Saturday, July 22, 2017

असूर "सूर्य" : असूर संस्कृती



Image result for ashur god mesopotamia
जगातील सर्वात प्राचीन संस्कृती कोती? देवांची का असुरांची? असूर संस्कृती जवळपास अर्धे जग व्यापलेली संस्कृती होती याचे निर्णायक पुरावे आपल्या हाती आहेत. तुलनेने देव-संस्कृती अर्वाचीन. ब्राह्मण ग्रंथांतही असूर व देव हे प्रजापतीचीच अपत्ये असून असूर थोरले असे स्पष्ट निर्देशले आहे. ऋग्वैदिक देवता वरुण, अग्नी, इंद्रादि यांना आरंभीच्या ऋग्वेदकाळात आदरार्थी देव नव्हे तर असूर हे संबोधन वापरलेले आहे. पण असूर संस्कृतीची पुरातनता पहायला आपल्याला फक्त ऋग्वेद अथवा पुराणांवर अवलंबुन राहण्याचे कारण नाही. पारशी धर्मग्रंथ अवेस्ता ते असिरिया भागांतील अवशेष व त्यांचे इष्टिकालेख आपल्याला आता पुरावा म्हणून उपलब्ध आहेत. त्यावरून आपण असूर संस्कृतीच्या पुरानत्वाची आणि व्यापकतेची माहिती घेऊ शकतो. आज भारतात तरी असूर ही संज्ञा अत्यंत बदनाम झालेली असून पुराणांतील असूरांच्या मुळ कथांचे विकृतीकरण केले गेल्याने आज असूर म्हटले कि दुष्ट, मायावी, मनुष्यघातकी, नरभक्षक इ. वाईट बाबीच मनात येतात. पण आपण पुरातन वास्तव पाहिले तर मात्र आश्चर्याचा धक्का बसल्याखेरीज राहणार नाही. वस्तुता: असूर संस्कृतीची व्याप्ती भारत, पर्शिया (इराण-अफगाणिस्तान) ते सुदूर मेसोपोटेमिया व इजिप्त येथवर असल्याचे स्पष्ट पुराव्यांनिशी दिसून येते. 

असिरियन संस्कृती (असुरांची संस्कृती) ही मुळातच "अस्सूर" (अशुर/अशिर) या शब्दापासून बनली आहे. अस्सुर शहर हे टायग्रिस नदीच्या पश्चिम किना-यावर वसलेले होते. त्याचे अवशेष आजही इराकमद्ध्ये पहायला मिळतात. हे शहर इसपू २६०० मद्ध्ये वसवले गेले. अस्सुर ही या नगराचीच नव्हे तर असिरियन लोकांची प्रमुख देवता होती. असिरियन राजांच्या नांवातही "असूर" हा शब्द सामाविष्ट असे, जसे असूर बनीपाल, पुझुर असूर, असूर उबालित, अशूर निरारी वगैरे. असूर ही असिरियनांची मुख्य देवता होती व राजा हा असुराचा प्रतिनिधी म्हणून राज्य करत असे. म्हणजे खरा राजा असुरच (म्हणजे सुर्य) आहे व त्याच्यातर्फे मानवी व्यक्ती राज्य करतो अशी संकल्पना असिरियनांची होती. 

असूर म्हणजे सुर्यदेवता. किंबहुना सुर्यालाच असिरियन असूर असे म्हणत असेही स्पष्ट दिसते. असुर देवतेच्या प्रतिमांतही पंख पसरलेली सुर्य देवताच दर्शवली जाते. तो असिरियन पुराकथांत देवांचा देव आहे , पर्वताचाही देव आहे आणि असूर शहराचाही देव आहे. याच्या सन्मानार्थ असिरियात अनेक मंदिरे बांधली गेली. अगदी ख्रि
श्चन काळातही असिरियनांनी असुरपुजा सोडली नाही. 

असुराबरोबरच असिरियन लोक अन्य देवताही पुजायचे. किंबहुना प्रत्येक शहराची स्वतंत्र नगरदेवता असायची, जसे आपल्याकडे आजही प्रत्येक गांवाला व नगराला गांवदेव अथवा गांवदेवी असते तसेच. या देवतांत अनू, बल, एन्लिल, इश्तार, नाना (सिन) वगरे देवता होत्या. एका अर्थाने एक मुख्य देवता मानत बहुदेवतावादही असिरियन देवतांत होता असे स्पष्ट दिसते. असिरियन साम्राज्य सत्ताधारी वंश बदलत गेले असले तरी इसवी सनाच्या सातव्या शतकापर्यंत टिकले. 

