराविक वर्गाची पिळवणूक दिसते ,आपली धार्मिक पुस्तके आणि धर्मग्रंथ यात त्याना ब्राह्मण वर्गाचे वर्चस्व दिसते.

    आपल्या पंचांगाच्या प्रत्येक महिन्यात एकतरी सण असतोच आणि त्याचे उदाहरण पाहिले तर गौरी गणपती दसरा दिवाळी , आणि यात प्रत्येक सणामध्ये पुरोगामी लोकाना अंधश्रद्धा दिसत असते . थोडे चिंतन केल्यास असे दिसेल की श्रावणापासून सुगीचे दिवस साजरे करत हे सण आपल्या धर्मात एक सुंदर अर्थ भरत असतात .पण आहे त्याला विरोध म्हणून हे पुरोगामी सर्व प्रथानाच विरोध करत असतात , वेगवेगळ्या नावाखाली , कुणाला सर्प मैत्रीचा उमाळा येतो , कुणाला बैलपोळ्यात हिंसा दिसते तर कुणाला बली प्रतिप्रदा म्हणजे वैदिकांचा आक्रमक व्यवहार वाटतो , जिथे तिथे जगण्यातली गम्मत हिरावून घ्यायला जणू हे टपून बसलेले असतात , त्यांनी ठरवलेले जीवनाचे अर्थ हेच आदर्श आणि बाकीचे सांस्कृतिक संदर्भ ही समाजाची चाललेली फसवणूक आहे असा यांच्या अभ्यासाचा निष्कर्ष असतो . हा पुरोगामी वर्ग समाजाला सतत जागे करायचा ( ? ) प्रयत्न करत असल्या सारखा वागत असतो आणि स्वतःचे हसे करून घेत असतो , हे लोक कधी राखी बांधत नाहीत किंवा कधी आनंदाने लक्ष्मीपूजन साजरे करत नाहीत , यांना महाशिवरात्र निषिद्ध आणि आषाढी कार्तिकी तर अगदीच निषिद्ध !

    ReplyDelete
  4. आम्ही पुरोगामी
    आम्हास जातीची बिमारी
    श्रद्धा अंधश्रद्धा
    खेळते आमच्या दारी…!!

    अतिथि देवो भवः
    आमची संस्कृती ती न्यारी
    ठावुक नसते आम्हास
    राहतो कोण शेजारी..!!

    मन आमचे संस्कारी
    आमच्या परंपरा भारी
    सुधारणा करू पाहता
    आम्ही उगारतो तलवारी..!!

    साधी राहणी उच्च विचारसरणी
    आमची बैठक ही विचारी..
    मुखात नाम देवाचे
    अन वृत्तो व्यभिचारी..!!

    मावळे आम्ही शिवबांचे
    आमची बुलंद लालकारी..
    निष्ठा आम्ही वाहतो
    नित्य पैश्याच्या दरबारी…!!

    फुले आंबेडकरांचे विचार
    म्हणतो पोहचवु घरोघरी..
    मुखात एक मनात एक
    वाढे जातीयतेची दरी..!!

    कुठे आहे हो पुरोगामी
    कुठे भेटल सांगा तरी..
    दाभोळकर गेले,पानसरे झाले
    उद्या येईल तुमची बारी..
    उद्या येईल तुमची बारी…!!

