Wednesday, May 10, 2017

भारतीय हेरगिरी आणि कुलभूषण


 Image result for kulbhushan jadhav in dawn


 Image result for kulbhushan jadhav in dawn


कुलभुषण जाधवमुळे भारतीय हेरगिरी हा चर्चेचा विषय बनली आहे. कुलभुषणला पाकिस्तानने फाशीची शिक्षा ठोठावल्यामुळे अस्वस्थ झालेल्या भारतीयांनी कुलभुषणला परत आणण्याची मागणी जोरात सुरु केली आहे. भारत सरकारनेही प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या कैद्यांची सुटका लांबणीवर टाकली आहे. कुलभुषणला फाशी दिली तर तो पुर्वनियोजित खुन ठरेल असेही भारताने सुनावले आहे. या सर्व प्रकरणाचे विश्लेशन आपण करुच, पण मुळात कुलभुषण जाधव हेर होता की नाही हे तपासून पाहणे गरजेचे आहे.

आपल्याला गुप्तहेर माहित असतात ते चित्रपट व कादंब-यांतून. त्यातील त्यांची साहसे, जीवघेणी कारस्थाने, सनसनाटी मारा-मा-या, श्वास रोखुन धरायला लावणारे पाठलागते वापरत असलेली अत्याधुनिक साधने इत्यादिंचे प्रचंड आकर्षण आपल्याला असते. इंग्रजीतील हेरकथांनी जगभरच्या वाचकांना वेड लावले आहे. जेम्स बाँड  सारख्या एमआय ६ या ब्रिटिश हेरखात्याच्या हेराने तर जगावर अद्भूत गारुड केले आहे आणि ते आजही कमी होत नाही. तुलनेने भारतीय म्हणता येतील अशा हेरकथा मात्र दुर्मीळ आहेत. मी १९८५ साली लिहिलेली "डेथ ऑफ द प्राईम मिनिस्टर" ही पहिली भारतीय राजकीय हेरकथा म्हणता येईल. नंतर मी पाकिस्तान व चीनच्या पार्श्वभुमीवर भारतीय हेरांवर आधारित कादंब-या लिहिल्या. त्यातील काही इंग्रजीतही अनुवादित झाल्या व गाजल्याही. पण पाश्चात्य लेखकांना जेवढी संदर्भ साधने त्या काळात उपलब्ध होती ती आपल्याकडे जवळपास अभावानेच असल्याने या लेखनावर मर्यादाही होत्याच. पण मी प्रत्यक्ष जीवनात खाजगी गुप्तहेर संस्थाही चालवली असल्याने मला प्रत्यक्षात फिल्डवर कसे काम चालते याचा प्रत्यक्ष अनुभव होता त्यामुळे मला माझ्या लेखनात आणता आली.

कुलभुषण जाधव या प्रकरणाने मला माझ्या "अंतिम युद्ध" या हेरकादंबरीची आठवण येणे अपरिहार्य होते. मुळात ही पाकिस्तानात घडणारी कथा. तिचा नायकही मराठी माणुसच. RAW या भारतीय हेरसंस्थेने त्याला सैन्यातुन उचललेले असते. पाकिस्तानात त्याला RAW तर्फे एक कट घडवुन आणण्यासाठी नांव बदलून, बोगस पार्श्वभुमी बनवून व प्रचंड ट्रेनिंग देवून पाठवले जाते. कराचीत हळुहळू उच्चभ्रू राजकीय वर्तुळात प्रवेश करत तो कशी माहिती काढत जातो व नंतर भारतीय वरिष्ठांच्या झालेल्या गैरसमजातून त्याच्या मागे कसे भारतीय हेर आणि मग पाकिस्तानी हेरही लागतात आणि त्याला कशी जीवावरची संकटे झेलावी लागतात याची सर्वसाधारण कथा या कादंबरीत होती. पाकिस्तानात भारतीय हेराला पाठवायचे तर काय किमान ट्रेनिंग द्यावे लागते याचेही चित्रण मी या कादंबरीत केले होते.

कथा-कादंब-या व चित्रपटातील हेर हे तुलनेने फारच गतीमान घटनांतून जातात. त्यात थरारकता असते. प्रणयी दृष्यांचीही रेलचेल असते. प्रत्यक्षात मात्र तसे क्वचितच असते. खरे म्हणजे हेरेगिरीमध्ये धोका प्रचंड असला तरी प्रत्यक्ष काम फार म्हणजे फारच संथ गतीने चालणारे व कंटाळवाने असते. प्रतिक्षणी सावध रहावे लागते ते एक्स्पोज होऊ नये म्हणून. आपली आयडेंटी ओपन होऊ नये म्हणून. हेराचे सर्वात महत्वाचे काम हे असते कि आपली खरी ओळख चुकुनही उघड होऊ नये अथवा साधी शंकाही येवू नये एवढ्या सावधगिरीने वागणे. असे होण्याची किंचित शंका जरी त्याला अथवा वरिष्ठांना आली तर ओळखीचा विस्फोट होऊन काही विपरित परिणाम होऊ नये म्हणून त्याला तत्काळ बाहेर काढले जाते. अर्थात हेही काम शिस्तीतच होते. यातही कसलाही गडबडगुंडा होऊ नये याची तयारी पुर्वनियोजितच असते. कारण प्रत्येक कामगिरीत सुचू शकतील त्या सर्व शक्यतांवर आधीच विचार केलेलाच असतो व सर्व शक्यतांत आपल्या माणसाला सुखरुप बाहेर कसे काढता येईल याची पुर्वतयारीही केलेली असतेच. किंबहुना प्रत्येक हेराचा तो वीमा असतो. आले मनात आणि पाठवले हेरगिरी करायला असे कधी होत नाही.