इजिप्तमधील ओसिरिस (ओसायरिस, औसिर, असिरी) ही परिवर्तन, पुनरुत्थान, जन्म आणि मृत्युची देवता मानली जाते, अगदी आपल्या शिवासारखीच. अस्सूर या शब्दाचेच हे इजिप्शियन भाषेतील रुप आहे. ओसिरिसला आकाश, भुमी किंवा सुर्यदेवता "रा"चे अपत्य मानले जाते हेही येथे उल्लेखनीय आहे. 
असूर आणि सुर्य यातील संबंध येथे आपल्या लक्षात आला असेलच. असिरियनांसाठी असूर हा सुर्यच आहे तर काही इजिप्शियन पुराकथांनुसार तो सुर्यपुत्र आहे. हे साम्य येथेच संपत नाही. ऋग्वेदानुसारही "असूर" हे सुर्याचेच एक नांव आहे. फार नंतर प्राचीन इराणमध्ये जन्माला आलेल्या वैदिक धर्मातही असूर म्हणजे सूर्य असाच अर्थ खूप काळ घेतला जात होता. असूर म्हणजे महान (राजाप्रमाणे) प्रमूख, बलाढ्यही मानले जात. "माया" ज्यांना अवगत आहे असेही असूर वैदिकांनी चांगल्या अर्थाने उल्लेखले आहेत. असूर म्हणजे महान (राजाप्रमाणे) प्रमूख, बलाढ्यही मानले जात. "माया" ज्यांना अवगत आहे असेही असूर वैदिकांनी चांगल्या अर्थाने उल्लेखले आहेत. झरथुस्ट्राच्या धर्मात तर असूर हीच मुख्य देवता होती. ऋग्वेदात काही ठिकाणी सुर्यालाच असूर म्हटले आहे. उदा. खालील ऋचा पहा:





पश्यन्नन्यस्या अतिथिं वयाया रतस्य धाम वि मिमेपुरूणि |
शंसामि पित्रे असुराय शेवमयज्ञियाद्यज्ञियं भागमेमि || ( ऋ. १०.१२४.३)
दविधा सूनवो असुरं सवर्विदमास्थापयन्त तर्तीयेनकर्मणा |
सवां परजां पितरः पित्र्यं सह आवरेष्वदधुस्तन्तुमाततम ||  ( ऋ. १०.५६.६)
उक्षा समुद्रो अरुषः सुपर्णः पूर्वस्य योनिम पितुर आ विवेश |
मध्ये दिवो निहितः पर्श्निर अश्मा वि चक्रमे रजसस पात्य अन्तौ || (ऋ. ५.४७.३) 
पतंगमक्तमसुरस्य मायया हर्दा पश्यन्ति मनसाविपश्चितः |
समुद्रे अन्तः कवयो वि चक्षते मरीचीनाम्पदमिछन्ति वेधसः | (ऋ. १०.१७७.१)

या ऋचा व ऋग्वेदात विखुरलेले अन्य संदर्भ यावरुन लक्षात येते कि वैदिकांच्या दृष्टीनेही असूर ही मुळची सुर्यदेवताच होती किंवा सुर्यालाच ते असूरही म्हणत असत. असूर देवता निर्मितीचे कारण तर होतीच पण स्वर्गस्थान व अंतरिक्षही असुरांशीच निगडित होते. वैदिक साहित्यात असुर वीरांना स्वर्गाची मुले म्हटले गेले आहे.  असूर आणि सवितृ यांचे "सो्न्याच्या हातांचे" असे वर्णन १.३५.९-१० या ऋचांमध्ये करण्यात आला असून सवितृ हे सुर्याचेच एक नांव आहे हे आपल्याला माहित आहे व अनेक ठिकाणी सवितृलाही "असूर" हे संबोधन वापरले गेलेले आहे. असूर हे सुर्यपुजक होते असे १०.१७७ या ऋचेवरुन एस. कल्याणरमणही म्हणतात. असूर हे समाज म्हणून सूर्यपुजक व असूर हे संबोधन म्हणून सूर्यनिर्देशक असाच याचा अर्थ दिसतो. "पतंग" हा शब्द येथे सूर्याचे नांव म्हणून वापरला आहे. ऋग्वेदात सुर्याला अनेक नांवे असली तरी सुपर्ण असेही एक नांव आहे व ही नांवे असुरांकडेच निर्देश करतात असे डा. मालती शेंडगे यांनी सप्रमाण दर्शवले आहे.  अग्नी व प्रकाशालाही असूर म्हटले गेले ते मुळच्या असूर शब्दाच्या मूळ सूर्य अथवा त्यासम अर्थानेच हेही येथे लक्षात घ्यावे लागते. 