    ReplyDelete
  5. समाजामध्ये वैज्ञानिक द्रूष्टीकोन रुजवण्यास कटिबध्द असणाऱ्या चळवळीत ज्यांना अंधश्रध्दा दूर व्हाव्यात असं वाटतं, त्या सगळ्यांना अगदी देव व धर्म मानणार्‍यांना सुध्दा प्रवेश आहे. अगदी देव व धर्म न मानण्यांच्या बरोबरीच्या प्रतिष्टेनं त्यांचंही स्वागत आहे. देव व धर्म मानणार्‍यांना या चळवळीत समान प्रतिष्ठा आहे. याचा अर्थ या चळवळीत समान प्रतिष्ठा आहे. याचा अर्थ या चळ ळीच्या मंचावरुन देव आणि धर्माचा प्रसार करण्यांच स्वातंञ्य आहे,असा कुणी घेऊ नये.अर्थात देव व ध्रर्म या विषयावर संघटनांतर्गत व बाह्य व्यासपीठावर या विषयावर आपापली मते मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार राहील.देव व ध्रर्म न मानणार्‍यांनाही राहील.देव व धर्म न मानणार्‍यांना आपली मते जेवढया ताकदीने मांढण्याची मुभा राहील.तेवढीच संधी देव व धर्म मानणार्‍यांनाही राहील.पण,ही मते व्यक्तिगत समजली जातील.ती संघटनेची अधिकृत मते मानली जाणार नाहीत,असा एक्मुखी निर्णय संघटनेनं घेतला आहे.गेल्या २९ वर्षापासुन याच धोरणांन चळवळींच काम सुरु आहे. यात काही नवं नसलं तरी अधिकृतपणे ही संघटनेची भूमिका आहे. कारण या चळ्वळीत अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते देव न मानणारे आहेत.ध्रर्माची उघडपणे चिकित्सा करणारे आहेत.त्या सर्वानीं ही भूमिका स्वीकारणे म्हणजे आजवर मांडत आलेल्या आपल्याच म्हणण्याला मूरड घालणे होय,असं वाटणं स्वाभाविकही होत.तरी पण त्यांनी अंधश्रध्दा निर्मुलन चळ्वळ हे एक व्यासपीठ आहे ,हे लक्षात घेऊन ही भूमिका स्वीकारली आहे.
    येथे वारंवार 'भूमिका' हा शब्द वापरत आहे.कारण वरील निर्णय हा स्ट्रॅटेजी अथवा सोईजी तडजोड नाही तर एक स्वतंञ विचार आहे ,हा मुद्दा व्यवस्थितरित्या समजावून घेतला पाहीजे.
    "देव व धर्म विषयक ही केवळ स्ट्रॅटेजी असती तर यांचा अर्थ असा झाला असता की ,मुळात संघटना देव व धर्माच्या विरुध्द आहे ,या समाजात देव व धर्म राहता कामा नये असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं पण सध्या असं सांगण्यात धोका आहे.म्हणून आम्ही हा मुद्दा मांडत नाही, त्याविषयी मूग गिळून राह्तो. पुढे सवड मिळताच आम्ही धर्म व देव यावर कडाडून ह्ल्ला करु" असं मत आमचं नाही.म्हणूनच ही स्ट्रॅटेजी नाही.केवळ चळवळ वाढीसाठी स्वीकारलेली सौयीची तडजोडी नाही.मग अशी भूमिका संघटनेने का स्वीकारली?आमचं मुख्य उद्दिष्ट समाजातल्या अंध्यश्रध्दा दूर करावयाच्या तो धर्म मानणारा आहे,एवढच नव्हे तर हे दोन्ही मुद्दे त्याच्या द्ष्टीने अगदी प्रामाप्रिय आहेत.ते सर्वसामान्य माणसाच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग बनले आहेत
    देव व धर्म मानणार्‍या व अगदी घट्ट कवटाळणा-या समाजाच्या अंधश्रध्दा दूर करावयाच्या असतील तर आपल्या देव व धर्म विषयक कल्पनांना धक्का लागणार नाही,असा विश्वास त्याला वाटला तरच तो अंधश्रध्दा म्हणजे काय ते समजून घेण्यासाठी आपण आधी अंधश्रध्दा व देव,धर्माचं नातं तपासून पाहू.
    अनेक पुरोगामी विचार करणा-यांना -यांच्या अभ्यासाआभ्यांसाआधारे प्रामाणिकपणे वाटतं की देव व धर्म ही कल्पनाच अंधश्रध्दा टिकून आहेत.देव व धर्म ही कल्पनाच अंधश्रध्दाचं खरं मूळ आहे.हे खरं आहे का?

    ReplyDelete
  6. आप्पा - संजय सरांनी उत्तम निवड केली आहे विषयाची आणि तितक्याच जबाबदारीने अनेकांनी त्याला उत्तरही दिले आहे आणि सर्व प्रकारच वाचनीय आणि संग्राह्य झाला आहे .
    बाप्पा - आता वाट पहायची ती अविनाश कऱ्हाडे , लिहा वाचा आणि इतर अनेक अभ्यासू लोकांच्या मतांची , त्यातच अविनाश पाटसकर यांची लेखणी सुरु झाली की मती गुंग होऊन जाते , आणि असे वाटू लागते की त्यांचे एक भाषण राजवाडे सभागृहात ठेवावे
    आप्पा - संजय सरांनी जर त्या बाबतीत पुढाकार घेतला तर आपणा सर्वाना एक ओजस्वी सखोल भाषण ऐकायला मिळेल असे वाटते .
    बाप्पा - पाटसकर काकांनी अनेक वेळा संजय सरांच्या ब्लोगवर दुर्मिळ आणि उपयोगी माहिती दिली आहे , त्याबद्दल सर्व पुरोगामी चळवळ आणि मी भारतीय त्यांचे सदा ऋणी राहतील असे म्हणायला वाव आहे
    आप्पा - संजय सर , आता आपल्याकडे अविनाश पाटसकर यांच्या सारख्या पाठीराख्यांचेबळ असेल तर सर्वांगीण सामाजिक वैचारिक आणि सांस्कृतिक क्रांती आता दूर नाही असे म्हायाला हरकत नसावी . हो ना संजय सोनावणी सर ?
    बाप्पा - इन्कलाब झिंदाबाद !

