Tuesday, October 17, 2017

ताज कोणाचा?



मुमताज महल चवदाव्या अपत्य जन्माच्या वेळेस १७ जुन १६३१ रोजी बु-हाणपूर येथे वारली. दारा शुकोह, औरंगजेब ते शाहजहानची लाडकी लेक जहानाअरा बेगम ही तिची आजही इतिहासात स्थान मिळवून बसलेली अपत्ये. बु-हाणपूर येथे तिला तात्पुरते दफन करण्यात आले. आग्र्यात तिच्यासाठी कायमच भव्य मकबरा बनवायची योजना असल्याने शाहजहानने राजा जयसिंगाकडून यमुनाकाठची त्याची हवेली चार हवेल्यांच्या मोबदल्यात विकत घेतली. शाहजहानच्या फर्मानात व कझ्विनी व लाहोरीच्या पातशहानाम्यात या व्यवहाराचा, ही जागा घेण्यामागील हेतुचा, म्हणजे भव्य व शानदार मकबरा बांधण्याचा, स्पष्ट उल्लेख आहे. ही जागा ४२ एकरात असून त्यात निवासी हवेली (मंझिल किंवा खाना) होती असेही त्यावरुन दिसते. याच जागेवर ताजमहालचे बांधकाम करण्यात आले की जुन्या वास्तुलाच सुशोभीकरण करुन फक्त नांव बदलण्यात आले याबद्दल मोठा विवाद आहे.

पु. ना. ओक, भट-आठवले प्रभुतींनी मानसिंगाच्या मुळच्याच बांधकामाला संगमरवरी आच्छादन देत ताजमधे बदलवले अशा अर्थाचे निष्कर्श काढले आहेत. ओकांच्या मते तर तेथे तेजोमहालय नांवाचे शिवालयच होते. या वादाला तेंव्हापासून सुरुवात झाली तो आजही शमायला तयार नाही. त्यात जायचे येथे कारण नसून आपल्याला मुळात ताजमहाल ही काही डागडुजी करुन मुळच्याच इमारतीचे सुशोभीकरण आहे की संपुर्ण ताजमहाल नव्याने बांधला गेला याची येथे चर्चा करायची आहे.

याबद्दल शंका नाही की ताजमहालाची जागा मुळची राजा मानसिंगाच्या मालकीची होती. यमुनेच्या दोन्ही काठांवर राजपूत्र आणि सरदारांच्या हवेल्या होत्या. १६२६ मध्ये डच अधिकारी पेलासर्ट आणि डलात यांनी मानसिंगाच्या हवेलीचा उल्लेख करून ठेवला आहे. ताजची जागाही तीच आहे हेही १७०७ मधील एका नकाशावरुन व पेलासर्टने दिलेल्या यादीशी तुलना करुन स्पष्ट होते. फर्मान आणि पातशहानामाही या माहितीला पुष्टी देतो. या पुराव्यांवरून एकच गोष्ट सिद्ध होते व ती म्हनजे ताजची जागा आधी जयसिंगाच्या नांवे होती, त्या जागेचा मुळ मालक मानसिंग असून तेथे एक हवेली अथवा मंझील होती. या बाबी नाकारण्याचे काहीएक संयुक्तिक कारण नाही.