वैदिक साहित्यात सुर्यालाच असूर म्हटले जात होते हे वाचून धक्का बसणे स्वाभाविक आहे. पण हे एवढ्यापुरते मर्यादित नाही. वैदिकांनी नंतर असुरांना बदनाम करण्याची मोहिम काढली असली त
री त्याची कारणे सर्वस्वी सांस्कृतिक/धार्मिक संघर्षात आहेत. पण आरंभीचा वैदिक धर्म हाही असूरकेंद्रितच होता हे वरुण -इंद्रादि देवतांना आरंभी "असूर" हे संबोधन आदरार्थाने वापरले आहे यावरून सिद्ध होते. वैदिक साहित्यात नंतर मात्र असूर म्हणजे अंधार वा रात्र असा अर्थ होत होत शेवटी असूर म्हणजे दुष्ट असा अर्थ रुढ झाला. 

अहूर माझ्दा (सं. असूर-मेधा) हा झरथुस्ट्री धर्माचाही एकमात्र 
श्वर. देव हे या धर्मात दुष्ट पापी मानले जातात. अहूर हे असूर शब्दाचे पर्शियन रुप होय. अहूर माझ्दा हा विश्वनिर्माता व वैश्विक न्यायाचा रक्षणकर्ता असून त्याचा सर्वसाधारण शब्दश: अर्थ "उच्चबुद्धीमत्तेचा शक्तीशाली" असा घेतला जातो.  अहुर माझ्दाच्या धर्माची पुनर्स्थापना झरथुस्ट्राने उत्तर अफगाणिस्तानात ऋग्वेदाच्या समकालीन (इसपू १५००) केली. म्हणजे झरथुस्ट्राच्या पुर्वीही हा धर्म होताच परंतू त्यात अनेक अपप्रथा घुसल्या होत्या. त्या दूर करत झरथुस्ट्राने संदेष्ट्याच्या भुमिकेत जात अहूर माझ्द्याचा खरा धर्म लोकांना सांगायला सुरुवात केली. यात अहूर माझ्दा हा श्रेष्ठ ईश्वर असून ते सुर्याचेच एक नांव आहे. जरथुस्ट्री धर्मात प्रार्थना या अग्नी (सुर्याचेच एक रुप) किंवा सुर्यासमक्षच म्हटल्या जातात. झुर्वेनाइट ही झरथुस्ट्री धर्माचीच एक शाखा आहे. ही शाखा सुर्यालाच अहुर-माझ्द म्हणते. एवढेच काय पण खोतानी शक हेही अपभ्रंशित रुपात सुर्याला "अऊरमाझ्दे" म्हणतात. आजही अनेक इराणी बोलीभाषांत सुर्याला "ओर्मोझ्द" असेच म्हटले जाते हे झरथुस्ट्री धर्माच्या प्रकांड अभ्यासिका मेरी जोइस यांनी दाखवून दिलेले आहे. ( Boyce, Mary (1983), "Ahura Mazdā", Encyclopaedia Iranica 1, New York: Routledge & Kegan Paul, pp. 684–687)


असुरांसंबधी अन्य विवेचन करण्याआधी हे विवेचन अत्यंत महत्वाचे वाटल्याने आधीच केले आहे. असूर आणि सुर्य यातील अन्योन्य संबंध वाच
कांच्या लक्षात एव्हाना आलाच असेल. असूर म्हणवनारे लोक हे भारत ते मेसोपोटेमियापर्यंत पसरलेले होते. असूर हीच त्यांची मुख्य देवता होती. असूर हे सुर्याचेच संबोधन होते. सुर्य हा मानवी जगाचा अदिम काळापासून केंद्रबिंदू असणे स्वाभाविक आहे. काही समाजांनी आपल्या दैवत रचनेत त्यालाच केंद्रवर्ती स्थान दिल्याने त्याच्या भवती जी संस्कृती केंद्रित झाली तीच असूर संस्कृती होय.