    ReplyDelete
  7. धर्माच्या रुपाने व्यक्त हसणारे दु:ख हे खर्या दु:खाचे प्रकट रूप असते. धर्म हा दबलेल्या दीनदुबळ्यांचा उसासा असतो. धर्म हा अनुत्साही परिस्थितीतला उत्साह असतो. सुखाचा केवळ आभास असणारा धर्म नाहीसा करण्याची मागणी करणे म्हणजेच ज्या परिस्थिती मुळे अशा आभासाची गरज भासते ती परिस्थिती नाहीशी करण्याची मागणी असते.
    माणसाने धर्म तयार केला, धर्माने माणूस तयार केला नाही. स्वत:च्या सामर्थ्याची जाणीव नसलेल्या माणसाची जाणीव म्हणजे धर्म.
    संजय साहेब अतिशय सुंदर लेख लिहील्याबद्दल धन्यवाद--------

    ReplyDelete
    Replies
    1. आप्पा-माननीय किशोर कोल्हे
      बाप्पा - आदरणीय किशोरजी , आपण अगदी मोजक्या शब्दात सुंदर मनोगत व्यक्त केले आहे
      आप्पा - माणसाने धर्म तयार केला, धर्माने माणूस तयार केला नाही. स्वत:च्या सामर्थ्याची जाणीव नसलेल्या माणसाची जाणीव म्हणजे धर्म. या दोन ओळी लिहून आपण हजारो शब्दात जे सांगणे होणार नाही ते सांगितले आहे
      बाप्पा - आपल्या सारख्यांची या ब्लोगला गरज आहे आपण असेच लिहित जा हि नम्र विनंती

      Delete
  8. फारच अवघड बौद्धिक घातले आहे. धर्म शब्द धरः मय अर्थात प्रत्येकाने धारण केलेले असा आहे. विंचवाचा धर्म डंख मारणे, सापाचा धर्म दंश मारणे, वाघाला वाघ म्हणा कि वाघोबा तो तुम्हाला खायचे सोडत नाही हा त्याचा धर्म आहे. त्यात भय व असुरक्षितता आहे व त्यातून उद्भवलेला दहशतवाद आहे. म्हणून प्राण्यांचा धर्म चुकीचा आहे असे म्हणणे हास्यास्पद आहे. मुळात माणूस हा एक प्राणीच आहे. धर्माची व्याख्या करताना इतका अप्रगल्भ दृष्टीकोन ठेऊन चालणार नाही. धर्म हि नैसर्गिक वृत्ती आहे ज्यात स्वरक्षण, वंशवाढ, भरण पोषण हे सगळे निगडीत आहे. त्यानिमित्ताने जे काही धर्मात येते ते सगळे मान्य आणि नैसर्गिक आहे. धर्म हा शब्द कळण्यासाठी आधी अधर्म शब्दाचा अर्थ समजावून घेतला पाहिजे. अधर्माचा अर्थ हा मानवी बुद्धीशी निगडीत आहे. सोळाव्या शतकापर्यंत मानवाची बुद्धी देव, धर्म, योग्य-अयोग्य हे शोधण्यात व्यस्त होती. त्यानंतर मानवी बुद्धीने मोठमोठे शोध लावले. हा मानवी मेंदूच्या उत्क्रांतीचा एक मोठा टप्पा आहे. त्याची कारणे ह्या लेखाचा विषय नाही. मात्र नवीन विज्ञावादाला कसलाच धर्म नाही. ह्या अधर्माचा फटका यत्च्यावत सृष्टीला बसलाय. आणि शेवटी उलटा फिरून तो मानवाला बसतोय. सगळ्यात जास्त भरडले जातात ते तिसऱ्या जगातील मानव आपल्यासारखे. विज्ञानवादी पाश्चात्य सृष्टीचा आणि प्राणीमात्रांचा कळवला दाखवतात तो किती नाटकी आणि स्वार्थ लोलुप आहे हे स्पष्टच दिसते.