मानसिंग हा बादशाही दरबारातील बलाढ्य हस्ती होते. त्यामुळे त्यांची हवेली आग्र्यात असणे स्वाभाविक होते. जेंव्हा शाहजहानने हवेली ताब्यात घेतली तेंव्हा राजा जयसिंग मात्र स्वत: त्या हवेलीत रहात होता की नाही याचे मात्र कसलेही उल्लेख मिळत नाहीत. शाहजहानने राहती हवेली विकत मागितली असती काय किंवा जयसिंगाने विकली असती का या प्रश्नाचा कोणी इतिहासकाराने विचार केलेला दिसत नाही. शाहजहानला यमुनाकाठच्या त्या ४२ एकरांच्या जागेत रस होता, त्याच्या हवेलीत नाही हेही फर्मान व पातशहानाम्यावरून सहज लक्षात येते. शिवाय त्या जागेवर अद्वितीय वास्तुचे अस्तित्व असते तर पेलासर्ट व डलातने तिचा तसा उल्लेख केला असता. पण तसेही नाही. अन्य राजपुत्र व सरदारांच्या हवेल्यांच्या जागांचे ते जसे वर्णन करतात तसेच मानसिंगाच्या जागेचेही वर्णन करतात. वास्तूरचनाशास्त्र दृष्ट्या ती विशेष वेगळी इमारत असती तर तिचा वेगळा उल्लेख येणे व ती तेंव्हाही, भलेही संगमरवरी आच्छादन नसले तरी, तत्काळी प्रसिद्ध इमारत असती. पण ते वास्तव नाही. ती एक निवासी पण एक दुर्लक्षीत हवेलीच होती एवढेच काय ते वास्तव अनेक पुराव्यांवरुन पुढे येते. 

त्यामुळेच की काय राजा मानसिंगच्या हवेलीचेच ताजमध्ये रुपांतरण करण्यात आले असा उल्लेख कोठेही मिळत नाही. मानसिंगाची तत्कालीन प्रसिद्धी पाहता जर असे झाले असते तर कोठे ना कोठे त्याचे उल्लेख मिळाले असते. शिवाय पातशहानाम्यातील नोंदी या मताला कसलीही पुष्टी करत नाहीत. 

पातशहानाम्यातील या संदर्भातील जे उतारे आहेत त्याची वेगवेगळे अनुवाद प्रसिद्ध आहेत. माझे मित्र आनंद दाबक यांनीही एका स्वतंत्र पर्शियन अनुवादकाकडून अनुवाद करून घेतला होता व अन्य अनुवादही तज्ञांकडून तपासून घेतले होते. तो अनुवाद आणि ओकांनी दिलेला अनुवाद याची तुलना करता हे लक्षात येते की ओकांनी आपल्या अनुवादात मोठा घोळ घातला आहे. मुळात पातशाहनाम्यात "प्रकल्पाच्या सदस्यांनी या इमारतीला चाळीस लाख रुपये खर्च येईल असा अंदाज केला." राजेंद्र व्ही जोशी यांनीही ओकांचा अनुवाद तपासून त्यात चूक आहे असे स्पष्ट केले होते. उदा.  ( members of project team ) budgeted / estimated the cost ( Rs forty lacs) अशा अर्थाचे वाक्य असतांना ओकांनी "Far-sighted engineers and skilled architects expended forty lakhs of rupees [Rs.4,000,000] on the construction of this building." असा अर्थ घेतला आहे. या ओकांच्या अर्थामुळे असा समज निर्माण होतो की १६३३ मधेच ताजचे बांधकाम पुर्णपणे तयारच होते व डागडुजीसाठीच तो काय चाळीस लाख रुपये खर्च आला. म्हणजे अंदाजित खर्च आणि होऊन गेलेला खर्च यातील फरक, बहुदा जाणीवपुर्वक करत, त्यांनी आपला सिद्धांत मांडला. 

याचा अर्थ असा की मानसिंगाच्या हवेलीचे रुपांतर डागडुज्या करुन सध्याच्या ताजमधे करण्यात आलेले नाही. मग मानसिंगाच्या हवेलीचे काय झाले? अर्थात या प्रश्नाच्या उत्तराकडे वळण्याआधी आपण ताजसंबंधी उपलब्ध असलेली अन्य माहिती तपासून पाहुयात.

१. फ्रेंच व्यापारी टॅव्हर्नियर हा १६३८ ते १६६८ या काळात सहा वेळा भारतात येऊन गेला. ताजमहालवर २०,००० कामगार काम करत होते आणि ते पुर्ण व्हायला २२ वर्ष लागली ही माहिती तो देतो.