सुर्य हा तत्कालीन जगाने अत्यंत गुढमय, रहस्यमय दृष्टीने पाहिला असल्यास नवल नाही. दिवस आणि रात्र ही विभागणी चांगले आणि वाईट याप्रमाणे करत आरंभिक कल्पना तेवढ्याच गूढ पद्धतीने विकसित केल्या जाने स्वभाविक होते. असूर या शब्दाची वैदिक व्युत्पत्ती " असू: म्हणजे प्राणवान-वीर्यवान या शब्दाला र हा प्रत्यय लागून असूर शब्द बनतो असे संस्कृतज्ञ म्हणतात. असूर शब्दाचा खरा अर्थ प्राणवान, वीर्यवान, पराक्रमी असा आहे हे भारतीय संस्कृती कोश (खंड १, पृ. ३३७) मद्ध्ये सांगितले आहे. परंतू ही व्युत्पत्ती कृत्रीम आहे हे उघड आहे. कारण असिरियन संस्कृतीची भाषा ही सेमेटिक गटातील आहे. या भाषेचा कथित इंडो-युरोपियन भाषांशी काहीही संबंध नाही. असूर, अस्सुर, अशुर, अशेर हे शब्द मानवाच्या आदिम भाषेतील आद्य शब्दसमुहापैकी एक असले पाहिजेत ज्यांचा भाषागटांशी काहीएक संबंध नाही. ड. आ. ह. साळूंखेही "असूर" शब्दाची व्युत्पत्ती अन्य भाषांतच शोधली पाहिजे असे "बळीवंश"मद्ध्ये म्हणतात. त्यामुळे असिरियन (अक्काडियन) लोक भारतात आले व त्यांनी सिंधू संस्कृती वसवली किंवा सिंधू लोकांनी असिरियन संस्कृती वसवली असे काही विद्वान (उदा. मालती शेंडगे, रा. ना. दांडेकर) प्रतिपादित करतात त्यात अर्थ नाही. सुर्याला कोणीतरी अधी असूर म्हणाले आणि तो शब्द विविध टोळ्यांत संक्रमित झाला व काही टोळ्यांनी सुर्यकेंद्रित असूर संस्कृत्या जोपासल्या एवढेच फारतर येथे म्हणता येईल. कोणतीही संस्कृती उदयाला आली कि ती विरोधात अथवा स्वतंत्रपणे इतरही संस्कृत्या निर्माण होतात. असूर धर्म आणि वैदिकांचा देव धर्म यात कशी फूट पडली त्यावरून आपल्या लक्षात येईलच. पुढे ऋग्वेदातच असूर हे मुख्य देवतांचे संबोधन गळून पडते आणि असूर हा शब्द कटाक्षाने केवळ शत्रुंसाठी वापरला जावू लागतो. हा सांस्कृतिक संघर्ष आपण पुढे समजावून घेऊ. अहूरमाझ्दा धर्मात असूर हे सृष्ट तर देव हे दुष्ट आहेत हे आपल्याला माहित आहेच. 