आपण येथे विदेशात जाऊन तेथे आयडेंटी बदलत हेरगिरी करणा-या अथवा एखादा कट राबवणा-या हेरांचाच विचार करत आहोत. हे काम वाटते तसे सोपे नसते. कोणतेही कट रातोरात अस्तित्वात येत यशस्वीही होत नाहीत. प्रचंड योजना त्यामागे असते. अनेक योजना दिर्घकाळ चालणा-या असतात. पाकिस्तानात (किंवा अन्य कोठेही) हेरगिरी करायची अथवा एखादा कट शिजवायचा तर हेराला जी नवी आयडेंटिटी दिली जाणार आहे ती संपुर्णपणे आत्मसात करावी लागते. ही आयडेंटीटीही अत्यंत विचारपुर्वक ठरवली जाते. त्या आयडेंटीटीचा बनावट पण अत्यंत विश्वसनीय इतिहास बनवावा लागतो. हेराला तो आत्मसात करावा लागतो. त्यातही जर पकडला गेलाच तर त्याच्याकडून कसलीही माहिती दिली जाऊ नये याचे तर अत्यंत कठोर ट्रेनिंग असते. पकडला गेला तर त्याला त्याचे सरकार कधीही स्विकारत नाही. त्याला सोडवण्याचे प्रयत्न होऊ शकतात, पण ते इतर मार्गाने. एक मार्ग म्हणजे बार्गेनिंग. इकडे पकडलेल्या हेराला सोडवण्याच्या मोबदल्यात आपल्या हेराची सुटका करवून घेणे हा मार्ग अधिक वापरला जातो. बाकी दबावासारख्या बाबी हेर किती प्रबळ राष्ट्राचा आहे यावरुन तो यशस्वी होणार कि अयशस्वी हे ठरते. पण राजनैतिक व अराजनैतिक पातळीवर प्रयत्न केले जातात. पण अधिकृतपणे आमचा माणूस हेर आहे हे कोणीही मान्य करत नाही हे ओघाने आलेच.

ज्या भागात पाठवायचे तेथील भाषा, संस्कुती, इतिहास हेराला माहित असलीच पाहिजे ही अपेक्षा अर्थातच असते. कोणत्याही भागात जेंव्हा एखाद्या हेराला पाठवले जाते तेंव्हा त्या भागात पुर्वी काहीतरी बेस वर्क केलेले असतेच. हे प्रारंभिक काम व्यापारी, प्रवासी, इतिहास-संशोधक अथवा पत्रकारितेच्या बहाण्याने गेलेल्या लोकांनी करुन ठेवले असते किंवा आधीच्या हेरांनी पाया बनवलेला असतो. त्याचाच उपयोग करत नवा हेर पुढे जातो. कोणती माहिती काढायची आहे व ती कोणाकडून मिळू शकेल याची संभाव्य यादीही आधीपासुनच तयार असते. हेर तसा एकाकी क्वचित असतो. अगदी मित्र राष्ट्रांच्या हेरयंत्रणाही मदतीला घेतल्या जातात. दुय्यम स्वरुपाचे सहायक कार्य करणारे हेर सोडले तर दिर्घ काळ एकाच ठिकाणी हेर ठेवण्याची चूक कोणतेही हेरखाते करत नाही. हेराने कोणत्या पद्धतीने काम करायचे हे जी माहिती मिळवायची आहे अथवा जो राजकीत वा घातपाती कट राबवायचा आहे त्याच्या स्वरुपावरुन ठरते.

महत्वाची बाब म्हणजे हे करत असतांना हेराला स्वत:चे आयुष्य नसते. स्वत:चा भुतकाळही नसतो. तो ज्या नांवाने काम करत आहे त्याचा जो काही बनावट इतिहास बनवला गेला आहे तोच इतिहास सत्यच आहे अशा पद्धतीने त्याला जगायचे असते. यातील चूक क्षम्य मानली जात नाही. कारण यामुळे त्या हेराचे प्राण तर संकटात येण्याची शक्यता असतेच पण तो ज्या राष्ट्रासाठी हेरगिरी करतो आहे ते राष्ट्र आणि शत्रू राष्ट्रातील संबंधही ताणले जाऊ शकतात. ते कसे हे आपण जाधव प्रकरणात पहातच आहोत.

पकडलेल्या हेराशी कसे वागायचे हे ते सरकार त्या प्रकरणाकडे कसे बघते, किती गोपनीय माहिती चोरली गेली आहे व हेर कोणत्या राष्ट्राचा आहे व त्याचे प्रभुत्व कितपत आहे यावरही ठरते. अनेक हेर हे दुतावासाचे राजकीय संरक्षण असलेले अधिकारी असतात. दुतावास हे हेरांचे अधिकृत ठिकाण असते असे म्हटले तरी वावगे होणार नाही. पकडले गेले अथवा संशय आला तर त्यांची मायदेशी हकालपट्टी करण्यापलीकडे व निषेध नोंदवण्यापलीकडे फारसे काही होत नाही. अत्यंत गंभीर बाब असेल तर असे राजनैतीक संरक्षण असलेल्या हेरांचे खुनही केले जातात. पण अशा घटना क्वचित झालेल्या आहेत. मायदेशी परत पाठवणे हाच मार्ग बव्हंशी वापरला जातो. पण हे भाग्य इतर हेरांना लाभत नाही. त्यामुळे त्यांनी अधिक सावधान असणे भाग असते.

भारतीय हेर हे बव्हंशी सेनादलांतुनच निवडले जातात. असे असले तरी दुय्यम-तिय्यम दर्जाचे हेर हे कोणीही असू शकतात. अगदी शत्रू राष्ट्रातील असंतुष्ट आत्मे हेरुन त्यांचाही उपयोग हेरगिरीसाठी केला जातो. त्याच वेळी आपले हेर किंवा वरिष्ठ अधिकारी शत्रू राष्ट्राला फुटु नयेत म्हणून प्रतिबंधात्मक लक्ष ठेवणारीही यंत्रणा असतेच. शत्रू राष्ट्राची मिळेल ती माहिती हाती असणे उपयुक्त असतेच. मग ती प्रादेशिक अस्मितांच्या संघर्षांबाबतची असो, राजकीय घडामोडींबाबत असो, सांस्कृतिक चळवळींबाबतची असो कि सामरिक सज्जतेबाबतची असो. कोणत्या माहितीचा कसा उपयोग करायचा याचे सखोल विश्लेषन हेरखात्यांच्या मुख्य कार्यालयांत केले जाते व त्यानुसार योजना आखल्या जातात. बव्हंशी योजना पाण्यातही जातात. पण हेरखात्यांचे बजेट ही नेहमीच गोपनीय बाब असल्याने त्याबाबत कसलीही आकडेवारी शक्यतो कोणीही प्रसिद्ध करत नाही.