२. फ्रे सबास्टियन मनरिके हा पोर्तुगीज मिशनरी डिसेंबर चाळीस ते जानेवारी ४१ या काळात आग्र्यात होता. तो या बांधकामावर एक हजार लोक काम करीत होते असे लिहितो. हे लोक रस्ते, बागांचे काम करीत होते असे तो लिहितो. 

३. पीटर मुंडी हा ब्रिटिश व्यापारी १६३१ ते १६३३ या काळात आग्र्याला तीन वेळा राहिलेला आहे. त्याला मुमताजचा मृत्यू झाल्याचे माहित होते. शेवटच्या भेटीच्या वेळीस त्याने जे पाहिले ते लिहिले आहे ते असे  “ This Kinge is now buildinge a Sepulchre for his late deceased Queene Tege Moholl..... He intends it shall excell all other. The place appoynted is by the river side where she is buried, brought from Burhanpur where she dyed accompanying him in his wars." (पान २१२,The Travels of P Mundy, Volume II Travels in Asia, edited by Lt Col Sir R C Temple,) आणि याच माहितीच्या पुढे तो लिहितो की बांधकाम सुरु झाले असून अत्यंत मोठ्या प्रमाणावर कामगार व धन वापरले जात आहेत. संगमरवर जणू एखादा सामान्य दगड असावा एवढ्या विपुलतेने वापरला जात आहे. 

टॅव्हर्नियर आग्र्याला मात्र केवळ दोन वेळा आला होता. पहिली आग्रा भेट १६४०-४१ चे तर दुसरी १६६५ची. म्हणजे त्याने बांधकाम चालू असलेले पाहिले ते फक्त एकदा. बाकी जी माहिती त्याच्याकडे आहे ती सांगोवांगीची आहे हे उघड आहे. त्यामुळे २० हजार कामगार व २२ वर्ष ही एकतर अतिशयोक्तीत टाकून देता येतात किंवा त्याचा केवळ एक अंदाज म्हणून सोडून देता येतात. मनरिकेबद्दलही तसेच म्हणता येते व मुंडीबाबतही. मुळात हे प्रवासी नव्हते तर व्यापारी होते. बांधकाम सुरु असतांना एखादी इमारत पुर्ण झाल्यावर कशी दिसेल याची कल्पना येण्याची शक्यता नाही. त्यामुळे कामगार संख्या अचूक का नाही, खर्चाचा ताळमेळ मग कसा बसत नाही याची गणिते अशा वर्णनांच्या आधारे करत मते मांडणे गैर आहे. तेथील कामगार इतकी वर्ष जुन्या वास्तुचीच डागडुजी करत असते तर मुंडीपासून असे उल्लेख सुरु झाले असते. पण तसे वास्तव नाही. 

वरील उल्लेखांवरून, फर्मानांवरून आणि या लेखकांच्या वर्णनावरुन एकच गोष्ट स्पष्ट होते व ती म्हणजे ताजमहालाच्या जागेवर नव्याने बांधकाम चालू करण्यात आले होते व त्यासाठी अनेक मजूर, अभियंते आणि वास्तुतज्ञ राबत होते. 

मग मानसिंगाच्या मुळ वास्तुचे काय झाले? काही इतिहासकारांच्या मते शाहजहानने जयसिंगाकडून फक्त "जमीन" घेतली होती. जमीन की मंजील याबाबत वाद झडला आहे. तेथे मंजिल अथवा हवेली असण्याचीच शक्यता आहे. ही हवेलीत त्या काळात कोणी रहात असल्याची शक्यता नाही. कदाचित त्यामुळेच शाहजहानने ही जागा मागितली. जयसिंगानेही खळखळ न करता ही जागा देऊन टाकली व अन्यत्र चार हवेल्या मिळवल्या. मानसिंगाची हवेली ताजसारखी भव्य व सुंदर वास्तू नव्हती, असती तर ती त्याच्या काळातच प्रसि्द्ध झाली असती. पण तसे वास्तव नाही.  