किंबहुना सूर्य हा वैदिक शब्द मुळच्या असूर या शब्दावरुनच साधला गेला असावा हे असूर आणि सुर्यामधील अभेदावरून दिसून येते. मग असूर्यचे सुर्य कसे झाले? त्याचे कारण पुरातन सांस्कृतिक संघर्षात आहे. असूरांच्या विरोधात "सुर" हा शब्द देवासुरांतील झगड्यामुळे निर्माण केला गेला. "सुर" हा शब्द संस्कुतात कृत्रीम व नंतरचा असून असूर हाच मुळचा शब्द आहे, असुर शब्दातील "अ" हा नकारार्थी नसून "असू:" या शब्दाला र हा प्रत्यय लागून तो शब्द बनला आहे असे डा. रा. ना. दांडेकर (वैदिक देवतांचे अभिनवदर्शन, पृ. ४३-४६) म्हणतात. सुर्य जर "सूर" या शब्दापासून बनवला गेला असेल तर असुर्य हाच शब्द मुळचा असायला हवा. असुर हा शब्दच मुळात सुर्यवाचक आहे हे आपण पाहिलेच आहे. 
असूर्य आणि सुर्य हे शब्द सोबतच काही ऋचांमध्ये ऋग्वेदात वापरले गेले आहेत. म्हणजे नंतरच्या काळात असूर्याची जागा सूर्याने घेत असूर शब्द स्वतंत्र (देव वा दुष्ट) उपाधी म्हणून वापरला जाऊ लागल्याचेही आपल्याला दिसते. असुर्य शब्द ऋग्वेदात वेगळ्या संदर्भात, म्हणजे असुरांचे स्थान दाखवण्यासाठी (ऋ. ७.२१.७) वापरला गेला आहे हेही महत्वाचे आहे. ती ऋचा अशी- 

देवाश्चित ते असुर्याय पूर्वे.अनु कषत्राय ममिरे सहांसि |
इन्द्रो मघानि दयते विषह्येन्द्रं वाजस्य जोहुवन्त सातौ || 

येथे देव हे "पुर्वीचे असूर" या अर्थाने घेतले आहेत. देवांनाच पुर्वी असूर म्हटले जायचे याचे भान या ऋचेत दिसते. देव हा शब्दही "दिव" किंवा "द्यौस" या शब्दातून आला आहे. त्याचाही अर्थ प्रकाश अथवा सूर्य असाच होतो हेही येथे लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे असुरांशी संघर्ष करणा-या गणांनी असूर हे नांव टाकत देव हे नांव स्विकारले खरे पण मुळबोध कायम ठेवला हेच 
येथे सुचित होते.

येथे लक्षात घायची बाब म्हणजे आपण मानतो त्याप्रमाने असूर हा शब्द अवमानदर्शक नाही. तो सुर्यनिदर्शक आहे. मानवाला तेजोमान सूर्य पवित्र, यातुमय, गुढ, जीवनदाता, धीर देणारा, अंधाराला (म्हणजेच अनि
ष्टालाही) दूर करणारा वाटला नसला तर नवल नाही. हा शब्द (असूर अथवा सूर्य) मुळचा वैदिक नाही. हा शब्द आदिम शब्दसमुहापैकी एक असून स्थानिक उच्चारपद्धतींप्रमाने वेगवेगळा जसा उच्चारला जात असे तशाच त्याभोवतीच्या पुराकथाही वेगवेगळ्या बनल्या असे दिसते. हा शब्द मुळचा अक्काडियन भाषेतील असावा असा डा. मालती शेंडगे यांचा कयास आहे तर डा. आ. ह. साळूंखे सुचवतात कि असुरांच्या संस्कृतेतर भाषेतच या शब्दाचे मूळ शोधले पाहिजे.

सिंधू संस्कृतीचे लोक आणि मेसोपोटेमियात पुरातन कालापासून व्यापारानिमित्त संबंध होता तसाच तो प्राचीन इराणशीही होता. व्यापारी वस्तुविनिमय जस दोन संस्कृत्यांत होतो तसाच तो काही शब्द व सांस्कृतिक/धार्मिक संकल्पनांतही होत असतो. त्यामुळे ह शब्द एका ठिकाणावरुन दुसरेकडे गेला असा अंदाज बांधता येईल, पण कोठुन कोठे हा प्रवास झाला हे मात्र सांगता येणार नाही. शिवाय सुर्याचा परिचय मानवी समाजाला लाखो वर्षांपुर्वीच झाला असल्याने त्याला विविध प्रदेशांतील मानवाने काहीना काही नांव दिले असणार व ते प्रचारित झले असणार हेही तेवढेच खरे. त्यामुळे त्याचे मुळ शोधण्यापेक्षा असूर म्हणजे मुलत: सुर्य एवढे समजावून घेतले तरी असूरांकडे पहायचा दृष्टीकोण आमुलाग्र बदलायला मदत होईल एवढे नक्की! सिंधू संस्कृतीतील मुद्रांवर सुर्याचे चित्रण केले गेले आहे हेही येथे उल्लेखनीय आहे. सिंधू संस्कृती ही मुळ असुरांची संस्कृती. ते वास्तुकलेत निष्णात होते. या स्मृती मयासुराच्या रुपात पुढेही जपल्या गेल्या. 