पाकिस्तान व भारत

भारताचे पाकिस्तान व चीन हे महत्वाचे शत्रू आहेत हे वास्तव आहे. वांशिक व भाषिक भेदामुळे चीनमध्ये हेरगिरी करणे हे भारतीय हेरांसाठी जवळपास अशक्य असेच काम आहे. मी "बीजिंग कॉन्स्पिरसी" या कादंबरीत चीनमधील भारतीय हेराची अत्यंत सनसनाटी कादंबरी लिहिली होती. चीनमधील विद्यार्थ्यांच्या तिनानमेन्ह चौकात चिरडल्या गेलेल्या आंदोलनानंतर उरलेल्या विखुरलेल्या विद्यार्थ्यांना चिथावणी देण्याचा व व सशस्त्र बंड करायला प्रेरित करण्याचा कट कसा शिजतो व चीनी पंतप्रधानांची मुलगी यात कशी ओढली जाते याचे चित्रण या कादंबरीत होते. चीनमध्ये दुतावास हेच महत्वाचे साधन भारताला वापरता येते. तेथे पोलादी पडदा असा कि भारतीय हेरांना गोपनीय माहिती मिळवणे जव्ळपास अशक्य होऊन जाते. सीमावर्ती व व्याप्त प्रदेशात स्थानिकांच्या मदतीने हेरगिरी केली जाते. पण पाकिस्तानचे तसे नाही. वांशिक व भाषिक दृष्ट्या खरे तर या राष्ट्रात हेरगिरी करणे एवढे जड जाऊ नये. आर्थिक दारिद्र्य व लालच हे समान गुण भारतीयांत व पाकिस्तान्यांत आहेत. असंतुष्ट गटांची व फुटीरतावाद्यांची तेथे मुळात कमी नाही. त्यामुळे हेरगिरी करणे व फुटीरतावादाला प्रोत्साहन देणे हे तितके अवघडही नाही. आय.एस.आय. हेच कृत्य काश्मिरमध्ये आजही करते आहे. पंजाबमधील खलिस्तानवाद्यांना प्रशिक्षण ते शस्त्रसामग्री कोणी पुरवली हे तर जगजाहीर आहे.

RAW ही भारतीय हेरसंघटना आहे. शेजारी राष्ट्रांतील अंतर्गत माहिती मिळवत राहणे व सरकारला धोरणे ठरवण्यासाठी मदत करणे हे तिचे मुख्य काम आहे. १९६८ साली या संस्थेची स्थापना झाली. त्याला चीन युद्धाची पार्श्वभुमी होती. रामेश्वर नाथ काव यांच्या कालात या हेरसंस्थेला जागतिक प्रतिष्ठा मिळाली. बांगला देशाची निर्मिती आणि सिक्कीमचे भारतात विलिनीकरण या महत्वाच्या कामगि-या या संस्थेने बजावल्या. अशा अनेक छोट्या मोठ्या पण अत्यंत महत्वाच्या कामगि-या RAWने बजावलेल्या आहेत. RAWचे एजंट हे बव्हंशी सैन्यदले, पोलिस व रेव्हेन्यू खात्यांतीलही रिक्रुट्स असतात.

पाकिस्तान ही भारताची सर्वात मोठी कटकट आहे. पाकिस्तानला सहाय्य करायला चीनपासुन ते अमेरिकेपर्यंत बलाढ्य राष्ट्रे असल्याने पाकिस्तानचा उपद्व्याप सातत्याने चालुच असतो. तो कधी घातपाती कारवायांच्या रुपाने तर कधी दहशतवादी गटांना सक्रीय मदत करण्याच्या रुपाने आपल्याकडे नेहमी चर्चेत असतो. या राष्ट्राशी नेमके वागायचे कसे हा भारतीय धुरीणांसमोरील एक यक्षप्रश्न असतो. असे असले तरी गुप्तहेरांच्या पातळीवर हे युद्ध निरंतर लढले जातेच. काश्मिरमध्ये आज जी स्थिती आहे ती पाकिस्तानने निर्माण केली आहे यात शंका नाही. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारत काहीच करत नाही असेही नाही.

भारतात पाकिस्तानने फुटीरतावाद रोवल्याने भारतालाही प्रति-फुटीरतावादाचे शस्त्र काढणे भागच होते. त्यात पाकिस्तानचे तीन तुकडे पाडणे हा कट आखला जाणे स्वाभाविकच होते. ते कसे हे आपण खालील माहितीवरून लक्षात घेऊयात.

बलुचिस्तानः

पाकिस्तानचे जे प्रमुख राजकीय विभाग पडतात त्यात बलुचिस्तान हा मोठा भाग आहे. येथील मुस्लीम हे बलुची वंशाचे असून त्यांचं सांस्कृतिक-सामाजिक जीवन हे प्राचीन काळापासून स्वतंत्र राहिलेलं आहे. बलोची हे ऋग्वेदात "भलानस" नांवाने उल्लेखले गेलेले आहेत. १९४७ साली पाकिस्तान स्वतंत्र झाला तेव्हापासूनच बलुच्यांनी आपलं स्वतंत्र राष्ट्र असावं यासाठी चळवळ सुरू केली होती. पाकिस्तानमध्ये सामील व्हायला बलुच्यांचा पहिल्यापासूनच विरोध होता. परंतु कलात संस्थानाने १९५५ मध्ये पाकिस्तानमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांचा नाईलाज झाला. पण १९६० पासूनच स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी जोर पकडू लागली. त्यामुळे संपूर्ण बलुचिस्तानात अराजक माजलं. शेवटी पाकिस्तानला १९७३ साली इराणच्या मदतीने लष्करी कारवाई करून विद्रोह दडपावा लागला होता. यात हजारो विभाजनवादी क्रांतिकारी ठार झाले.

हे स्वतंत्रता आंदोलन चिरडण्यात पाकिस्तानला तात्पुरतं यश मिळालं असलं तरी १९९० नंतर ही चळवळ पुन्हा उभी राहिली. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि लष्कर--बलुचिस्तान या संघटनांनी पाकिस्तानमध्ये आजवर अनेक हिंसक कारवाया घडवून आणल्या आहेत. अर्थातच पाकिस्तानने त्यांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे.

बलुचिस्तान हा नैसर्गिक साधनसामग्रीने श्रीमंत प्रदेश असला तरी दारिद्र्याचं प्रमाण याच भागात खूप मोठं आहे. पाकिस्तानने या भागाचा विकास घडवून आणण्यात विशेष पुढाकार घेतल्याचं चित्र नाही. त्यामुळे आणि बलुच्यांच्या रक्तातच असलेल्या स्वतंत्रपणाच्या जाणिवांमुळे स्वतंत्र बलुचिस्तानची चळवळ थांबणं शक्य नाही. दुसरं महत्त्वाचं असं की बलुचिस्तानचा पश्चिम प्रभाग इराणमध्ये सध्या मोडतो. स्वतंत्र बलुचिस्तान होणं इराण्यांनाही अडचणीचं वाटत असल्याने याबाबतीत तरी इराण आणि पाकिस्तान हातात हात घालून आहेत. ही युती तोडता येणं भारताला प्रत्यक्षात कितपत शक्य आहे हा प्रश्न असला तरी भारताने या बाबतीत प्रयत्न करने आवश्यक आहे. जाधवांची कैद अथवा अपहरण इराणमधून झाले ही माहिती खरी असेल तर यातील इराणचा हातही तपासून पाहिला पाहिजे हे नक्की.