ताजमहालच्या आराखड्याबद्दल तसेच नौकानयनासाठी असलेल्या यमुनातीरीच्या (आता गाळाखाली गेलेल्या) धक्क्याचा उल्लेख गोडबोलेंनी केला आहे व कबरीत त्याचे काय काम असा प्रश्न विचारला आहे. पण हा धक्का मुलचा मानसिंगच्या काळातीलच असणार ही शक्यता त्यांनी विचारात घेतलेली नाही. ही मंझिल कोणत्याही सरदाराची असावी तशीच होती व त्यात स्वभावत:च असावीत तशीच तळघरे, नौकानयनासाठीचे धक्के वगैरे बांधकामे असने स्वाभाविक आहे व ती नष्ट करण्याचे कारणही नव्हते.  उलट मुळचे तळघ्रर कबरीसाठी वापरणे सोयिस्कर होते. बाजुच्या खोल्या बंद करुन मधल्या भागात सुधारणा करुन कबर बनवली गेली. असावी हे स्पष्ट आहे. बंद खोल्यांबाबतचा विवाद अनाठायी असला तरी त्या जनतेसाठी उघडायला हरकत नाही. 

थोडक्यात वरील मुळचे मुख्य हवेलीचे बांधकाम पाडून ताजची निर्मिती नव्याने केली गेली असली तरी मानसिंगाच्या हवेलीचे अवशेष काही प्रमाणात शिल्लक राहिलेले आहेत. त्यावरून संपुर्ण वास्तुचे श्रेय शाहजहानकडून काढून घेत अकारण काल्पनिक पात्रांना देण्याचे काही कारण नाही. ताजची वास्तुरचना स्वतंत्र असून मुळच्या हवेलीतील काही भाग कल्पकतेने त्यात मर्ज केला गेला असे म्हणने अधिक संयुक्तिक आहे.

औरंगजेबाच्या घुमटाच्या दुरुस्तीबाबतच्या १६५२च्या पत्राचा फार गवगवा केला जातो. औरंगजेबाचे पत्र सत्य मानून गळत्यांचा प्रश्न सोडवता येतो. एवढा मोठा घुमट डोम बांधल्यानंतर त्यात मानवी चुकांमुळे टेक्निकल डिफल्ट्स राहु शकतात. गळती होऊ शकते. पण गळती झाली, दुरुस्ती करावी लागली म्हणजे म्हणजे ते बांधकाम पुरातन हा तर्क चुकीचा ठरतो. मानसिंगाची ४२ एकर जागा जयसिंगाने त्यावरील हवेलीसह विकली ही वस्तुस्थिती आहे. त्यावर कोणतेही अलौकीक असे बांधकाम नव्हते. जमीनीवरील मुख्य हवेली पाड्न ही इमारत बांधली गेल्याचे स्पष्ट दिसते. मुंडी ते टॅव्हर्नियर यांच्या वर्णनांत कामगारांच्या संख्येबाबत गफलत असली तरी बांधकामाची सुरुवात नव्याने झाल्याची माहिती मिळते.  खुद्द पातशहानामा व शाहजहाननामा मानसिंगाकडून जागा घेऊन त्यावर ताजची इमारत उभी करण्याची सुरुवात झाल्याचे नमूद करतात. उलट पु. ना. ओक पातशहानाम्यातील या संदर्भातील वर्णनात गफलत करतात हे आपण वर पाहिले आहे. ताजमहाल पुर्ण होत आल्याचा काळ आणि राजकीय वादळी घडामोडी, शाहजहानचे आजारपण ते कैदेचा काळ दुर्दैवाने परस्परांशी भिडल्यामुळे त्याबाबतची माहिती धुसर होत गेलेली आहे. 