    ReplyDelete
  9. मानवी बुद्धीच्या उत्क्रांतीचे टप्पे इसवी सन ००-००-००० असा पहिला टप्पा आहे ज्यात ख्रिस्त धर्माची स्थापना झाली. नव्हे तर मानवी अधर्माचा तो एक पहिला टप्पा होता. ज्यात निसर्गाशी नाळ जोडलेल्या प्राचीन मानवी धर्माला तिलांजली दिली गेली-ईश्वर एक आहे. झाड, सृष्टी, प्राणी हे देव नाहीत हे सांगितले गेले. कारण त्यापूर्वी हजारो नैसर्गिक शक्तींना, प्राण्यांना मानव देव आणि त्यांच्याशी केलेल्या व्यवहाराला धर्म असेच मानत होता. त्यावर कडी म्हणून ६ व्या शतकात इस्लामचा उदय झाला, त्याने तर इस्लाम (एका ईश्वराला) न मानणारा हा जगण्यास पात्र नाही हा फतवा काढून कहरच केला. अर्थात ह्या दोन्ही टप्प्यात काही नैसर्गिक आणि काही मानवी बुद्धीच्या विकृतीची (कृत्रिम) कारणे अंतर्भूत होती. नंतर १६ व्या शतकापासून मानव बुद्धीने असे नवीन शोध लावायला सुरुवात केली कि निसर्ग चक्र पूर्ण बदलून गेले. चावणाऱ्या विंचवाला परत पाण्यात सोडायचा आपला धर्म होता तो तर कधीच नष्ट झाला. कसा झाला हे शोधायचे ना आपल्याला भान राहिले न सवड. आपण फक्त पाश्चात्य वैज्ञानिकांच्या प्रयोगासाठी ठेवलेले पांढरे उंदीर आहोत. आपण त्यांनी केलेले प्रयोग सहन करत त्याला पुरोगामी म्हणत राहायचे इतकेच आपल्या हातात राहिले आहे. धर्म हा नुसता हिंदू, मुस्लिम, शीख असा नसून मानव धर्म, किवा सृष्टीचा धर्म असा व्यापक अर्थाचा आहे. प्राणिमात्रांची भाषा समजून घेणारे आपले पूर्वज आणि देवता ह्या आपल्याला भाकड वाटतात ह्यातच आपण किती फसलो आहे ते स्पष्ट होते. आत्ता उत्सवाला रस्त्यात होणारी प्रचंड गर्दी, घाण, अनुचित प्रकार ह्याला विज्ञान जबाबदार नाही का? आज दळणवळणाची साधने इतकी वाढलीत म्हणून आपण आपली बुद्धी गहाण ठेऊन गर्दी तयार करतो. कशासाठी तर तो एक उन्माद असतो. तो कुठेतरी काढायची घाई आपल्याला झालेली असते. ज्याच्याकडे हा उन्माद नसतो तो इकडे ढुंकूनही बघत नाही.

    ReplyDelete
  10. नाग-साप, गाई-बैल, वारुळे मुंग्या ह्यांना देव मानणारा आपला धर्म म्हणजे आपण बावळट आहोत का? जेव्हा प्रत्येक मानव त्याचे प्रत्येक कृत्य त्याच्या जगातील प्रत्येक जबाबदारीचा विचार करून करतो त्याला मानव धर्म असे म्हणावे. याशिवाय धर्माच्या नावाखाली गर्दी, गोंधळ, घाण करणे हा एक अधर्मच आहे हे आज प्रत्येक सुजाण नागरिकाला कळते. ज्यांना कळत नाही त्यांची बुद्धीच तितकी असते. शहाण्या माणसाने सध्या अशा परिस्थितीत उगाच त्रागा करून स्वतःला त्रास करून घेणे योग्य नाही. कारण ह्या अधर्माची कारणे नुसती हिंदू धर्माशी किवा वैदिक धर्माशी निगडीत नाहीत, तर ती विज्ञानाने विकृत केलेल्या समाजाशी सुद्धा निगडीत आहेत. प्रत्येक सजीव समोर असलेल्या परिस्थितीचा आपल्या बुद्धीने विचार करून वागत असतो व आपले जगायचे तत्वज्ञान पुढे रेटत असतो. त्यामुळे लोक असे वागतात. आपण कसे वागायचे हा आपला प्रश्न आहे. त्यांना अक्कल येईल तेव्हा तेही सुधारतील. नाहीतर त्या बावळट लोकांत आणि आपल्यात काय फरक आहे?

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...