लष्कर--बलुचिस्तान आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या दोन्ही गटांत सामंजस्य घडवून आणत भारत त्यांना आर्थिक आणि सामरिक मदत मोठ्या प्रमाणावर पुरवू शकतो असे तर्क पुर्वी केले गेले आहेत. त्यात मीही होतो. अर्थात तसं करण्यासाठी भारताला अफगाणिस्तानची मदत अत्यावश्यक आहे जी भारत घेत असावाच असा अंदाज करायक्ला पुष्कळ वाव आहे.

पख्तुनीस्तानः

पाकिस्तानचा एक दुसरा मोठा प्रदेश म्हणजे पख्तुनीस्तान (पश्तुनीस्तान) होय. हाही प्रदेश सध्या पाकिस्तानची डोकेदुखी बनलेला आहे. याचं कारण म्हणजे बलुच्यांप्रमाणेच पख्तून (पुश्तू) लोकांचीही स्वतंत्र संस्कृती आणि अस्मिता आहे. पख्तून ही पुरातन जमात असून तिचा उल्लेख ऋग्वेदातही "पख्त" नांवाने येतो. दाशराज्ञ युद्धात भाग घेतलेल्या एका टोळीचं नाव पख्त असं आहे. तेच हे पख्तून लोक होत. सरहद्द गांधी म्हणून गौरवले गेलेले खान अब्दुल गफार खान हे पख्तूनच होते. पाकिस्तान स्वतंत्र होण्याआधीपासूनच पख्तून लोकांची स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगण्याची अथवा अफगाणिस्तानात सामील होण्याची मागणी होती. याचं कारण म्हणजे अर्धाअधिक पख्तुनीस्तान अफगाणिस्तानात आहे. संस्कृती आणि भाषा हा सर्वांचा समान दुवा असल्याने सर्व पख्तुनांचं एक राष्ट्र असावं अथवा अफगाणिस्तानात विलीन व्हावं ही मागणी तशी न्याय्यही आहे. ब्रिटिशांनी आपल्या फोडा आणि राज्य करा या प्रवृत्तीस अनुसरून १८९३ साली पख्तुनीस्तानची विभागणी केली होती.

ज्या रेषेमुळे ही विभाजणी झाली तिला ड्युरांड रेषाम्हणतात. ही रेषा पख्तुनांना स्वाभाविकपणेच मान्य नाही.

खरं तर १९६५ आणि १९७१च्या भारत-पाक युद्धकाळात पख्तुनीस्तानला स्वतंत्र होण्याची संधी होती. पण केवळ पाकला युद्धकाळात अडचणीत न आणण्याचा निर्णय काही पख्तून राष्ट्रवाद्यांनी घेतला. तो निर्णय चुकीचा होता हे आता पख्तुनांना समजलं असलं तरी राजकीय पटलावर बर्याच हालचाली झाल्या असल्याने पख्तुनांचा विद्रोह आज तरी सीमित आहे.

दुसरी महत्त्वाची बाब अशी की आज अफगाणिस्तानातील जवळपास ४५ टक्के लोकसंख्या ही पख्तुनांची आहे. पाकिस्तानातील पख्तुनीस्तान अफगाणिस्तानमध्ये यावा यासाठी अफगाणी सरकारने पूर्वी बरेच प्रयत्न केले असले तरी खुद्द अफगाणिस्तान तालिबान्यांमुळे यादवीत सापडल्याने पुढे पाक-अफगाण राजकीय चर्चेच्या पटलावर हा विषय मागे पडला.

बलुच्यांची जशी स्वतंत्र संस्कृती आणि भाषा आहे त्याप्रमाणेच पख्तुनांचीही असल्याने पाकिस्तानचा प्रभाग म्हणून राहण्यात त्यांना विशेष स्वारस्य नाही. त्यात शिया-सुन्नी हा विवाद आहेच. पाकिस्तानातील बव्हंशी दहशतवादी घटनांमागे पख्तून आणि बलुची राष्ट्रवादीच असतात हेही इथे लक्षात घ्यायला हवं. या असंतोषाला भारतच (RAW मार्फत) खतपाणी घालतो हा पाकिस्तानचा जुना आरोप आहे. त्यात मुळीच तथ्य नसेल असं म्हणता येत नाही. किंबहुना तेच होणे संयुक्तिक आहे.

परंतु या प्रयत्नांना अधिक व्यापक आणि धाडसी स्वरूप देणं ही काळाची गरज आहे. भारत-अफगाण संबंध हे चांगले राहिले आहेत. याचं कारण म्हणजे तालिबानी राजवट उद्ध्वस्त करण्यासाठी अफगाणिस्तानला मदत तर केलीच परंतु त्या राष्ट्राच्या नवउभारणी प्रक्रियेत सर्वात मोठं योगदानही दिलं. २०११ मध्ये भारताने अफगाणिस्तानशी भागीदारी करारही केला. रशियाच्या आक्रमणानंतर झालेला हा अफगाणिस्तानचा पहिला करार होता. ‘भारत आमचं बंधुसमान असलेलं राष्ट्र आहेअशी प्रतिक्रिया अफगाणी विदेश मंत्रालयाने दिली होती. थोडक्यात भारताचे अफगाणिस्तानशी वाढत असलेले संबंध अन्य सामरिक संबंधांप्रमाणे पाकिस्तानचे तुकडे करता यावेत किंवा गेला बाजार पाकिस्तानवरही फुटीची टंगती तलवार लटकत ठेवणे याही हेतुने असण्याची मोठी शक्यता आहे. दुर्दैवी योगायोग म्हणजे मी गेल्या महिन्यातच पुर्ण केलेल्या "धोका" या कादंबरीतुन भारत हे पाकिस्तानला तोडण्याचे कारस्थान साध्य करण्यासाठी कोणते डावपेच लढवतो व ते यशस्वी होतात का हे दर्शवणारी थरारक कादंबरी पुर्ण केली आणि हे जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेचे वृत्त आले.