ताजमधील सोने व अन्य संपत्तीचे काय झाले हा प्रश्न गोडबोलेंना प्रश्न पडला असला तरी सुरजमल जाटाने केलेल्या आग्रा स्वारीत ताजमहालाची लुट केली होती हा इतिहास ते विसरतात. तत्पुर्वीही लुट झाली असण्याची शक्यता कशी नाकारता येईल? तसेही ताजवर विद्रुपीकरनाचे संकट १८५७ च्या बंडाच्या वेळीसही आले होते. 

मुमताजच्या कबरीभोवती सोन्याचे रेलिंग होते असा उल्लेख पीटर मुंडी करतो, पण हे रेलिंग ताजच्या आवारातील तात्पुरत्या दफनस्थळाभोवती होते. नंतर पुन्हा मुमताजजचे शव हलवून आत्ताच्या स्थानी दफन केल्यानंतर ते रेलिंग ठेवण्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळे ते कोठे गेले हा प्रश्नही निरर्थक आहे.

वास्तुरचना हिंदू की पर्शियन हा वाद असाच भोंगळ आहे. किंबहुना वास्तुरचनांत व त्यावरील कलाकारीत संस्कृती-संगम अपरिहार्यपणे होत असतो. रायगडावरील जगदिश्वराचे मंदिर मुस्लिम शैलीत आहे म्हणून ते कोणी मुस्लिमाने बांधले असा कोणी तर्क केला तर तो जेवढा वेडगळपनाचा होईल तेवढाच हिंदु खाणाखुणा मिळाल्या तर ताज हे हिंदू राजांचे वास्तुशिल्प होते असा दावा करने मुर्खपनाचे होऊन जाईल. मानसिंगाच्या जुन्या वास्तुतील काही भाग पाडायची गरज नसल्याने तो तसाच राहिला. केवळ तळघर, बंद खोल्या यावरून फार मोठा दावा करण्यापेक्षा त्यंची स्पष्टीकरणे अन्यत्र शोधायला हवीत एवढेच. ताज हिंदुंचा कि मुस्लिमांचा हा वाद निरर्थक असून तो भारतीयांचा आहे हेच लक्षात घ्यायला हवे. 

6 comments:

  1. अतिशय योग्य विश्लेषण...

    ReplyDelete
  2. सर
    छान लेख...