असूर हे मानवही!


असुरांबाबत अनेक लोकभ्रम आज निर्माण झाले आहेत. असूर ही कोणी काल्पनिक, पुराणकथांनी रचलेली मित्थकथा नाही. असिरियन लोक मानवच होते हे तर स्पष्ट आहे. असूर हा शब्द जसा संबोधन म्हणून वापर
ला जातो तसाच समुहवाचकही वापरला जातो. असूर हे सुर्याचे जसे नांव होते तसे अनेक मानवी समुदायांचेही होते. प्रत्येक समुदायाची संस्कृती ही असूरकेंद्री असली तरी त्यात स्थानिक देवदेवतांनाही स्थान होते. काही असूर मुर्तीपुजक होते तर काही असुराची अर्चना अग्नीमार्फत  (यज्ञ - यस्न) करायचे. ऋग्वेदात अग्नीलाही अनेकदा असूर म्हटलेले आहे. "त्वमग्ने रुद्रो असुर..." असे तैत्तिरिय ब्राह्मणातही (३.११.२.२) म्हटलेले आहे. किंबहुना अग्नीला सुर्याच्याच समकक्ष मानण्याची धार्मिक प्रथा होती. भारतातील असूर मात्र लिंगपुजक अथवा शिव-शक्ती पुजक होते. परंतू सुर्याशी संबंधित काही प्रतीके मात्र शिवाशी जोडलेलीच राहिली. उदा. वृषभ, पर्वत, चंद्रकोर. (चंद्र सुर्यपुत्र आहे असा प्राचीन काळी समज होता.)  

या असुरांचा धर्म नेमका काय होता? 
वैदिक व  झरथुस्ट्री धर्माचे लोक मात्र वेगळ्या पद्धतीचा यज्ञधर्मच पाळत. जे असूर झरथुस्ट्राच्या धर्मात गेले नव्हते ते नेमका कोणता धर्म पाळत याचे विवेचन नसले तरी ऋग्वेदातील "अकर्मन" (कोणतेही कर्मकांड नसलेले), अब्रम्ह (मंत्र नसलेले), अयज्वन, अयज्जु (यज्ञ नसलेले), अव्रत:, अन्यव्रत: (व्रत नसलेले, अन्य व्रत असलेले) असे उल्लेख दास-दस्युंबाबत मिळतात. सर्वात महत्वाचा उल्लेख आहे तो "शिस्नदेव", म्हणजे लिंगाची उपासना करणारे. यांच्याबाबत तर प्रचंड द्वेष व्यक्त केला गेला आहे.  हे दास-दस्यू असूर संस्कृतीचाच भाग असल्याने ही वर्णने असुरांसाठीचीच आहेत असे म्हणता येईल. परंतू त्यातून सर्व असुरांच्या धर्माचा, धर्मतत्वांचा विशेष बोध होत नाही हेही तेवढेच खरे. तरीही आपल्याला झरथुष्ट्री धर्माची तत्वे व उपासनापद्धतीही माहित आहे. ती वैदिकांपेक्षा फारशी वेगळी नव्हती. याचे कारण असूर व देवांच्या विशिष्ट सांस्कृतिक इतिहासात दडलेले आहे. असूर व देव हे दोघेही प्रजापतीची संताने होत असे शतपथ ब्राम्हण सांगते. दोघांनाही यज्ञ हवा होता पण देवांनी यज्ञ पळवला व जो अवशिष्ट वाईट भाग होता तो असुरांसाठी ठेवला अशी कथा येथे येते. झरथुस्ट्री धर्मातही यज्ञ होताच पण त्याला हिवण्यासाठी हे कथा बनली हे उघड आहे. पण याचा दुसरा अर्थ असाही होतो कि एके काळी दोन्ही (देव व असुरही) एकच धर्म पाळत असत. पुढे त्यांच्यात फुट झाली ते बहुदा झरथुस्ट्राने असूर धर्माला नवे स्वरुप द्यायला सुरुवात केल्यानंतर. त्यामुळे सुरुवातीला असूरकेंद्री असलेला वैदिक धर्म असूरविरोधी बनला. 