ते असले तरी भारतियांना ही बाब मान्य करावीच लागेल कि पाकिस्तानातील फुटीरतावाद फोफावला नाही तर पाकिस्तानच्या काश्मिरमधील कारवायांवर आळाही बसणार नाही. यासाठी अफगाण नोर्दर अलायंसशीही RAW संबंध वाढवत हे असेही काही सुत्रे सांगतात. याला आपण प्रतिफुटीरतावाद म्हणू शकतो. आता या पार्श्वभुमीवर कुलभुषण जाधव हे खरेच हेर आहेत काय, असले तर कोणत्या दर्जाचे हेर असतील आणि भारत मुळात काही चुका करत आहे काय याचा आपण तटस्थपने, हाती जी माहिती आहे त्यावर आधारित, चर्चा करणार आहोत!

एक बाब स्पष्ट आहे कि अशा महत्वाकांक्षी योजना एकट्या-दुकट्या हेरांच्या जीवावर आखल्या जात नाहीत. भारत गेला अनेक काळ आपले काम पुढे रेटत राहिला आहे. अफगाण-इराण-रशिया-अफगाणिस्तान आणि अमेरिकेतील सतत बदलत राहिलेले भुराजकीय संबंधही योजनेत कधी गती देणारे तर कधी पुर्ण रुकावट टाकणारे राहिलेले आहेत. असे असले तरी तेथे बलुचीस्तान व पख्तुनीस्तानातील फुटीरतावादी नेते व त्यांच्या सहका-यांच्या नेहमी संपर्कात राहत त्यांना वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रसामुग्री ते अर्थपुरवठा करत राहणे व त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी जागतिक मत अनुकूल बनवणे हे महत्वाचे कार्य हेरांमार्फत व अन्य पातळ्यांवरुनही करणे भारताला महत्वाचे आहे. घातपाती कारवाया घडवून आनणे हा यातीलच एक प्रकार. यासाठीही वेगळ्या प्रकारचे हेर असणार, तसेच खुद्द त्या त्या प्रांतात राहत एकीकडे चळवळीवरही लक्ष ठेवणे व पाकिस्तानी सैन्याच्या संभाव्य कारवायांचीही माहिती घेण्याची गरज पडत असणार. यासाठी नियमित बदलले जाणारे हेरांचे एक जाळे त्या भागात विणले गेले असणे स्वाभाविक आहे.

येथे ही महत्वाची बाब नमूद केलीच पाहिजे ती ही कि पंतप्रधान मोदींनी जाहीर भाषणात या बाबीची वाच्यता केली जे आंतरराष्ट्रीय प्रतिमेच्या दृष्टीने अत्यंत चुकीचे होते. पाकिस्तान गेली अनेक वर्ष भारतावर पख्तुन आणि बलोची टोळ्यांना विभक्त करण्यासाठी कारवाया करत आहे असा जो आरोप करत होता त्याला अकारण मोदींनी बळ दिले. याची काही गरज नव्हती. सर्जिकल स्ट्राईक असोत कि अन्य कोणत्याही गुप्त कारवाया, त्या गुप्तच असायला हव्यात. असो.

हेर पकडला गेल्यावर खरा धोका असतो तो या जाळ्याची माहिती उघड होण्याची. ही माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानचे चौकशी अधिकारी हेराला बोलते करण्यासाठी अथवा खरा-खोटा जबाब मिळवण्यासाठी  कोणत्या थराला जाऊ शकतात याची एक चुणूक आपण सरबजितसिंग प्रकरणात पाहिली आहे. सरबजित खरेच दारुच्या नशेत वाट चुकुन पाकिस्तानात घुसला की ती योजनाबद्ध चाल होती हे सत्य आपल्याला समजू शकणार नाही. परंतू अंदाजच बांधायचा झाला तर ज्या पद्धतीने पाकिस्तानने सरबजितसिंगचा छळ केला व नंतर योजनाबद्ध खून केला त्यावरुन तो हेर असल्याची शक्यता नाकारता येत नाही. एका हेराच्या बदल्यात त्याच्या प्राणांपेक्षा महत्वाचे असते आधीच सुस्थिर झालेल्या हेरांच्या जाळ्याला वाचवणे. एक हेर घुसवण्यामागेच एवढी मेहनत घ्यावी लागते तर नवे जाळे उभे करायला किती कष्ट पडत असतील याची आपण कल्पना करू शकतो. 

कुलभुषण जाधव

कुलभुषण जाधवबाबतची आपली चर्चा ही भारतीय व पाकिस्तानी वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या माहितीवर आधारित आहे. या माहितीनुसार-

१. कुलभुषण जाधवला पाकिस्तानने ३ मार्च २०१६ रोजी अटक करण्यात आली असली तरी पाकिस्तानने या अटकेची अधिकृत घोषणा २४ मार्चला केली. कुलभुषणकडे मिळालेल्या पासपोर्टवर हुसेन मुबारक पटेल असे नांव असून त्यात तो मुंबईचा रहिवासी असल्याचे दर्शवलेले आहे. कुलभुषणची अटक बलोचीस्तानातील माश्केल भागात केली असे पाकिस्तानचे म्हणणे आहे तर पाकिस्तानने कुलभुषणला इराणमधून अपहरण केले व पाकिस्तानात आनले असा आरोप केला आहे. इराणमधील जैश-उल-अदिल या सुन्नी दहशतवाद्यांनी पाकिस्तानसाठी हे अपहरणाचे कृत्य केले असाही दावा केला जात आहे.

२. पाकिस्तानमधील माहिती वेगळीच पण परस्परविरोधी आहे. बलोचीस्तानचे गृहमंत्री सर्फराज बुग्ती यांनी कुलभुषणला चमन भागात अटक केली असे म्हटले होते. पण दुस-याच दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत जनरल असिम बज्वा (पाकिस्तानी आर्मीचा प्रसिद्धी विभाग) यांनी सांगितले कि कुलभुषणला सरवान येथे अटक करण्यात आली. यात विरोधाभास असा कि चमन व सरवान यातील अंतर जवळपास ९०० किलोमिटर आहे. चमन हे पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेजवळ आहे तर सरवान हे इराण-पाकिस्तान सीमेजवळ आहे.