    -केदार भोपे

    ReplyDelete
  3. संजय सर ,
    दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !
    आपले एबीपी माझा वरील चर्चासत्र ऐकले तसेच हा लेखही वाचला. शेवटून दुसरा पॅरीग्राफ १७५७ ऐवजी 1857 असावे असे वाटते . ते जर खरे असेल तर १८५७ चे बंड असे आपण म्हणता तेही खटकले . असो .
    संघ किंवा तत्सम संघटनांची एक पद्धत आहे त्याविषयी आपण बेधडक बोलायला हवे. एबीपी माझा वर श्री विश्वंभर चौधरी यांनी ती चिरफाड केली .
    लोकांच्या मनात वैचारिक गोंधळ करून हिंदूंवर अन्याय झाला आणि तो काँग्रेसच्या राजवटीत वाढत गेला आणि आता आम्ही आलो आहोत ,आता हिंदूंना न्याय मिळणार ! अशी त्यांची स्वयंघोषित ग्वाही असते . गोमांस, बाबरी मशीद ,ताजमहाल ही त्याची जिवंत उदाहरणे आहेत .
    आपण अनेक वेळा दाखवून दिले आहे की , मूळ भारत कोणाचा ? तर असे मागे मागे गेले तर सर्वच जण उपरे थरातील !पांडव कौरव भारतीय होते का ?
    उत्तर अमेरिका (यूएसए ) हे त्याचे उत्तम उदाहरण आहे - म्हणे फक्त २०० वर्षांचा इतिहास ! कमाल आहे !!. मग आधीच्या आदिवासींचे काय ? त्यांना इतिहास नव्हता ?
    सर्व जगातच अजून बरेच चांगले विचार दाबून टाकायची प्रवृत्ती आहे हेच खरे . ओवेसी म्हणतात तसे - लाल किल्ला आणि राष्ट्रपती भवन आणि संसद हे पण मग भारतीय ठरत नाहीत परकीय साम्राज्यांच्या खुणा ठरतात .
    त्या पूर्वीचे मौर्य, किंवा कंस .श्रीकृष्ण किंवा नंतरचे देवगिरीचे यादव , चालुक्य , पुलकेशी , अशोक आणि बिंबिसार हे सर्वच परकीय ठरतील त्याबाबत एबीपी माझा वरच्या चर्चेत जगन्नाथपुरी चे उदाहरण बोलके दिले आहे .निखळ इतिहास संशोधन करण्याची संघाची पात्रता नाही . त्यांच्या प्रत्येक लिखाणात "आम्ही थोर होतो आणि परत होणार आहोत "असाच सूर असतो - पण मग तुम्ही सुमारे १५०० वर्षे का गुलाम होतात ?मुस्लिम आणि इंग्रजांचे वास्तुशास्त्र नक्कीच सरस होते ,आपल्याकडे काय दिसते ? शुंन्य भोपळा ! आपण हजारो वर्षे पलीकडल्या मोक्षाचीच वाट चोखाळली ! भौतिक जगातील सोयी सुविधांची आपण काळजीच केली नाही ?
    हे खरे आहे का ?
    पण मग ,

    सिंधू संस्कृतीत काय होते?उत्तम शहर रचना होती ,छान रस्ते होते ! ते भारतीयच होते का नाही ?संजय सर आपण म्हणता त्याप्रमाणे मुस्लिम आक्रमण इस १००० पासून किंवा त्यापूर्वी चालू झाले आणि लगोलग आपला धर्म कृष्ण विवरात ढकलला गेला ! धर्मबुडी होऊ नये म्हणून अनेक बंधने आली ,समुद्र ओलांडू नये , अहिंसा सत्य वगैरे धर्माज्ञा - असे अनेक चाळे सुरु झाले . आणि आक्रमकांचे काम सोपे झाले . अनेक वेळा मार खाऊनही देशातून हाकलून दिलेला बाबर , अक्षरशः काही शे लोकांसह भारतात येतो काय आणि संपूर्ण भारत व्यापून आपले साम्राज्य स्थापितो काय ! तुमचे राम मंदिर नष्ट करतो काय !!!
    सुफी संतांविषयी संघ परिवार असेच जहाल लिहीत असतो - संजय सर त्यावर आपण लिहावे - पुराव्यासकट !!!
    भारतीयांनी मलेशिया , इंडोनेशिया आणि कंबोडिया , इथे भारतीय संस्कृती नेली आणि सत्ता स्थापन केल्या !
    वादाचा मुद्द्दा हा असतो की मलेशिया,कंबोडिया,इंडोनेशिया चीन यांची आद्य संस्कृती कोणती ?बौद्ध ? नक्कीच नाही !मुस्लिम पूर्व काळात आपण तिकडे गेलो आणि आपल्या बरोबर आपली मते नेली . तेंव्हा काय घडले असेल ? अन्याय झालाच नसेल का त्या वनवासी लोकांवर ?
    सर्व जगभर हे दिसून येते !
    कुतुब मिनार बांधला तेंव्हा त्यात हिंदू देवळाचे अवशेष आहेत हे सत्य आहे - पण त्यामागील सत्य हे आहे की - ऐबकाच्या काळात कुतुब मिनार बांधायचा होता त्यावेळेस त्याच्याकडे फक्त सैन्य होते सुतार लोहार कारागीर स्थापत्यकार नव्हते - मग तो काय करणार आपला स्थानिकांच्यावरचा विजय साजरा करणारा स्तंभ बांधताना तो इथलीच मंदिरे तोडून तेच अवशेष रॉ मटेरियल म्हणून वापरणार आणि इथल्याच कारागिरांवर दडपण आणून आपला कुतुब मिनार उभा करणार ! त्याशेजारीच पुरातन पोलादी विक्रमादित्याचा स्तंभ आहे ! हे विशेष !
    अजून कुतुब मिनाराकडे संघ परिवाराची नजर गेली नाही हे विशेष !नाहीतर सुरु - तो पण आमचाच ! वगैरे वगैरे -
    संजय सर आपण उत्तम लेख लिहिला आहे !
    स्वकीयांच्या मनात स्वधर्माचे आणि स्वराष्ट्राचे स्फुल्लिंग चेतवताना कायम आपण एकेकाळी जग्गजेते होतो हे सांगण्याची काय गरज आहे ?
    आज तरी स्थिती काय आहे ? पूर्ण निखळ भारतीय हा विचार पूर्णत्वाने रुजला आहे का ?
    छुपी फुटीरता दबा धरून बसली आहे ! प्रांतीयता डोके वर काढत आहे - एक दिवस स्वतंत्र तामिळनाडू , किंवा स्वतंत्र बंगाल , स्वतंत्र पंजाब असा हाकारा सुरु झाला तर आश्चर्य वाटायला नको -
    मात्र त्यावेळेस तुमची ही हिंदू राष्ट्राची विचार सरणी कामी येईल का ? का त्यासाठीच संघाची ही बांधणी आहे ! धर्मच सर्व प्रांतांना एकत्र ठेवेल असे त्यांना वाटते ?
    संजय सर काहीतरी लिहा , भरपूर लिहा , सडेतोड लिहा हीच अपेक्षा ! पुन्हा एकदा सर्वाना दीपावलीच्या शुभेच्छा !