शतपथ ब्राम्हणात अजून एक कथा येते (१०.९.३.७-९) 
ती अशी- सौत्रामणी यज्ञ हा आधी असुरांचाच होता तो नंतर देवांनी घेतला. म्हणजेच काही असुर घटकांचा कर्मकांडात्मक धर्म यज्ञाभोवती फिरत होता तर काहींचा अमुर्त देवतांभोवती तर काहींचा लिंगपुजा, वृक्षपुजा ते अन्य अनाम देवतांची पुजा या भोवती असे दिसते. त्यामुळे एक संस्कृती असली तरी सर्वांतच  मैत्रही नव्हते आणि धर्मही एकच नव्हता. 

आणि हे तत्कालीन स्थिती, भुगोलाचे ज्ञान, जनसंख्या आणि आपापसातील अनेक कारणांनी उद्भवणारे संघर्ष पाहता स्वाभाविकही होते. येथे एक लक्षात घेणे आवश्यक आहे ते म्हणजे असूर जसे आदरार्थी इंश्वरी नाम/संबोधन आहे तसेच ते मानव समुहांचे व मानवांचेही नांव आहे. देव याला अपवाद नाही. देव हे एक समाजनामही होते हे लक्षात ठेवले पाहिजे. 

येथे हे स्पष्टपणे लक्षात ठेवणे गरजेचे आहे कि ऋग्वेदातील असूर (देवता म्हणून उल्लेख असतील किंवा शत्रू म्हणून) हे भारतीय पुराकथांतील असूर नव्हेत. वल, नमुची, शंबर, वृत्र इत्यादि जे असूर ऋग्वेदात शत्रू म्हणून उल्लेखले आहेत ते सर्वस्वी प्राचीन इराणमधील आहेत. त्यातील काही असूर (उदा. वृत्र) तर निसर्गाची रुपके आहेत. त्या देवासूर युद्धांचा आणि भारतातील असूरांचा त्यांच्याशी संबंध नाही. परंतू आपण आपला सांस्कृतिक इतिहास पाहतांना कोणता मानवी समुदाय कोठला हे तपासले नसल्याने व कोणत्या पुराकथा कोणत्या भौगोलिक क्षेत्रात रचल्या गेल्या याचा अदमास न घेतल्याने आपले आपल्याच इतिहासाबाबत पुष्कळ गैरसमज आहेत. असूर संस्कृतीच्या विस्ताराचाही आपल्याला अंदाज आला नाही. भारतातील असुरांबाबत आपल्याला जी माहिती मिळते ते पुराणांतुन, महाभारतातुन व काही प्रमाणात ब्राम्हण ग्रंथांवरून. त्यातही वैदिक पुराकथांतून झिरपलेल्या कथा कोणत्या हेही समजावून घ्यावे लागते. या कथांवर अनेक पुटे शत्रुभावनेने चढवली गेली असली तरी त्यातून आपण भारतीय असुरांचा इतिहास शोधू शकतो. हा फरक का हे जोवर आपण ऋग्वेद व अवेस्त्याचा भुगोल समजावून घेत नाही तोवर समजणार नाही. 

असे असले तरी असूर संस्कृती पुरातन असून तिला विरोध करण्यासाठी असंतुष्टांनी स्थापन केलेली संस्कृती म्हणजे देव संस्कृती. ही कधी आणि कोणी निर्माण केली हे आपण आज सांगू शकणार नाही, पण वैदिक संस्कृती या संस्कृतीचीही निर्माती नव्हे. वैदिक संस्कृती ही असूरांकडून विरोधी गटात, म्हणजेच देवांकडे कशी गेली याचा क्रमबद्ध वृत्तांत ऋग्वेदातच येतो. 


झरथुस्ट्रानेही असुर धर्माचे पुनरुज्जीवन केले. त्याने नव्याने धर्म स्थापन केला नाही तर विस्कळीत धर्माला एकत्र करण्यासाठी नवे तत्वज्ञान रचले. झरथुस्ट्राच्या गाथांत झरथुस्ट्री धर्माआधीच्याही अनेक गाथा आहेत. त्या पारशी पंडितांनी संबोधने बदलून वापरल्या असे मेरी जोइस म्हणतात. म्हणजेच झरथुस्ट्री धर्म स्थापन होण्यापुर्वी खुप आधीपासून असूर संस्कृती व धर्म अस्तित्वात होताच. झरथुस्ट्राने देवांना दुष्ट व शत्रु मानले. देव हे वाईट, सर्व पापांचे मूळ. अंग्रमैन्यु (इंद्र) हा अहूर माझ्दाचा मुख्य शत्रु. 