३. कुलभुषण नेव्हीत अधिकारी होता. त्याने २००१ मध्येच स्वेच्छा निवृत्ती घेत स्वत:चा व्यवसाय सुरु केला होता. खास करुन इराणमधील बंदर अब्बास येथून तो काम पहात होता. पाकिस्तानचे म्हणने असे आहे कि जाधवने आपण २००३ पासुनच हेरगिरीच्या कामात सामील होतो, छबहार बंदरापासून कराचीला वारंवार जाणे सोपे होते असे त्याने कबूल केले आहे. मात्र RAW मध्ये तो २०१३ मध्ये सामील झाला आणि बलोच फुटीरतावाद्यांना भडकावण्याचे आणि घातपात घडवून आणण्याचे काम करत होता. यामध्ये अनेक पाकिस्तानी नागरिक ठार झाले. इराणमधुन पाकिस्तानमध्ये सरवान सीमेवरुन घुसत असतांना त्याला अटक करण्यात आली असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. शिवाय कुलभुषण अजुनही भारतीय नौदलात काम करत असून २०२२ मध्ये तो सेवानिवृत्त होणार आहे असाही पाकचा दावा आहे. त्यासाठी एक व्हिडियो सादर करण्यात आला असून त्यात जाधवचा कबुलीजबाब आहे. पण हा व्हिडियोच मुळात छेडछाड करून बनवण्यात आला आहे हे स्पष्ट दिसते. भारताने कुलभुषण हा आता नौदलात नाही अशीच भुमिका घेतलेली आहे.

४.  कुलभुषण जाधवचे फोन गुपचूप ऐकले जात असावेत व तो घरी फोन करतो, मराठीत बोलतो यामुळे त्याची ओळख फुटली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येतो. विशेष म्हणजे हा अंदाज भारतीय गुप्तचर खात्याचा आहे असा दावा पाकिस्तानी वृत्तपत्रे करतात.

वरील मोजक्या माहितीची छाननी केली तर आपल्या लक्षात खालील बाबी येतील.
कुलभुषणकडे मिळालेल्या पासपोर्टवर हुसेन मुबारक पटेल असे नांव असून त्याला जर पाकिस्तानात घुसतांना अटक केली असेल तर लगोलग तो पटेल नसून जाधव आहे हा तपास पाकिस्तानी हेरखात्याला लगोलग कसा लागला याचा उलगडा त्यातून होत नाही. त्याची अटकेची तारीख व ती जाहीर करण्याची तारीख पाहिली तर मधल्या तीन आठवड्यात त्याचा छळ केला गेला असण्याची शक्यता आहे. किंवा त्याचे फोन तो इराणमध्ये असतांनाच ऐकले जात असण्याची शक्यता आहे. पाकी हेरांना तो खरा कोण आहे याची माहिती आधीपासुनच असू शकेल. पण तसे घडायला नेमके कारण काय हे मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

प्रश्न असा उपस्थित होतो की RAW किंवा कुलभुषण खरेच हेर असेल आणि हुसेन मुबारक या नांवाने वावरत असेल तर तो आपल्या घरी कसा फोन करेल आणि मराठीत का बोलेल?एवढा बावळटपणा एक हेर, मग तो कोणीही असो, कसा करेल? जगातील कोणताही हेर जोवर एखाद्या कामगिरीवर आहे तोवर आपल्या आयुष्याशी ज्या लिंक्स असतात त्या पुर्णपणे तोडतो. किंबहुना तेच अभिप्रेत असते. कुलभुषण सांगलीला घरी फोन करुन मराठीत खरेच बोलत असेल आणि तो खरेच जर हेर असेल तर तो पकडला गेल्याचे दु:ख करायचे काही कारण नाही. उलट त्याने जी काही कामगिरी चालली होती त्यात मोठा अडथळा आणून भारताचे नुकसानच केले आहे असे म्हणावे लागेल. पण खरेच असे असेल का?

प्रश्न असाही उपस्थित होतो कि खरोखर त्याच्याकडे मिळालेला हुसेन मुबारक पटेल या नांवाचा पासपोर्ट भारतीय पारपत्र खात्याने कधी इश्यू केला होता काय? कि पाकिस्ताननेच तो बनावट बनवला व जाधवला अडकावले? भारताने अद्याप पर्यंत तरी या संदर्भात कसलेही निवेदन केलेले नाही. किंवा केले असले तरी वृत्तपत्रांत त्या संदर्भात माहिती आलेली नाही. भारत सरकारने हा पासपोर्ट जारी केलाच नसेल तर भारत सरकारने या बनावटगिरीवर आवाज उठवायला हवा. कारण भारताने हा पासपोर्टच मुळात इश्यू केला नसेल तर पाकिस्तानचे सर्व दावे निकाली निघू शकतात. पण अद्यापपर्यंत तरी तसे झाले नसल्याने व कुलभुषणवरील खटला चालून त्याला शिक्षाही ठोठावण्यात आली असल्याने याबाबत काय केले जाणार हा प्रश्नच आहे. मुळात कुलभुषणला अटक होऊन एक वर्ष उलटले आहे. या काळात भारताने त्याच्या सुटकेसाठी काय प्रयत्न केले हे आपल्याला माहित नाहीत. कुलभुषण सर्वसाधारण नागरिक असता तर भारत व आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानवर दडपण आणले असते. पण तसेही झालेले दिसत नाही. त्यामुळे एकंदरीतच हे प्रकरण हाताळायला आपण कमी पडलो आहोत की काय अशी शंका वाटते.

पाकिस्तानने कुलभुषणची अटक ते त्याचा व्हिडियो यात जी हकीगत आणली आहे ती परस्परविरोधी व छेडछाड केलेली आहे हेही उघड आहे. कुलभुषणची अटक नेमकी कोठे झाली? सरवान कि चमन येथे? भारताने मात्र जैश-उल-अदिल या दहशतवादी संघटनेने त्याचे इराणमधून अपहरण केले असा आरोप केला आहे. इराणच्या भुमीवरुन अपहरण झाले असेल व नंतर त्याला पाकिस्तानमध्ये नेण्यात आले असेल तर हा प्रकार आंतरराष्ट्रीय गुन्ह्यात मोडतो. इराणशी भारत चांगले संबंध बनवून आहे. इराणचे या प्रकरणात नेमकी काय भुमिका आहे? या संदर्भातही मौन आहे. याचा अर्थ इराणची मदत मागितली गेली नसेल असे नाही. भारताचे राजनैतिक संबंध कितपत मजबूत आहेत त्यावरून इराण मदत करणार की नाही हे ठरेल. पण आजवर तरी तशी मदत झाली आहे असे दिसत नाही. मग हा प्रकार काय आहे? की हे अपहरण इराण सरकारला मान्य करायचे नाही? का?

मी आधीच वर म्हटल्याप्रमाणे बलोचीस्तानात इराणचेही हितसंबंध अडकले आहेत. इराणची एरवीची भुमिका काहीही असले तरी बलोचीस्तानमधील स्वातंत्र्य लढा इराणमधील बलोच्यांतही विद्रोह निर्माण करू शकतो. त्यामुळे या बाबतीत इराणचे धोरण दुटप्पीपणाचे असू शकते. त्याबाबतीत भारत काय करणार आहे हाही प्रश्न आहे.