    ReplyDelete
  4. What you're saying is completely true. I know that everybody must say the same thing, but I just think that you put it in a way that everyone can understand. I'm sure you'll reach so many people with what you've got to say.

    ReplyDelete
  5. संजय सर आप बामसेफी हो क्या ॽ

    ReplyDelete
  6. पुरातन भारतामध्ये स्थापत्यकला नव्हती असे दत्तात्रय आगाशे म्हणतात मी इंग्रजांकडे सरस स्थापत्यकला होती असे ते नमूद करतात पत्रे आगाशे यांनी भारतातील कोणतही हजार-दोन हजार वर्षांपूर्वीच मंदिर तपासून पहावे त्यातील बारकावे त्याच्यातील कला पहाव्यात ज्या आजही आधुनिक काळात करता येत नाहीत ताजमहल बद्दल त्याचे जे मत असेल ते असेल परंतु भारतीय स्थापत्य करेला कमी लेखन हे त्या काळातील कलाकारांवर अन्यायकारक आहे भारतातील विषेश्टा सध्या उपलब्ध असलेली दक्षिण भारतीय महाप्रचंड मंदिरे पाहिल्यास आज देखील कल्पनेच्या पलीकडे त्यांनी बांधकामे केल्याची दिसून येते अतिशय सुरेख सुबक महाप्रचंड आणि हजारो खांबांची मंदिर पाहिल्यास एक काम दुसऱ्या खांबाचा झेरॉक्स कॉपी आहे असे दिसून येते कित्येक खांबांची भजन हजारो टन मध्ये आहे आणि त्याची निर्मिती कशी केली असेल हे आज कुणीही सांगू शकत नाही त्यामुळे दत्तात्रेय आगाशे यांनी ताजमहाल बद्दल त्यांचे वैयक्तिक मत काही मांडावे परंतु भारतीय स्थापत्यशास्त्र नाव ठेवू नये

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...