म्हणजेच देव (दिव/द्यौस) हा शब्दही अचानक उगवलेला नाही. देवांना माननारे काही समाज होतेच व त्यांचेही वेगळे धर्म होते. कदाचित हा धर्म असुरांना विरोध करणा-या जनसमुहांनी शत्रुत्वातुनही निर्माण केला असू शकेल. पण या धर्माची निर्मिती वैदिकांनी केली नव्हती हे निश्चित. ऋग्वेदात आधी असूरतत्व प्रामुख्याने येत असून वरुण, मित्र, अग्नी, सवितृ, रुद्र, आदित्य, पुषाण, आर्यमान व इंद्राला उद्देशून आदरार्थी संबोधन म्हणून असूर हा शब्द वापरला आहे. ऋग्वेदात १०५ वेळा असूर शब्द येतो त्यात ९० ठिकाणी त्याचा वापर पुजनीय/आदरणीय उपाधी म्हणून केला आहे. असूर उपाधी मात्र नंतर नाहीशी होते व असूर हे दुष्ट/मायावी म्हणून अवतरु लागतात. हा बदल झाला आहे त्यामागे इराणमधील विविध टोळ्यांतील संघर्ष व झरथुस्ट्री माझ्दायस्नी धर्माचे वाढलेले प्राबल्य व वैदिकांची झालेली पीछेहाट हे महत्वाचे कारण आहे. या संघर्षाचे प्रतिबिंब आपल्याला ब्राह्मण ग्रंथांत ठळकपणे दिसते. किंबहुना काही वैदिकांना भारतात शरणार्थी म्हणून का प्रवेश करावा लागला याचे कारण असूर धर्माच्या प्राबल्यात आहे. ब्राह्मण ग्रंथात देवासुरयुद्धांचे जे अतिरंजित वर्णन येते ते याच शत्रूभावनेतून हेही येथे लक्षात घ्यावे लागते. 

पुरातन काळात सुष्ट व दुष्ट शक्तींना गुढत्व जसे दिले जायचे तसेच मानव आणि त्या शक्तींतील एक संबंधही रुपकात्मक गुढरम्यतेने जोपासला जायचा. पुरावाड्मयात हा गुण (अथवा दोषही) ठळकपणे दिसतो. ऐतिहासिक घटना नोंदवतांनाही अनेकदा प्राचीन ग्रंथांनी त्यांचे मिथकरुपानेच वर्णन केले आहे. त्यामुळे मिथके बनवण्याची प्रत्येक धर्माची पद्धत लक्षात घेतली तरच इतिहासाचे बिंदू हाती लागतात व इतिहासाचे मर्म आपल्याला समजावून घेता येते. त्यांना काही लोक भाकडकथा या सदरत टाकतात ते उचित नाही. "इंद्राने विजय मिळवला" अशा अर्थाची ऋचा येते तेंव्हा याचा अर्थ खुद्द इंद्राने नव्हे तर इंद्राला मुख्य देवता मानना-यांनी विजय मिळवला" असा घ्यावा लागतो. तसेच देवासुरांची युद्धे पाहतांना मिथके कोणती व प्रत्यक्ष घडली असलेली तरीहे मिथकांत आवेष्टित केली गेलेली युद्धे कोणती याचाही नीट धांडोळा घ्यावा लागतो. 

मिथकांतून व पुरात्वीय पुराव्यांतून इतिहास उलगडतो असा. असूरांच्या दृष्टीने देव दुष्ट तर देवांच्या दृष्टीने असूर दूष्ट हे एक द्वंद्व होते हे समजावून घेणे गरजेचे आहे. त्याखेरीज आपल्याला आशियायी व म्हणुनच आपल्या सांस्कृतिक इतिहासाचा बोध नीट्पणे होणार नाही.

-संजय सोनवणी

1 comment:

  1. Sums up a lot of scholarship on this topic. Succinctly. Personally I do not agree with mixing Shiva with sun asur et al. In my opinion he belongs to a different people.

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...