कुलभुषण २००१ मध्ये नेव्हीतुन निवृत्त झाला व त्यानंतर व्यवसायात पडला. यात नवीन काही नाही. सैन्यदलांतील अनेक अधिकारी स्वेच्छा निवृत्ती घेऊन व्यवसायात पडतात, नेव्हीत असल्याने व इराणमधील बंदरविकासासाठी भारत सरकार मदत करत असल्याने त्याचे नेव्हीत असतांनाच इराणी उद्योजकांशी संबंध येऊन त्याला व्यावसायिक संधी दिसली असल्यास नवल नाही. त्याने तेथे व्यवसायासाठी बस्तान बसवले हेही आश्चर्यकारक नाही. पण RAW साठी तो पार २०१३ पासून काम करू लागला हे अजब आहे. या माहितीत गफलत आहे. मग जाधव २००३ पासुन ते २०१३ पर्यंत नेमका कोणासाठी हेरगिरी करत होता?  ती सोडून २०१३ पासून तो RAW मध्ये कसा गेला?

जर त्याचे नांव बदलून, नवी आयडेंटी देत त्याला हेरगिरी करायला लावायची होती तर त्यासाठी विशेष प्रशिक्षण कसे दिले गेले नाही? ते दिले असते तर मुळात RAW त्याला बनावट नांवाचा का होईना, भारतीय मुळाचा पासपोर्ट का देईल? अन्य कोणत्याही देशाचा, अगदी पाकिस्तानी अथवा इराणी पासपोर्ट त्याला मिळवून देता येणे RAW ला अवघड नव्हते. RAW चा इतिहास पाहता अगदी सामान्य हेराबाबतही एवढा भोंगळपणा ती करेल याची शक्यता नाही. जर कुलभुषणला खरेच हेरगिरीसाठी वापरायचे असते तर सर्वप्रथम त्याचे मागचे आयुष्यच पुसण्यात आले असते. दुस-या देशाचा पासपोर्ट देण्यात आला असता. कुलभुषणला ऐन वेळीस मदत करु शकणारी यंत्रणा अस्तित्वात असती. कुलभुषणने चुकुनही घरी फोन केला नसता. तसे करणे हा सरळ सरळ आत्मघात आहे हे त्याला चांगलेच माहित असले असते.

पण तसेही झालेले दिसत नाही. बलुचीस्तान व पख्तुनीस्तानच्या फुटीरतावादाला बळ द्यायचे भारतीय धोरण नवीन नाही. पण त्यासाठी असल्या भोंगळपणाने त्या भागात हेर उतरवले जाण्याची शक्यता नाही. पाकिस्तानला भारतावर आरोप करण्याची संधी सोडयची नसते. त्यामुळे RAW कोणतीही कारवाई करतांना प्रचंड सावध असते. रविंद्र कौशिक या हेराला पाकिस्तानात घुसवले होते हा एक इतिहास येथे थोडक्यात पहायला हवा. वयाच्या तेविसाव्या वर्षी त्याचा धर्म बदलून, नांव बदलून त्याला पाकिस्तानात पाठवण्यात आले. तेथे शिक्षण पुर्ण करुन तो सैन्यदलात दाखल झाला. पार मेजर जनरल या पदापर्यंत तो पोहोचला. भारतासाठी माहितीचा खजिनाच उघडला गेला. १९७३ ते १९८३ हा तो काळ. तो उच्च पदावर पोहोचल्यावर मात्र त्याला माहिती पाठवता येणे अवघड व्हायला लागले. भारताने मग इनायत मसीह या दुस-या हेराला संपर्क केंद्र बनण्यासाठी पाकिस्तानात पाठवले गेले. पण तो पकडला गेला आणि रविंद्र कौशिकचे बिंग फुटले. पाकिस्तानला (व भारतालाही) हा मोठा झटका होता यार्त शंका नाही. पण भारताने तो हेर आहे किंवा त्याच्याशी भारताशीच काही संबंध आहे हे कधीही मान्य केले नाही. १९८५ मध्ये त्याच्यावर खटला चालवत त्याला देहदंडाची शिक्षा दिली गेली. पण आंतरराष्ट्रीय दबावामुळे पुढे फाशी रद्द झाली व त्याला कारावासात टाकण्यात आले. तेथेच त्याचा २००१ मध्ये मृत्यू झाला. पण भारत सरकारच्या द्रुष्टीने तो अनामिकच राहिला. हे अत्यंत स्वाभाविक आहे. भावनांचे जग हेरगिरीत कुचकामी असते हे आपण लक्षात घ्यायला हवे.

पण १९७३ साली एका हेराला पाकिस्तानात घुसवून त्याला पार सैन्यदलात उच्चाधिकारी बनवायची क्षमता असलेल्या RAW कडून कुलभुषणबाबत असला भोंगळपणा कसा होइल?

कुलभुषणचा कबुलीजबाब देणारा व्हिडियो अस्सल नाही. त्यात छेडछाड करत हवा तसा एडिट केला गेला आहे. त्याला नेमकी कोठे अटक केली याबाबत परस्परविरोधी माहिती पाकिस्तानने दिली आहे. त्याचा हुसेन मुबारक पटेल  नांवाचा पासपोर्ट त्याच्याकडे कसा मिळाला याबाबतही स्पष्ट माहिती नाही. त्याचा फोन  आधीपासुनच ट्यप होत होता असेही गृहित धरले तर मग त्याच्यावर आधीपासुनच पाकी हेरांना संशय होता हे मान्य करावे लागेल. हा संशयच मुळात त्यांना का आला? त्याची कसलीही कारणमिमांसा पाकिस्तानने दिलेली नाही. तो मराठीत बोलत होता यावरुन कोणाला संशय आला असे म्हटले जात असेल तर तेही अनैसर्गिक आहे कारण इराणमध्ये कोण मराठीत बोलतोय हे कसे इतरांना मराठी माहित असल्याशिवाय समजेल?

त्यामुळे कुलभुषणचे इराणमधून अपहरणच केले गेले असण्याचे शक्यता जास्त बळकट होते. एका भारतीय नागरिकाचे इराणच्या भुमीवरुन अपहरण व्हावे व त्याला पाकिस्तानात नेले जावे हा आंतरराष्ट्रीय गुन्हा आहे. त्याच्याकडे कसलाही पासपोर्ट मिळालेला नसून पाकिस्ताननेच तो बनावटपणे बनवला असण्याची दाट शक्यता आहे. भारताने तो पासपोर्ट जारी केला असता तर पाकिस्तानने जग डोक्यावर घेतले असते. पण तसे झालेले दिसत नाही.  इराणचीही या बाबतीत साथ मिळवणे भारतासाठी महत्वाचे आहे. पण त्यासाठी कुलभुषण हेर नव्हता ही बाब इराणच्या गळी उतरवता आली पाहिजे होती. जर्व तो हेर नसेल तर बलोचीस्तानातील इराणचे हितसंबंध अडचणीत यायचे कारण नाही. पण तसेही भारताने केल्याचे दिसत नाही. कुलभुषण जाधवबाबत इराणी वृत्तपत्रे शांत आहेत.

पाकिस्तानने कुलभुषण जाधव हे टार्गेट म्हणून निवडले असेल ते त्याच्या भारतीय नौदलाच्या पार्श्वभुमीमुळे. RAW अनेकदा आपले एजंट सैन्यदलांतुनच निवडते हे त्यांना चांगलेच माहित आहे. हेतू काय? भारतावर दबाव आणणे हाच! भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनाम करून काश्मिरमधील त्यांच्या कारवाया मात्र राजरोस करता याव्यात यासाठी हा खेळ केला गेला असण्याची शक्यता आहे. पण आंतरराष्ट्रीय समुदायासमोर हे मांडायला आपण कमी पडत आहोत कायआंतरराष्ट्रीय न्यायालयात भारत सरकार लगोलग का गेले नाही हाही प्रश्न येथे उपस्थित होणे आवश्यक आहे.

एकंदरीत घटनाक्रम पाहता व जी माहिती बाहेर आली आहे ती पाहता कुलभुषण जाधव हेर असण्याची शक्यता नाही. आणि जर असलाच तर तो हेर होण्याच्या मुळात योग्यतेचा नाही व RAW ही एक कुचकामी हेरसंस्था आहे असे म्हणावे लागेल. भारत कधीही, अगदी असला तरी, कुलभुषणला प्रकटपणे हेर असल्याचे कबूल करनार नाही. ती अपेक्षाही नाही. अपेक्षा ही आहे की पाकिस्तानवरील दबाव वाढवला जायला हवा. त्यासाठी उपलब्ध असतील ती राजनैतिक हत्यारे वापरली जायला हवीत. हेर नसलेल्या माणसाला हेरगिरी व हिंसक कारवायांच्या आरोपात फाशीची शिक्षा देत पाकिस्तानने अंतर्गत राजकारणही पाहिलेले आहे हेही येथे विसरता येत नाही.

कुलभुषण जाधव हेर नाहीत ही भारताची भुमिका बरोबर असली तरी आतापर्यंत त्यांना सोडवण्यासाठीचे प्रयत्न यशस्वी का झालेले नाहीत हे पाहणेच आता महत्वाचे आहे. पाकिस्तानवर दबाव वाढवण्यासाठी भारत पुढचे कोणते पाऊल उचलणार आहे हे महत्वाचे तर आहेच पण अन्यही काही विशेष स्थितीत वापरायची दबावतंत्रे अहेत. समजा हे असे काही इझ्राएली नागरिकाबाबत झाले असते तर त्यांनी जेथे आपल्या हेराला ठेवले आहे तो तुरुंग शोधून सर्जिकल स्ट्राईक करत आपल्या माणसाला सोडवले असते. किंवा एकाच्या बदल्यात आम्ही दहा जणांना फासावर चढवू असे धमकावले असते व वेळ आल्यावर तसे केलेही असते.  कंदाहार प्रकरणावरुन भारताला असे काही करण्याची इच्छाशक्ती आहे असे दिसत नाही. छुटपुट सर्जिकल स्ट्राईकचा इव्हेंट करणे वेगळे आणि आपले सामर्थ्य दाखवण्यासाठी संकटात सापडलेल्या एखाद्या आपल्या नागरिकाला काय वाट्टेल ते करुन सोडवणे वेगळे. आपले आंतरराष्ट्रीय धोरण, भारतीय नागरिक व भारतीय हेरांबाबतचे धोरण धरसोडीचे तर झाले नाहीहे ना याबाबतही गंभीरपणे विचार करावा लागणार आहे. अशामुळे नवीन हेर निर्माण करणे अशक्य होत जाईल हेही आपल्याला लक्षात घ्यावे लागेल.

तसेही मुळात येथे देशभक्तीचे उमाळे फुटणारे गल्लीबोलत असले तरी हेरगिरीसाठी लागणारे मानसिक धैर्य, स्वत:चे अस्तित्व पुसण्याची तयारी असलेले कुशाग्र बुद्धीचे नागरिक आहेत तरी किती हा प्रश्न आहे. फेसबुकवर गप्पा झोडणा-यांपैकी कितीजण आंतरराष्ट्रीय मित्र जोडतात व सांस्कृतिक राजदुताची भुमिका निभावतात? हेही महत्वाचे असते हे आम्हाला समजलेले नाही. आमचे राष्ट्रप्रेम हे वांझ आहे ते असे. अशा स्थितीत कुलभुषण जाधवसारख्या हेरगिरीचा आरोप ठेवल्या गेलेल्या भारतीय नागरिकाला पाकिस्तानच्या कचाट्यतून सोडवणे अत्यंत आवश्यक आहे.

कुलभुषण आता हेर आहे की नाही हा मुद्दाच नसून तो एक भारतिय नागरिक आहे हेच काय ते महत्वाचे आहे. राजकीय सुडासाठी उद्या कोणाही परदेशस्थ भारतियाला हेर म्हणून उचलून नेले जाईल आणि छळ करुन वाटेल तो कबुलीजबाब घेत नंतर फासावर चढवले जाईल. नागरिकांत ही अशी असुरक्षितता निर्माण होणे विघातक आहे. नागरिक व सरकारला ठाम धोरण बनवणे अत्यावश्यक होऊन जाते ते यामुळेच.

-संजय सोनवणी
९८६०९९१२०५
(साहित्य चपराक मासिकाच्या मे २०१७ अंकात प्रसिद्ध)

4 comments:

  1. डोकं सुन्न करणारा लेख आहे सर हा. केवढा प्रगल्भ अभ्यास आहे तुमचा. बापरे.

    ReplyDelete
  2. It is interesting hear that you run detective agency. Why not you write one blog to introduce yourself to all peoples from school life, career struggle up to today.

    ReplyDelete
  3. मस्तच खूप अभ्यासपूर्ण सर!मी तुमचा फॅन आहे ते ह्याच साठी सर!

    ReplyDelete
  4. छान ,खूप अभ्यास पूर्ण लेख आहे ......

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...